सातारा : भाजपकडून युवानेते तथा जिल्हा कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना महायुतीकडून माढ्याची गढी काबिज करण्यासाठी काही तासांपूर्वीच उमेदवारी मिळाली आहे. फलटणकरांना आपल्या हक्काचा खासदार निवडून आणण्याची तब्बल 23 वर्षांनंतर संधी मिळालेली आहे. परंतू रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे फलटणमध्ये ‘कही खुशी, कहीं गम’ असे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र, भावकीला मदत करायची की गावकीला? या पेचात मात्र मिस्टर रामराजेंचे सभापतीपद पणाला लागले आहे.
सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रही ढवळून निघाले आहे. ह्याला पाड, त्याला पाड च्या नादात आपण काय करतोय, याचेही भान राजकीय धुरिणांना राहिलेले नाही. पक्षनिष्ठा तुळईला बांधून अनेकांनी पक्षांतराचा गमजा गळ्यात घातलेला आहे. त्यामुळे कोण, कोणत्या पक्षातून उभा राहतोय, हेच मतदारांच्या लक्षात येत नसल्यामुळे ‘कोणाचा झेंडा घेवू हाती’, अशी तर्हा झाली आहे. 23 वर्षांपूर्वी सातारा लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील कद्दावर नेते, माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांना घरी बसविण्याचा विडा कॉंग्रेसचे तत्कालीन नेते शरद पवार यांनी उचलला होता. प्रतापराव भोसले, उदयनराजे भोसले, हिंदुराव नाईक-निंबाळकर व इतर ११ अपक्ष उमदेवार उभे राहूनही मताचे विभाजन झाले तरी प्रतापराव भोसले यांचा विजय होणार होता. त्यामुळेच शरद पवारांनी दिवंगत कर्नल आर. डी. निकम यांना अपक्ष उभे केले होते. परिणामी सातारा भागातील तसेच आजी-माजी सैनिकांची मते कर्नल आर. डी. निकम यांनी घेतली. परिणामी मतांच्या विभाजनात प्रतापराव भोसले यांच्यासारख्या कॉंग्रेसच्या कद्दावर नेत्याचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेकडून उभे राहिलेल्या हिंदुराव नाईक-निंबाळकर यांना खासदारकीची लॉटरी लागली. पवारांच्या ह्याला गाड, त्याला पाड या नीतीमुळे शिवसेनेने कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण मारुन आपले खाते उघडले. मात्र, चारच वर्षात शरद पवारांना कॉंग्रेसपासून विभक्त व्हावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची वेगळी चूल मांडून पवारांनी आपल्या प्रादेशिक राजकारणाला सुरुवात केली. मात्र पवारांना म्हणावेसे यश मिळाले नाही. कॉंग्रेसचा धाकटा भाऊ म्हणूनच त्यांना राजकारण करावे लागले.
2014 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससह राष्ट्रवादीचे पानिपत झाले. मात्र, सत्ता नसतानाही पवारांनी आपल्या जवळच्या दोन शिलेदारांना सत्तेत बसवले. त्यातील एक म्हणजे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, दुसरे म्हणजे फलटण संस्थानचे अधिपती रामराजे नाईक-निंबाळकर. सत्तेत नसतानाही शरद पवार काहीही चमत्कार करु शकतात, याबद्दलची अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा राष्ट्रवादीजनांची आहे. खाल्ल्या मिठाला जागावे, असा वकुब खुद्द शरद पवारांचा आहे. अनेकांच्या कुंडल्या आणि नाड्या पवारांना माहित असतात. कोणाला कुठे दाबावे, कोणाला कुठे बसवावे, यात पवारांचा हातखंडा आहे. सत्तेत असताना अकलुजच्या मोहिते-पाटलांपासून अनेकांना पवारांनी दाबून ठेवले होते. जास्त चुळबुळ कराल, तर याद राखा. या दमबाजीने पवारांनी अनेक घराणी खालसा केली. मात्र ग्रह बदलले की घराचे वासेही बदलतात, अशीच काहीशी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत माढा हा नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर शरद पवारांनी या मतदारसंघावर आपला हक्क सांगितला. स्वत: या मतदारसंघातून शड्डू ठोकून पवार निवडूनही आले. मात्र, 2014 साली बंडाळ्या टाळण्यासाठी पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटलांचा घामटा काढला. काठावर पास झालेल्या मोहिते पाटलांनी गेल्याच आठवड्यात आपल्या चिरंजिवाला भाजपात धाडले. पवारांनी या निवडणुकीत लढण्याचा निर्णय रद्द केल्यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत पेच वाढला. शेवटी संजयमामा शिंदे यांना भाजपमधून ओढून आणत राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा हार त्यांच्या गळ्यात बळजबरीने घालण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माढ्याची लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यांनी आपल्या शिलेदारांना कामालाही लावले आहे. साम-दाम-दंड हे भेद वापरुन माढा जिंकण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्यामुळेच भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासारख्या युवा व डॅशिंग कर्तृत्वाला संधी दिलेली आहे. सत्तेच्या गोळा बेरजेमध्ये या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सध्यातरी भाजपचे पारडे जड वाटत आहे. राष्ट्रवादी अंतर्गत असलेल्या लाथाळ्यांचा फायदा भाजपला नक्कीच होणार आहे. मात्र नात्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची भावकी असलेल्या विधानपरिषद सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांचे भवितव्य मात्र माढा लोकसभेच्या निकालावर अवलंबून राहणार आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार माढ्यातून जिंकून आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी मिस्टर रामराजेंच्या खांद्यावर दिलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण-खटाव हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. फलटण विधानसभा मतदारसंघावर सध्यातरी मिस्टर रामराजेंसह त्यांच्या दोन दाढीवाल्या बंधूंचे निर्विवाद वर्चस्व आहे. माण-खटावमध्ये गोरे बंधूंचा 'जलवा' आहे. शेवटी काही झाले तरी माण-खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे पक्षधर्मापेक्षा मित्रधर्म अधिक पाळणार, यात शंका नाही. 23 वर्षानंतर फलटण तालुक्याला खासदारकीची संधी मिळत आहे. गट-तट-पक्ष विसरुन फलटणकरांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, सभापतीपद टिकविण्यासाठी मिस्टर रामराजेंनीही कंबर कसल्याचे दिसत आहे. उद्या दि. 30 मार्च रोजी मिस्टर रामराजेंच्या सभापतीपद वाचविण्याची रंगित तालीम आहे. राष्ट्रवादीचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ फलटणमधील अनंत मंगल कार्यालयात महामेळाव्याचे आयोजन केले आहे. 22 फेब्रुवारी रोजी शरद पवारांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने घेतलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीतील नाराज असलेले माण-खटावचे नेते शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खळ्ळखट्याक केले होते. हाच अपशकुन मानून शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली होती. त्यामुळे उद्या संजय शिंदेंचा होणारा मेळावा तरी मोठा व वाद विरहित व्हावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीजन करीत आहेत. मात्र 23 वर्षानंतर खासदारकीची संधी मिळत असताना बारामतीसाठी फलटणकरांच्या प्रेमाचा घोट घेणार्या मिस्टर रामराजेंना आपले पद टिकविण्यासाठी पायाला भिंगरी लावावी लागणार आहे. तर आणि तरच मिस्टर रामराजेंना आपले सभापतीपद टिकविता येणार आहे. परंतु त्यासाठी मात्र त्यांना या निवडणुकीपुरती का होईना, त्यांना माढ्याची चाकरी करावी लागणार आहे.
- संग्राम निकाळजे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |