11:38pm | Dec 31, 2018 |
सातारा : २० डिसेंबर रोजी अहमदनगर येथे आपल्या न्याय व हक्कांसाठी झगडणार्या तौसीफ शेख या इसमाने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नामध्ये तौसीफ शेख ७० टक्के भाजले होते. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. अधिकार्यांच्या 'कोडग्या' नीतीमुळे सामान्य माणसांचा जीव स्वस्त झाल्याचे चित्र या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. ब्रिटीशांनी लाजून मान खाली घालावी, अशी परिस्थिती नोकरशहांमुळे महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे.
ज्यांना आपण राष्ट्रपिता मानतो, ज्यांचा पदोपदी उल्लेख करतो, अशा महात्मा गांधींनी अहिंसेचे व उपोषणाचे हत्त्यार उपसून ब्रिटीशांना हादरुन सोडले होते. रक्तहीन क्रांतीद्वारेसुद्धा महासत्तेला हादरवता येते, हे महात्मा गांधींनी आपल्या कृतीतून सिद्ध करुन दाखवले होते. १९४७ ला देश स्वतंत्र झाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही १५ ऑगस्ट १९४७ पासून भारतात नांदू लागली. परंतू काही दिवसांतच गोरे साहेब परवडले, परंतू हे काळे साहेब नको रे बाबा, असे चित्र देशभर निर्माण झाले. बाबुगिरीच्या आणि नोकरशहांच्या जोखडाखाली हा देश पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेला आहे, याची प्रचिती पदोपदी येत आहे. आसाम रायफल्सने २ नोव्हेंबर २००० साली दहा निर्दोष लोकांची हत्त्या केल्याचा निषेधार्थ तसेच १९५८ पासून अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपुर, आसाम, नागालँड, मिजोरम आणि त्रिपुरा येथे लागू केलेल्या 'आर्म्ड फोर्स स्पेशल पावर एक्ट (एएफएसपीए) रद्द करावा या मागणीसाठी मणिपूर येथील सामाजिक कार्यकर्ती असलेल्या इरोम चानू शर्मिला या तरुणीने ४ नोव्हेंबर २००० अन्नपान्याविना तब्बल पंधरा वर्षे उपोषण केले. शेवटी कोडग्या नोकरशहा तसेच सत्ताधार्यांमुळे शर्मिलाला आपले उपोषण पंधरा वर्षांनंतर म्यान करावे लागले होते. त्यामुळे नितीमत्तेच्या गप्पा मारणारे नोकरशहा किती संवेदनाहीन असतात, हे अलिकडच्या काही गोष्टींमधून प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
गेल्या महिन्यामध्ये फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे आपल्या विरोधात झालेल्या अन्यायाच्या विरोधात व विविध मागण्यांसाठी ६ दिवस उपोषणास बसले होते. त्यांच्या मागण्याही रास्त आणि संविधानिक होत्या. मात्र असे असतानाही प्रशासन राजकीय पुढार्यांच्या दबावासमोर झुकले व सनदशीर मार्गाने चाललेले लोकशाहीला अभिप्रेत असणारे असे हे उपोषण प्रशासनाने पोलिसांकरवी चिरडून टाकले. खरे-खोटे हे जनतेला कळत असते. कारण ये पब्लिक है, जो सब जानती है ! कोडग्या आणि भ्रष्ट नोकरशहांमुळे आज संपूर्ण सातारा जिल्ह्याचे वाटोळे झाले आहे. माणूस आपल्या मागण्या सनदशीर मार्गानेसुद्धा मागू शकत नाही. मागितल्यास त्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, अडचणीत आणणे आदी प्रक्रिया संबंधितावर राबविल्या जातात. दर आठवड्याला सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकजन आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषणास बसलेले असतात. परंतू यातील कितीजणांना न्याय मिळतो ?, हा खरेतर संशोधनाचा विषय आहे. यावर एखाद्याने 'पीएचडी' केली असता निश्चितपणे डॉक्टरेट मिळू शकते. एवढे गंभीर विषय सातार्यामध्ये घडत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राज्याचे पहिले मुख्यमंत्री वाय. बी. चव्हाणांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमिची कोडग्या नोकरशहांनी पूर्णत: वाट लावली आहे. दर महिन्याला सातारा जिल्ह्यात लोकशाही नांदत आहे, हे दाखविण्यासाठी लोकशाही दिनाचा फार्स करण्यात येतो. परंतू या दिनात कितीजनांना न्याय मिळतो ?, याचा आकडा जिल्हा प्रशासनाने जाहीर करावा, अशी मागणी आता होवू लागली आहे.
सध्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशात नोकरशहांच्या आणि सत्ताधारी पुढाऱ्यांच्या बेबंदशाहीमुळे लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सामाजिक हक्क अधिकार धोक्यात आहेत. उपोषणे, आंदोलने, मोर्चे हे सदृढ लोकशाहीचा एक भाग आहे. आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बोलले तर पाहिजेच. त्याशिवाय कळणार कसे? त्यामुळे या बोलण्यावरच आता मर्यादा येवू लागल्या आहेत. बोलणार्यांचा आवाज दाबला जात आहे. भ्रष्ट पुढार्यांच्या दावणीला बांधलेल्या जिल्हा प्रशासनाला सद्बुद्धी यावी. अनेक क्रांतींची सुरुवात सातार्याच्या भूमितून झाली आहे. अनेक तख्त आणि सत्ता सातार्यातून पलटवल्या गेल्या आहेत. ज्या छत्रपती शाहूंच्या आदेशाने मराठ्यांनी अटकेपर्यंत झेंडे फडकवले, तो आदेशही सातार्यातून देण्यात आला होता. दिल्लीतील पातशाहीचे प्रतिक असणारे लाल किल्ल्यातील तख्तही पेशव्यांनी सातारच्या छत्रपतींच्या आदेशानेच फोडले होते. अशा क्रांतीकारी भूमिमध्ये नोकरशहांनी किती उन्माद केला पाहिजे, हेही ठरवले पाहिजे. कारण एकदा का हिशोब चुकता करायची वेळ आली, तर भल्याभल्यांची फाटते. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी न उतता, न मातता आपले कर्तव्य बजावले पाहिजे. न्याय हक्कांसाठी सनदशीर मार्गाने उपोषणे व आंदोलने करणार्यांची दखल घ्यायला पाहिजे. २० डिसेंबरला अहमदनगर येथे घडलेला प्रकार अधिकार्यांच्या 'कोडग्या' वृत्तीमुळे घडलेला आहे. दिगंबर आगवणे प्रकरणातही प्रशासनाने अक्षम्य संवेदनहीनता दाखवली आहे. शेवटी न्यायदेवता या सर्व प्रकरणांची दखल घेत असते. मात्र, देर आये दुरुस्त आये, याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने वेळीच शहाणे व्हावे. अन्यथा 'एल्गार' पेटण्यास वेळ लागणार नाही. सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आता एक पाऊल पुढे टाकावेच लागणार आहे.
-संग्राम निकाळजे
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |