06:25pm | May 14, 2018 |
सातारा : २०१४ साली देशात आणि राज्यात सत्तांतर झाले. देशाच्या इतिहासामध्ये ताम्रपट घेवून उदयास आलेल्या कॉंग्रेसचा कधी नव्हे असा लाजिरवाणा पराभव या निवडणुकीमध्ये झाला. कॉंग्रेसच्या झाडावर गेली १५ वर्षे बांडगुळ म्हणून वाढलेल्या राष्ट्रवादीला गेल्या विधानसभा निवडणुकीत पन्नाशीपण गाठता आली नाही, हे स्वाभिमानी म्हणून ओळखल्या जाणार्या राष्ट्रवादीची 'शोभा' झाली होती. देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्या-झाल्या हवेचा रोख ओळखून भाजपच्या शिडाच्या जहाजावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधून मोठ्या प्रमाणावर आयात झाली. स्वत:चे मार्केटिंग कसे करायचे, यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेते माहीर आहेत. मात्र या जिल्हा भाजपातील अनपेक्षित ‘इनकमिंग’ मुळे जिल्ह्यात भाजप वाढवणारे मात्र अडगळीत पडले आहेत, असे चित्र सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे.
पूर्वीचा जनसंघ व आताचा भाजपा वाढविण्यात सातारा जिल्ह्याचा मोठा वाटा राहिलेला आहे. कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्या उपशाखा असलेल्या विविध संघटना गेल्या काही दशकांपासून सातारा जिल्ह्यामध्ये अगदी ग्राऊंड लेव्हलपासून काम करीत आहेत. स्वातंत्र्यानंतर सातारा जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची सातार्याला संधी दिली. राज्यातील ‘हेवी वेट नेते’ म्हणून जिल्ह्यातील पुढार्यांना ओळखले जात होते. पश्चिम महाराष्ट्रातील या नेत्यांमुळे विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय होतोय, अनुषेश भरुन काढावा, अशी आग्रही मागणी विदर्भ-मराठवाड्यातील नेत्यांची नेहमी राहिली आहे. १९९५ सालच्या युतीचा कार्यकाळ सोडला तर स्वातंत्र्यापासून २०१४ पर्यंत सत्ता ही कॉंग्रेसकडेच राहिलेली आहे. असे असताना सातारा जिल्ह्यातील पुढार्यांचा राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा होता. मात्र २०१४ साली सत्तांतर झाल्यानंतर नशीबच काय, परंतू घराचे वासेही फिरले. ‘जल बिन मछली’ अशी अवस्था सातार्यातील पुढार्यांची सत्तेविना झाली. सरतेशेवटी पक्षनिष्ठा वगैरे गावाच्या वेशीला टांगून कॉंग्रेस व राष्ट्रवादीजणांनी वाहत्या पाण्यामध्ये हात धुवून घेत भाजप प्रवेशाचा धडाका लावला.
एकेकाळी निवडणुकांच्या बुथवर बसण्यासाठी माणसे मिळत नव्हती, त्याच भाजपमध्ये येण्यासाठी चढाओढ लागली. खंडाळ्यातून तत्कालीन शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपमधून राष्ट्रवादीच्या श्री. छ. उदयनराजेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. यानंतरच खर्या अर्थाने जिल्ह्यातील पुढार्यांना भाजपची आस लागली. रेकॉर्डब्रेक इनकमिंग सुरु झाले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात २००४सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकवणारे डॉ. दिलीप येळगांवकर, आमदारकीची टर्म संपताच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये कोलांटीउडी मारली. राष्ट्रवादीने त्यांना मानाचे पद देवून जिल्ह्याचे नेते केले. जिहे-कटापूर, वसना-वांगणा हे येळगावकरांच्या आवडीचे विषय. परंतू राष्ट्रवादीने त्यांना फारसे ‘सिरीयसली’ न घेता त्यांना हिशोबात ठेवले. शेवटी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर येळगावकरांनीही घरवापसी करुन घेतली. थेट भाजपच्या हायकमांडशी संबंध असूनसुद्धा भाजपने येळगावकरांना आजतागायत कुजवून ठेवले आहे. हिच परिस्थिती जावली विधानसभा मतदारसंघातून आ. शिवेंद्रराजेंच्या विरोधात विधानसभा लढवणार्या दीपक पवारांची आहे. कॉंग्रेस, शिवसेना व्हाया भाजपा असा प्रवास दीपक पवारांचा राहिलेला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या घरी जावून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. परंतू एवढे होऊनसुद्धा त्यांच्या झोळीत अद्याप धोंडाच आहे. खटावमधून राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य व कारखानदार महेश शिंदे यांनी २०१४ साली सत्तांतर होणार आहे, हे अगोदरच ओळखून तत्कालीन भाजप नेते विनोद तावडेंशी संधान साधून खटावमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करुन भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांच्याशी महेश शिंदेंची व्यवसायिक भागिदारी आहे अश्या चर्चा यापूर्वी झालेल्या आहेत. मात्र असे असतानाही महेश शिंदेंचा भाजप प्रवेश अनाकलनीय आहे.
माजी आमदार स्व. जी. जी. कदम यांची जावली तालुक्यातील राजकारणावर पक्की मांड होती. शरद पवारांनाही टक्कर देण्याचे काम त्यांनी जावली तालुक्यातून केलेले होते. जी. जी. कदमांच्या निधनानंतर त्यांचे सुपूत्र अमित कदम यांना ताकद देण्याचे काम राष्ट्रवादीने केले होते. महाबळेश्वर पंचायत समिती सभापती, माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद सातारा ही मानाची पदे देवून राष्ट्रवादीने अमित कदमांचा सन्मान केला. मात्र, मतदारसंघ पुनर्रचनेत जावली सातारा तालुक्यात आल्यामुळे राजकीय समीकरणे बिघडली गेली. त्यामुळे त्यांना सातारा-जावलीचे विद्यमान आमदार यांच्याबरोबर मानापमानाच्या नाट्यावरुन फारकत घ्यावी लागली व त्यांनी भाजपचा मार्ग स्विकारला. कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे, कराड दक्षिणमधून अतुल भोसले, खंडाळ्यातून पुरुषोत्तम जाधव, फलटणमधून माजी आमदार चिमणराव कदम यांचे नातू सह्याद्री कदम, माण खटावमधून अनिल देसाई, महाबळेश्वरमध्ये नगरसेवक कुमार शिंदे, वाईतील खासदार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक विकास शिंदे या पूर्वाश्रमीच्या कॉंग्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेमधील पुढार्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेत भाजपवासी झाले. मात्र जिल्ह्यातील शेखर चरेगांवकर यांना वगळता एकालाही मानाचे पद, महामंडळ, विधान परिषद सदस्यपदी वर्णी लावण्यास भाजप हायकमांडने ठेंगा दाखवला. एरव्ही सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर पडीक असणार्या चंद्रकांतदादा पाटील यांना भाजपने प्रमोशन देवून राज्यमंत्रीमंडळावर दुसर्या क्रमांकाचे पद दिले.
तद्नंतर चंद्रकांत पाटलांची सातारा जिल्ह्यातील पत वाढली. जे नेते कॉंग्रेस व राष्ट्रवादीत असताना चंद्रकांत पाटलांना हिंग लावून विचारत नव्हते, ते अचानक चंद्रकांत पाटलांचे 'आशिक' झाले. दादा... दादा... दादा... हा गजर सातारा जिल्ह्यात वाजू लागला. मी चंद्रकांतदादांचा अमुक गावातून नातेवाईक लागतो, चंद्रकांतदादा पदवीधर मतदारसंघातून उभे असताना मी एवढी मदत केली, अशा फुशारक्या मारण्यात इनकमिंग पुढारी मश्गुल झाले. परवा भाजप नेते दीपक पवार यांनी सातार्यातील पोलीस मैदानाशेजारी असणार्या संकुलामध्ये संपर्क कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते घेतले. आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेवून दीपक पवार यांनी सातारा-जावलीमधून ‘मीच’ अशी वल्गना केली होती. दुसर्याच दिवशी दीपक पवारांच्याच जाहीर कार्यक्रमामधून चंद्रकांत पाटील यांनी दीपक पवारांची होती नव्हती तेवढी काढली. जिल्ह्याचे मालक होवू नका, मी ठरवेन तोच उमेदवार असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाणा’ अशी अवस्था दीपक पवारांची झाली होती.
कमी अधिक प्रमाणात डॉ. दिलीप येळगांवकरांपासून सह्याद्री कदमांपर्यंतची परिस्थिती ‘सेम’ आहे. बाकी भाजपातील जुन्या जाणत्या निष्ठावंतांचे या आयात पुढार्यांनी खच्चीकरण जरुर केले, मात्र एवढे होवूनसुद्धा हाती काहीच न गवसल्याने या इनकमिंग पुढार्यांचासुद्धा मोठा हिरमोड झाला आहे. भाजपा अंतर्गत सुरु असलेल्या कुरघोड्या व लाथाळ्यांमुळे भाजपा राष्ट्रवादीच्या संघटीत झंझावातासमोर किती टिकणार आहे, हे येणार्या काळात स्पष्ट होणार आहे. बाकी उदयनराजेंच्या राष्ट्रवादीतील नाराजी अस्त्रामुळे भाजपाला जर काही फायदा झालाच, तर तो त्यांचा बोनस पॉईंट ठरणार आहे. राष्ट्रवादीतून भाजपात येण्यासाठी सातार्याच्या छत्रपतींना मुख्यमंत्र्यांसह भाजप हायकमांडने रेड कार्पेट अंथरलेले आहे. उदयनराजेही दोन्ही डगरीवर पाय ठेवून आगामी निवडणुकीची व्युहरचना करण्यात व्यस्त आहेत.
ना. चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी जोर लावत आहेत, परंतू भाजपमधील बालिश पदाधिकारी मात्र दादा..ss दादा..ss असा गजर करुन चंद्रकांत पाटलांची दिशाभूल करुन भंडावून सोडत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा तुझे की माझे, यावरच भाजप पदाधिकार्यांचा कलगीतुरा रंगलेला आहे. मी किती जवळचा हे दाखविण्यामध्येच भाजपातील पुढारी आटापिटा करीत आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपली पाटी किती कोरी आहे, हे वास्तव स्विकारण्यास भाजपातील स्थानिक नेते कमी पडत आहेत.
राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही शेखर चरेगांवकर सोडता एकही मानाचे पद जिल्ह्याला अद्याप मिळालेले नाही. माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, संजय कोल्हटकर, मधु पवार, दत्ताजी थोरात, अनुराधा लिमये, राजाभाऊ देशपांडे या जिल्ह्यात भाजपा वाढविणार्या धुरिणांचाही या मानापमान नाट्यात बळी गेलेला आहे. भाजपातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची या आयात झालेल्या कार्यकर्त्यांनी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे येणार्या काळातील भाजपाचा जिल्ह्यातील प्रवास हा खडतर असणार आहे. चंद्रकांत पाटलांच्या ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ या पॉलिसीमुळे जिल्हा भाजपचा मात्र गळा दबला जातोय याचे भान मात्र कोणालाच राहिलेले नाही.
- संग्राम निकाळजे
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |