सातारा : गेले काही दिवस सांगली, कोल्हापूरप्रमाणेच सातारा जिल्हादेखील महापुरामुळे राज्यासह देशात चर्चेत आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराच्या तडाख्याने कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले ही वस्तुस्थिती आहे. पण ही सारी धुळधान जिल्ह्याच्या पश्चिम भागात झाली आहे. दुष्काळी भागातील चित्र टोकाचा विरोधाभास दर्शवणारे आहे. तेथेही दैन्य आहे, शेतकऱ्यांसह सामान्य जनता कासाविस आहे ती पाऊस नसल्यामुळे. पश्चिमेकडे पावसाचे प्रचंड थैमान, तर दुष्काळी भागात पाऊसपाण्याचा दुष्काळ अशी तऱ्हा असल्यामुळे ऐकूणच सातारा जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा असल्याचेच अधोरेखित होत आहे.
ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध माध्यमांमध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अभूतपूर्व महापुराच्या बातम्यांनी व्यापून राहिला होता. अद्याप पूरग्रस्त या आघातातून फारसे सावरलेले नाहीत. जुलै महिना संपायला आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. कोयनेसह प्रमुख धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर होता. यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरतील की नाही याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. प्रश्न केवळ जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याचा व सिंचनाचा नव्हता, तर अन्य भागांचाही होता. मागे लातुरला रेल्वेने पाणी द्यावे लागले होते. तशी परिस्थिती निर्माण झाली आणि धरणात पाणी नसेल तर तारणार कोण हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रश्न होता.
पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. सातारा, कराड, वाई, पाटण, महाबळेश्वर, जावलीसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत गेला. हळुहळु पावसाने रूद्रावतार धारण केला. धरणे झपाट्याने भरू लागली. सुरूवातीला त्यातून पाणी न सोडताही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. संततधार, धुवाँधार, थैमान, मुसळधार हे शब्दही फिके पाडत पावसाने पश्चिम भागात अक्षरश: हाहाकार उडवून दिला. त्यामुळे धरणे ओव्हरफ्लो झाली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. ३ ते ७ ऑगस्ट या केवळ पाच दिवसात धरणात तब्बल ५०.६३ टीएमसी पाण्याची आवक झाली. वरून मुसळधार आणि धरणातून कोसळधार सुरू झाल्याने कृष्णा, कोयना, कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी, उत्तरमांड नद्या ओसंडून वाहू लागल्या. कृष्णा - कोयनेने तर अक्राळविक्राळ रूप धारण केले.
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कराड, पाटण शहरांच्या विविध भागात महापुराचे पाणी घुसले. कृष्णा - कोयना नद्यांच्या काठावरील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला. अनेक पूल पाण्याखाली जावून गावे संपर्कहीन झाली. शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. या महापुराचा सर्वाधिक फटका कराड, पाटण तालुक्यांना बसला. त्याखालोखाल सातारा तालुक्यातील कृष्णेकाठच्या गावांना महापुराची झळ बसली. ३ ते ९ ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने आजूबाजूच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. नजर अंदाजाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात प्राथमिक अहवालावरुन ३८ हजार २२४.९९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे दिसून आले. कराड, पाटण, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा तालुक्यातील ९८ गावांमधील पाणी पुरवठा योजना धोक्यात येऊन तेथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात अनेक ठिकाणी डोंगर खचण्याचे, भूस्खलनाचे संकट ओढवल्याने माळीणसारखी भयावह परिस्थिती निर्माण झाली. पाटण, कराड, वाई, महाबळेश्वर तालुक्यातील २ हजार ३७५ घरांची पडझड झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. लोकांची शेती, घरे यासोबतच रस्ते, पूल, सार्वजनिक मालमत्तांचेही कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील अनेक मार्ग प्रदीर्घकाळ बंद राहिले. अवघे जनजीवन विस्कळीत झाले. यावरून जिल्ह्यातील धुळधानीची कल्पना करता येईल.
या पावसाळ्यात आजअखेर जिल्ह्यात तालुकानिहाय झालेल्या पावसाच्या आकडेवारीवर नजर फिरवली तर पश्चिम भाग व पूर्व भाग यातील पावसाचे असमान वितरण ठळकपणे दिसून येईल. महाराष्ट्रातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील पावसाने या हंगामात तब्बल सहा हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे, तर दुष्काळी माण तालुक्यात केवळ १५५.१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जावळी २०२६.८८, पाटण १७९६.२१, सातारा १६०५.२९, कराड ९३६.९२, वाई ८३०.७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळी फलटण तालुक्यात १८५.५६, खटाव तालुक्यात ४०३.२६, खंडाळा तालुक्यात ४९७.४०, तर कोरेगाव तालुक्यात ६३३.५६ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे पश्चिम भागात ओल्या दुष्काळाचे, तर पूर्व भागात कोरड्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले असून शासनाने ही परिस्थिती समजून घेऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव उत्तर आदी भागाच्या बाबतीत तर निसर्गाची अवकृपाच पहायला मिळत आहे. निम्मा पावसाळा संपून गेला तरी या ठिकाणी पावसाचा ठिपूस नसल्याने लोक चिंताग्रस्त आहेत. जिल्ह्यात एकीकडे अतिवृष्टी असताना या भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. दुष्काळी तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी १२९ चारा छावण्या अद्यापही सुरू असून त्यामध्ये ५० हजार ४४२ मोठी, तर ६ हजार ७६६ लहान अशी एकूण ५७ हजार २०८ जनावरे आश्रयाला आहेत. या चारा छावण्यांवर आतापर्यंत ८ कोटी ९९ लाख ७ हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.
दुष्काळी भागात पाऊस नसल्याने तलाव, बंधारे कोरडे ठणठणीत आहेत. ओढेनाल्यात पाणी नाही. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पण पाऊसच नसल्याने निराशेचे वातावरण आहे. खटाव तालुक्यातील नेर धरण, येरळवाडी व अन्य तलाव, तसेच माण तालुक्यातील आंधळीसह अन्य तलावावर अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत. मात्र ऐन पावसाळ्यात त्यांनी तळ गाठल्याने पाणी योजना अडचणीत आहेत. प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही अशा विवंचनेत येथील शेतकरी आहेत. आता परतीच्या पावसाकडे त्याचे डोळे लागले आहेत. परतीचा पाऊस समाधानकारक झाला तर पाण्याचा, चाNयाचा प्रश्न सुटू शकेल, निदान रब्बी हंगाम तरी हाताला लागेल अशा आशेवर ते दिवस ढकलत आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने दैना उडवून दिली असताना जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर सुरू राहिलेला विसर्ग संकटाची तीव्रता आणखीनच वाढवत होता. त्यापेक्षा धरणांमधील पाण्याने दुष्काळी भागातील तलाव भरून घ्यावेत, जेणेकरून तेथील पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा जिल्ह्यातील लोक व्यक्त करत आहेत.
- गजानन चेणगे
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |