सातारा : सातारच्या गणेश विसर्जनाचा मुद्दा गेले तीन - चार वर्षे सातत्याने कळीचा बनत आहे. जिल्ह्यातील अन्य कोणत्याही शहरात गणेशोत्सव व विसर्जनाचा विषय कधी इतका चिघळला नसेल, तितका सातार्यात चिघळतो. हा संपूर्ण उत्सव मंगलमय, पवित्र व सलोख्याच्या वातावरणात साजरा होण्याची आवश्यकता आहे.
हा लोकांच्या श्रध्देचा विषय आहे.त्यादृष्टीने या उत्सवाला काही शिस्त लावण्याची व त्यासाठी दूरदृष्टीच्या नियोजनाची गरज आहे. पण कोणीही हा विषय गांभिर्याने घेत नाही. गणेशोत्सव आला की हा विषय ऐरणीवर येतो आणि उत्सव झाला की तो बाजुला पडतो. त्यामुळे उत्सव आला की विघ्नांची मालिकाच उभी राहते. ऐनवेळी उभ्या राहिलेल्या प्रसंगावर काहीतरी तकलादू उपाय काढून मार्ग शोधला जातो. पण ते तितकेसे बरोबर नाही. सातारा जिल्ह्यात सातारा शहराप्रमाणेच कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, कोरेगाव, फलटण, दहिवडी, म्हसवड अशी विविध लहानमोठी शहरे आहेत. पण अन्य कोणत्याही शहरात गणेश विसर्जनाचा जितका 'इश्यू' होत नाही, तितका सातार्यात होत असतो. सातार्यात दरवर्षी यावर रण माजते. कारण हा प्रश्न सोडवण्याची कुणाची इच्छाशक्ती दिसत नाही. जिल्हा प्रशासन यामध्ये अंगाला काही लावून घ्यायचे नाही अशा मानसिकतेत दिसते, तर उत्सवात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही समस्या उद्भवू नये म्हणजे झाले अशी पोलीस यंत्रणेची भूमिका दिसते. त्यामुळे नगरपालिकेला काही मर्यादा येत असाव्यात असे वाटते. सातारा शहराजवळील संगम माहुलीला कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम आहे.
परंतु हे ठिकाण शहरापासून पाच - सात किलोमीटर दूर आहे. त्यामुळे शहर व उपनगरांमधील गणेश मंडळांची नदीत विसर्जनाला पसंती असत नाही. शिवाय सातार्यातील गणेशमूर्तींचे शहरातील विविध तळ्यांमध्ये विसर्जन करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. तशीच वहिवाट कायम रहावी अशी बहुतेकांची इच्छा आहे. मात्र काळाच्या ओघात गणेश मंडळांची संख्या वाढली असल्यामुळे तळी अपुरी पडत आहेत. भव्य गणेशमूर्तींचा मोह अजुनही कमी व्हायला तयार नाही. शिवाय प्लॅस्टरच्या मूर्ती, त्यावरील रंग यामुळे तळी प्रदूषित होत आहेत. त्यातील प्राणवायू लुप्त होत असल्याने जलचरांचा अधिवास धोक्यात आला आहे.
यासंबंधात जनमत जागृत होत चालल्याने विसर्जनासाठी नव्या पर्यायाचा शोध सुरू झाला. त्यातून तीन वर्षांपूर्वी कृत्रिम तळ्यांची कल्पना पुढे आली. गणेशोत्सव आल्यावर शहराच्या विविध भागात अजस्त्र मशिनरी वापरून मोठमोठी तळी खोदायची व विसर्जन झाल्यानंतर ती तळी मुजवून टाकायची असे सुरू झाले. या प्रकारात गेल्या तीन वर्षात कराच्या रूपाने जनतेच्या खिशातून आलेल्या कोट्यवधी रूपयांचे अक्षरश: 'विसर्जन' झाले. गणेशोत्सवाची पर्वणी साधून या प्रकारात कोणी कोणी हात धुवून घेतला हा संशोधनाचा विषय आहे. पण जनतेच्या पैशाचा असा चुराडा लोकांना पसंत नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. विविध संस्था, जागरूक नागरिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी यासंदर्भात जनहिताची भूमिका घेतली. यंदा हा विषय बाजुला पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या बैठका सुरू झाल्यापासून विसर्जनाच्या समस्येवर वादंग सुरू आहे.
या प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाल्याचे दिसत नाही. या विषयावर राजकारणाची पोळी भाजून घेतली जात आहे. परस्परांवर चिखलफेक करण्याची संधी यातून साधली जात आहे. सातार्यात संस्थानकालीन अनेक तळी आहेत. अशाच तळ्यांपैकी रिसालदार तळ्याचा पर्याय सुरूवातीला देण्यात आला होता. परंतु पोलीस यंत्रणेने त्या पर्यायावर फुली मारल्यामुळे प्रश्न पुन्हा भिजत पडला. याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी अलीकडेच जिल्हाधिकार्यांचीही भेट घेतली होती. पण जिल्हाधिकार्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने 'जिल्हाधिकारी म्हणजे काय ? मानला तर देव, नाही तर दगड' असे जाहीर भाष्य त्यांनी केले. त्यानंतर पुन्हा मंगळवार तळे तसेच मोती तळे असे पर्याय पुढे आले आहेत. हा प्रश्न कशा पध्दतीने सोडवला जातो याकडे तमाम सातारकरांचे लक्ष लागले आहे. तोडगा तात्पुरत्या स्वरूपाचा काढण्याऐवजी दूरदृष्टी ठेवून काढला जायला हवा. म्हणजे दरवर्षी पुन्हापुन्हा या विषयावर काथ्याकुट नको अशी सातारकरांची भावना आहे.
पर्यावरण रक्षणाचा विचार करून गणेशोत्सव साजरा करायला हवा यासाठी राज्यभर जागर करणार्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सातार्यात त्यांच्या विचारांचा प्रभाव असलेले अनेक लोक आहेत. यासंबंधीच्या प्रबोधनाचा परिपाक सातार्यात दिसून येत आहे. पर्यावरणाचा विचार करून विविध मंडळांनी भव्य मूर्ती तशाच ठेवून शाडूच्या लहान मूर्तींचे विसर्जन ही भूमिका कृतीत आणायला सुरूवात केली आहे. ही अतिशय आश्वासक बाब आहे. यासाठी व्यापक प्रबोधन व प्रयत्न झाल्यास नजीकच्या काही वर्षात सातार्यात ही समस्या राहणार नाही. जनतेनेच त्यादृष्टीने भूमिका घेतल्यास प्रशासनावर सध्याप्रमाणे लोकभावनेचे दडपण राहण्याचा प्रश्न उरणार नाही. सातारच्या गणेशोत्सवाला नवे परिमाण प्राप्त होईल व त्यातून राज्यात एक चांगला संदेश जाईल.
- गजानन चेणगे
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |