सातारा : कोरेगाव, जि. सातारा येथील पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्यावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाणे वार्षिक तपासणी दरम्यान कामकाजात त्रुटी आढळल्याने अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून निलंबित केले होते. एक कर्तव्यदक्ष, हुशार, चाणाक्ष अशा अधिकार्याला पक्षपातीपणे कारवाई करुन निलंबित करण्यात आल्यामुळे जिल्हा पोलीस दलामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमागे कोणाची ‘प्रेरणा’ होती? हे पोलीस दलातील साधा शिपाईही सांगू शकतो. त्यामुळे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रेंवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विश्वास नांगरे पाटील यांनी केलेली कारवाई म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी देण्यासारखी आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे हा तसा मोकळा ढाकळा माणूस. जे पोटात, तेच ओठावर. कागदांशी खेळणार्या या माणसाने तोंडी सांगितलेल्या गंमती-जंमतीवर कधीही विश्वास ठेवला नाही. याची जबर किंमत या माणसाला आपल्या निलंबनाच्या रुपाने मोजावी लागलेली आहे. 24 जून 2017 रोजी शिरवळ पोलीस ठाण्यातून म्हेत्रे यांची कोरेगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती. परंतू कोणाच्या तरी ‘प्रेरणेवरुन’ संभाजी म्हेत्रे यांचा काटा काढून त्यांना कोरेगावच्या ठाणेदार पदावरुन ‘कटवून’ त्याठिकाणी आपल्या मर्जीतील हरकाम्या अधिकार्याची वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावली गेली होती. या जाळ्यात संभाजी म्हेत्रे अलगद सापडले. म्हेत्रे यांच्याविरोधात प्रशासकीय कामकाजात त्रुटी असल्याचा अहवाल कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या कार्यालयातून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार म्हेत्रे यांचे निलंबन झाल्याचे कागदोपत्री रंगविण्यात आले होते. परंतू संभाजी म्हेत्रेंसारख्या कार्यक्षम अधिकार्यावर ‘बार्टर सिस्टम’चा भाग न बनल्यामुळे व वैयक्तिक राग मनात ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची चर्चा पोलीस दलात त्यावेळी दबक्या आवाजात ऐकावयास मिळत होती.
पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे हे 1992 साली पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर शहर, पुणे शहर, एसपीओ पुणे, ठाणे शहर, मुंबई शहर, सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी तसेच नागपूर ग्रामीण येथे उत्कृष्ट पद्धतीने सेवा बजावल्यानंतर फेब्रुवारी 2017 रोजी ते सातारा जिल्ह्यात पुन्हा नियुक्तीवर आले. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हा विशेष शाखेचा तसेच 2014 साली पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा कार्यभार समर्थपणे पेलला. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट 2015 ते मे 2017 पर्यंत शिरवळ येथे नुकत्याच सुरु झालेल्या पोलीस ठाण्याचा कार्यभार सक्षमपणे हाताळलेला आहे.
जिल्ह्यात सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांची वाणवा आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना गुन्ह्याच्या स्वरुपानुसार पोलीस ठाणे नेमून देण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाची कमतरता असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्यांना ठाणेदार म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांना तुलनेने दीर्घ पोलीस सेवेचा अनुभव नसल्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळताना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या नवख्या पोलीस अधिकार्यांची संपूर्ण पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळताना मोठी दमछाक होत असते.
जिल्ह्यात कराड शहर- तालुका, सातारा शहर- तालुका, फलटण शहर- ग्रामीण ही जिल्ह्यातील लोकसंख्येच्या व गुन्हेगारीच्यादृष्टिने सर्वात मोठी व किचकट पोलीस ठाणी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार अशा पोलीस ठाण्यात पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात येते. परंतू असे असतानाही संभाजी म्हेत्रेंसारख्या कार्यक्षम अधिकार्यांवर कोणाच्या प्रेरणेने कारवाई करण्यात आली, याचे उत्तर सातारा पोलिसांना आता द्यावे लागणार आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांची पोलीस दलात प्रदीर्घ सेवा झालेली आहे. या त्यांच्या सेवाकाळात त्यांना 200 पेक्षा अधिक रिवॉर्ड (बक्षिसे) मिळालेली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ (युनो)ची खडतर परीक्षा देवून म्हेत्रे यांनी मध्य युरोपातील सर्बिया या देशातील 'कोसोव' येथे भारताचे प्रतिनिधीत्व करीत तेथील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सुमारे एक वर्ष जिवाची तमा न बाळगता कर्तव्य बजावलेले आहे. याठिकाणी भारताकडून कर्तव्य बजावल्यामुळे त्यांना त्यासाठी रिवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत.
सर्बिया हा देश गृहयुद्धामध्ये जळत असताना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे भारतातील केवळ पाच अधिकारी याठिकाणी कर्तव्य बजावत होते. परदेशात जावून आपल्या कामाचा ठसा उमटविलेल्या या कर्तव्यदक्ष अधिकार्यावर कोरेगावसारख्या दुय्यम दर्जाच्या पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळत असताना त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे.
जिल्ह्यात हटावो लुंगी, बजाओ पुंगी या राजवटीनंतर डॉ. अभिनव देशमुख यांच्यासारखा कर्तव्यदक्ष पोलीस प्रमुख सातारा जिल्ह्याला लाभले. आपल्या कामाचा 'देशमुखी' ठसा उमटविल्यानंतर त्यांच्या ठिकाणी गडचिरोली येथून नक्षल्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या संदीप पाटील यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा जिल्ह्याला लाभला. डॉ. अभिनव देशमुख यांचा कित्ता गिरवित संदीप पाटील यांनीही जिल्ह्यातील गुंडापुंडांच्या पुंग्या टाईट केल्या. मी-मी म्हणणार्या अनेक राजकीय 'माईच्या लालांना' त्यांनी आपला 'इस्लामपुरी' हिसका दाखवला. जिल्ह्यात कधी नव्हे अशी तडीपारी व मोक्क्याचे द्विशतक त्यांनी पूर्ण केले आहे.
असे असताना कोणाच्यातरी कटावरुन कोरेगाव पोलीस ठाण्याचा दादासाहेब ‘कटाप्पा’ बनविण्यासाठी कोरेगावच्या वरीष्ठ अधिकार्यांनी भलतीच ‘प्रेरणा’ घेतल्यामुळे संभाजीरावांचा बळी गेलेला आहे. म्हेत्रे यांच्या काळात प्रतिबंधक कारवाया, दारुबंदी, एमपीडीए अंतर्गत कारवाया झालेल्या असतानाही त्यांच्यावर काल परवा पोलीस खात्यात दाखल झालेल्या 'पोरसवदा' अधिकार्याने अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांची दिशाभूल केली आहे.
संभाजी म्हेत्रे हा माणूस सांगी-वांगीवर विश्वास ठेवत नाही, कागदावर लिहिलेल्या पुराव्यांवरच विश्वास ठेवतो. कदाचित हाच हेका संभाजीराव म्हेत्रेंच्या निलंबनास कारणीभूत ठरला असावा. ज्यावेळेस म्हेत्रे पोलीस दलात दाखल झाले, त्यावेळी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचणारे हेच अधिकारी पाठीवर दप्तर घेवून शाळेत जात होते. शेवटी भारतीय संविधान खुर्चीला मान्यता देते. त्यामुळे आपली लोकशाही टिकलेली आहे. कोणी मोठा कोणी छोटा हे आपले संविधान मानत नाही. कोणीही ‘दादासाहेब’ आला आणि त्याची ‘प्रेरणा’ घेवून कोणी दडपशाही करीत असेल तर ते लोकशाहीमध्ये कदापिही चालणार नाही. पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे राज्य पोलीस दलात ‘जाणते’ म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यातील शोषित, वंचित पिडितांना संपूर्णपणे न्याय देण्याची भूमिका घेणार्या संदीप पाटील यांनी संभाजीराव म्हेत्रेंनाही न्याय द्यावा, अशी मागणी राज्यातील पोलीस दलातून होवू लागली आहे.
- संग्राम निकाळजे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |