सातारा : महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारणात शरद पवार हे न उलगडलेलं कोडं होतं आणि आहे. परंतू कोणत्याही गोष्टीला ओहोटीही असतेच! पवारांची मोडस ओपरेंडी आजपर्यंत कोणालाही समजली नाही. परंतू याच मोडस ओपरेंडीची उकल जेथून पवारांचे राजकारण सुरु झाले, तेथूनच उकल व्हायला सुरुवात झालेली आहे. ‘आडवा आणि जिरवा’ ही पवारांची पॉलिसी सुमारे 20 वर्षांपूर्वी राष्ट्रीय कॉंग्रेसने त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतू हातगाईच्या लढाईत माहीर असलेल्या पवारांनी कॉंग्रेसची हीच खेळी त्यांच्यावर उलटवली होती. परंतू तोफेच्या तोंडी दिलेल्या उदयनराजेंना त्यावेळी 22 महिने कारागृहात राहून जेवढा त्रास झाला नव्हता, त्यापेक्षा जास्त त्रास ‘मिशन आडवा आणि जिरवा’ने दिलेला होता. परंतू १० वर्षांनंतर मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आज सातार्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने उदयनराजेंनी 20 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केलेला आहे.
महान सेनानी तथा रोमचा सम्राट ज्युलिएस सीझरच्या पाठीत त्याचा विश्वासू सेनापती मार्कस् ब्रुटस् याने जेव्हा खंजीर खुपसला, तेव्हा त्याचा वेदनेने विव्हळणार्या सीझरने 'अरे ब्रुटस् किमान छातीवर तरी वार करायचा, तुझ्या या जीवघेण्या खंजीराच्या वारापेक्षा तु माझ्याशी केलेल्या विश्वासघाताने मला अधिक वेदना झाल्या आहेत', असे बोलून ज्युलिएस सीझरने आपले प्राण सोडले. 1599 साली विल्यम शेक्सपिअरने लिहिलेल्या नाटकातील ही पात्रे आजच्या राजकारणातही जिवंत आहेत, हे पदोपदी जाणवते. महाराष्ट्राच्या राजकारणात खंजीर पुराण नवीन नाही. शरद पवारांनीही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन प्रयोग करुन अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसले. ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. परंतू उतार वयामध्ये ज्यांच्या-ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसले, तेच भोग पवारांच्या वाट्याला येत आहेत.
1999 साली शरद पवार लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. परंतू उत्तरेतील लॉबीला बरोबर घेवून तत्कालीन कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सरकार बनविण्यासाठी पवारांना बरोबर न घेता राष्ट्रपतींना भेटल्यामुळे पवारांची तळपायाची आग मस्तकात गेली. केसरींना घालवून याचसाठी केला होता का अट्टाहास?, असे म्हणत पवारांना कपाळावर हात मारुन घ्यावा लागला होता. परंतू प्रादेशिक पक्षांची मोळी बांधून कॉंग्रेसच्या पारड्यात टाकणार्या पवारांची उपयुक्तता त्यावेळी कॉंग्रेस अध्यक्षांना का वाटली नसावी, हे जरी कोडे असले तरी पवारांना राजकारणातून संपविण्याचा घाट दिल्लीत जोरदार शिजवला जात होता. यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील शुक्राचार्यही या कटात सहभागी होते. आता थेट लढाई रणांगणातील होती. काहीही करुन गोर्या मॅम ला धडा शिकवायचा, असा चंग पवारांनी बांधला. कॉंग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देवून राष्ट्रीयतेच्या मुद्यावरुन पवारांनी देशभरात रान उठवले. याला थेट नागपुरच्या रेशम बागेतून फूस होती म्हणे! पवारांनी कॉंग्रेसमधील आपल्या कट्टर दोस्त-यारांचा गोतावळा जमवला. परंतू ऐन लढाईत पवारांच्या बरोबर दोन-चार दखलपात्र सेनापती सोडल्यास फारसे कोण हाताला लागले नाहीत. पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांच्या जिवावर पवारांनी आपला वारु देशाच्या राजकारणामध्ये दौडवला. राजकारण, उद्योग जगत, क्रीडा, मनोरंजन जगत या क्षेत्रात पवारांच्या मुक्त संचारामुळे पवारांचा देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या असलेल्या होल्डमुळे भलेभले पवारांच्या नादाला लागत नसत. राष्ट्रीयतेच्या मुद्यावरुन पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका येवू घातलेल्या होत्या. देशात नाही, पण महाराष्ट्रात तरी पवार फॅक्टर चालतोच, हे पवारांनी कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले, विलासराव देशमुख व चिमणराव कदमांना घरी बसवून दाखवून दिले होते. 1999 च्या विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम सुरु असताना शरद पवारांनी सातारा जिल्ह्यात मोठा गोतावळा जमवला होता. फलटणचे नाईक-निंबाळकर, अकलुजचे मोहिते-पाटील, सातार्याचे छत्रपती, पाटणचे सरदार-पाटणकर अशी सरंजाम्यांची फौज पवारांनी सातार्यातून उभी केली होती. साखर कारखानदारी सहकाराच्या माध्यमातून पवारांनी या मंडळींवर अंकुश ठेवलेला होता. कोणाला, कोठे, कधी, कसे दाबायचे याचे अचूक टायमिंग पवारांना माहित होते. कोणाशीही चालेल, पण पवारांशी पंगा म्हणजे 'चौराहे पे नंगा', अशी भीती महाराष्ट्रातील तत्कालीन राजकीय पुढार्यांना होती. मनाने नाही, परंतू तनाने अनेकजण पवारांबरोबर होते. परंतू पवारांच्या नवख्या राष्ट्रवादीची भ्रृणहत्त्या करण्याचे कॉंग्रेस हायकमांडने योजले होते. याबाबतच्या अनेक बैठकाही पुणे-मुंबईत झडल्या होत्या. पवारांबरोबरच्या सरंजाम्यांना कॉंग्रेसने गळाला लावले होते. याचा नेता म्हणून तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंचे खास दोस्त समजले जाणार्या उदयनराजेंना फिक्स केले होते. पवारांच्या विरोधात त्याचवेळी उदयनराजेंनी शड्डू ठोकला होता. परंतू आडवा आणि जिरवा-जिरवीच्या राजकारणात माहीर असणार्या शरद पवारांना कॉंग्रेसच्या या षडयंत्राची अगोदरच कुणकुण लागल्यामुळे पवारांनी आवाज टाकला, 'खबरदार, माझ्याशी गद्दारी कराल तर आयुष्यातून उठाल', अशी तंबी दिल्याबरोबरच या सरंजाम्यांनी शेपूट घातले. शेवटी उदयनराजेंना तोफेच्या तोंडी देवून ही दगाबाज लॉबी पवारांच्या सदर्याखाली जावून लपली. तेव्हापासून उदयनराजे या दगाबाज लॉबीपासून चार हात लांब राहत होते. आडवा आणि जिरवा जिरवीच्या राजकारणात त्यावेळी मात्र उदयनराजेंचीच जिरली होती. परंतू उदयनराजे संधीची वाट पाहत होते. सावज टप्प्यात येताच उदयनराजे बार टाकणार, हे नक्की होते. 'लेकीन वक्त का तकाजा भी देखो, शरद पवारांसह ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उदयनराजेंना नेहमी पाण्यात पाहिले, त्याच उदयनराजेंना भाजपा व्हाया कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत घ्यावे लागले व 2009 व्या लोकसभा निवडणुकीचे तिकिटही द्यावे लागले. भूमाता दिंडी आडून डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या बाणाने शरद पवारांचा नेमका वेध घेतला होता. पवारांकडे पर्याय नव्हता. उदयनराजेंना डावलले तर सीट हातातून जाईल, या एकाच विचाराने राष्ट्रवादीतून विरोध असतानाही शेवटी उदयनराजेंना तिकिट द्यावे लागले, हा इतिहास आहे.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री वायबी तथा यशवंतराव चव्हाणांचे शरद पवार पट्टशिष्य. परंतू वायबींच्या सत्तेच्या विकेंद्रीकरणातून शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय क्षीतिजावर उदयास आले. परंतू वायबींच्या बहुजनवादी विचारांचा मुडदा मात्र शरद पवारांनीच पाडला. बहुजन समाजातील मुले राजकारणात आली तरच लोकशाही तग धरेल, अशी आशा वायबींची होती. परंतू पवारांचे राजकारण मात्र परस्पराभिन्न राहिले. वायबी चव्हाणांनी सातारा जिल्ह्यातील सरंजाम्यांना दाबून ठेवले. बहुजन समाजातील मुलांना आमदार, खासदार, मंत्री बनवले. मात्र, पवारांनी अशांचे खच्चीकरण करुन त्यांना घरात बसवले. परंतू जिल्ह्यातील सरंजाम्यांना सत्तेची कवाडे सताड उघडी ठेवली. परिणामी बहुजन रुतले, तर सरंजामी उतले अशी परिस्थिती सातार्यासह राज्याच्या राजकारणाची झाली. जी खेळी तत्कालीन राष्ट्रवादीजनांनी उदयनराजेंच्या बरोबर खेळली होती, तीच खेळी उदयनराजे सध्या खेळत आहेत. परवा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप सुप्रिमो अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या उदयनराजेंच्या पक्षीय उल्लंघनाचा कार्यक्रम डामडौलात झाला. प्रादेशिक तसेच राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याची मोठी दखल घेतली. थेट शिवछत्रपतींचेच वंशज गळाला लागल्यामुळे राज्यातील भाजपेयींसह दिल्लीश्वरही खुषीत होते. उदयनराजेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अरेरेऽऽऽ छत्रपती मोघलांना मिळालेऽऽऽ असा दैनिक सामनाचा अग्रलेख होता. परंतू ज्या शिवछत्रपतींनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देवून आगर्याच्या कैदेतून स्वत:ची सुटका करुन घेतली, तेथून जवळपास तासाभराच्या अंतरावर असणार्या दिल्लीमध्ये शिवछत्रपतींच्या थेट वंशजाने पुन्हा भाजपात प्रवेश केला. दिल्लीचे तख्त फोडणार्या मराठ्यांच्या गादीचे वंशज स्पेशल चार्टर विमानाने दिल्लीत गेले. कधी नव्हे असा पक्षांतराचा सोहळा दिल्लीमध्ये पार पडला. थेट उदयनराजे भाजपात येताहेत म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले. 2 वर्षापूर्वी खासदार उदयनराजेंच्या वाढदिवस सोहळ्यावर राष्ट्रवादीजनांनी बहिष्कार टाकलेला होता. कळीचा नारद समजल्या जाणार्या सभापती मिस्टर रामराजेंनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना डोस भरला होता. उदयनराजेंच्या वाढदिवसाला जाल, तर खबरदार. दस्तुरखुद्द पवारांच्या उपस्थितीत सुद्धा मिस्टर रामराजेंसह इतर आमदारांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी उदयनराजेंना हेरले. सातार्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजुरी देवून करोडोंच्या विकासकामांना व्यासपीठावरुनच मंजुरी दिली. त्याचवेळी उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी अटकळ बांधली जात होती. परंतू उदयनराजेंनी हवेचा अंदाज घेतला. तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे भाजपवासी होणार असा कयास अनेकांनी बांधला. परंतू उदयनराजेंना अनेक हिशोब चुकते तर करायचेच होते. त्याचबरोबर अनेकांची जिरवायची सुद्धा होती.
येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला अभूतपूर्व अशी गळती लागलेली आहे. जे पाप कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आजपर्यंत केले, ते पाप त्यांना आता व्याजासह फेडावे लागत आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा, ही ब्रिटीश नीती पवारांनी आजपर्यंत अवलंबली. मात्र हीच नीती आता पवारांवर बुमरँग होतेय. पवारांची राजकीय मोडस ओपरेंडी आता आधुनिक युगात कालबाह्य झाली आहे. पवारांनी खंजीराचा आधार घेवून अनेकांची राजकीय कारकीर्द संपवली. ती लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या उदयनराजेंनी अवघ्या तीन महिन्यांत राजीनामा देवून उरलीसुरली राष्ट्रवादीही संपवलेली आहे. उद्विग्णमनाने शरद पवार आज राज्यभर फिरत आहेत. हे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना निश्चितच क्लेशदायक बाब आहे. परंतू पर्याय नाही. जे पेराल, तेच उगवणार ही रीत आहे. 2009 पासून 2019 पर्यंत उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून तिकिट देणे ही पवारांची परिहार्यता नव्हे तर अपरिहार्यता होती. कारण उदयनराजेंना डावलल्यास राष्ट्रवादीची सातारची जागा जाणार, हे पवारांना माहित होते. परंतू पवारांनी पोसलेल्या फलटण नरेशांमुळे तसेच शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशामुळे उदयनराजेंना सातार्यातील स्वत:चे राजकारण टिकविण्यासाठी भाजप प्रवेश करणे गरजेचे होते. परंतू उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील अनेक मातब्बरांची राजकीय गणिते बिघडलेली आहेत. सासू नको म्हणून वाटणी मागितली आणि सासूच वाट्याला आली, अशी परिस्थिती उदयनराजे विरोधकांची झालेली आहे. पवारांच्या विरोधात सुमारे 20 वर्षापूर्वी राष्ट्रवादीतील ज्या सरंजाम्यांनी उदयनराजेंना तोफेच्या तोंडी दिले, त्याच उदयनराजेंनी आज महाजनादेश यात्रेच्या सभेत हिशोब चुकता केलेला आहे. उदयनराजेंचे जे पोटात, तेच ओठात. यामुळेच त्यांची महाराष्ट्रात लोकप्रियता आहे. सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण. शिवछत्रपतींची राजधानी. मात्र बारामती-सातारची तुलना केल्यास सातारा हे बारामतीसमोर एक सुधारित खेडंच. पवारांनी तीन-चार दशकाच्या राजकारणात सातारचा केवळ वापर करुन घेतला. परंतू ज्यावेळी सातारसाठी आणि सातार्याच्या विकासासाठी काही देण्याची वेळ आली त्यावेळी पवारांनी आखडता हात घेतला. उदयनराजे सत्ताधारी पक्षाचे खासदार असताना सातार्याच्या विकासाची कामे झाली नाहीत, तीच कामे विरोधी पक्षाचे खासदार असतानाही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली, असे म्हणत उदयनराजेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. येत्या काळात ज्यांनी-ज्यांनी शरद पवारांच्या आडून उदयनराजेंची राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला, त्याच लोकांनी स्वत:च्या कर्माने त्यांची राजकीय कारकीर्द संपवलेली आहे. माजी खासदार स्वर्गवासी लक्ष्मणराव पाटील यांच्या नंतर शरद पवारांना एकही एकनिष्ठ कार्यकर्ता गवसलेला नाही. फलटण नरेशांना शरद पवारांनी कायमच झुकते माप दिले, परंतू जिल्ह्याचा नेता होण्याच्या नादात या फलटण नरेशाने आख्खी राष्ट्रवादी संपवली, हे शेवटपर्यंत शरद पवारांना कळले नाही. विधान भवनात बसून गुप्त बैठका घेवून पहिला माझा नंबर म्हणणार्या फलटण नरेशांना नियतीने धडा शिकवला. ज्यांना सतत पाण्यात बघितले, असे लोक खासदार झाले. मात्र आता धोबी का कुत्ता न घर का ना घाट का, अशी परिस्थिती फलटण नरेशांची झालेली आहे. मात्र, ज्या सरंजाम्यांनी व फलटण नरेशांनी 20 वर्षांपूर्वी पवारांच्या विरोधात उदयनराजेंना उभे केले, त्याच उदयनराजेंनी 20 वर्षांपूर्वी तोफेच्या तोंडी दिलेल्यांचा हिशोब 'मिशन आडवा आणि जिरवा' महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पूर्ण केला आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |