-संग्राम निकाळजे
सातारा : राज्यात सुमारे 5 वर्षानंतर भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला यश आले. हिंदुत्वाच्या मुद्यावरून पाच वर्षे हातात हात घालून काम करणार्या भाजप-शिवसेनेला सत्तेच्या वाटाघाटी न जमल्याने त्यांनी अखेर भरल्या संसाराचा काडीमोड केला. गेल्या पाच वर्षात जल बिन मछली अशी अवस्था कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झाली होती. अखेर राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी पुढाकार घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डाव त्यांच्यावरच उलटवून 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राच्या 19 व्या मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात घातली.
ठाकरे परिवाराचे मुकूटमणी, प्रसिद्ध साहित्यिक, समाजसुधारक, प्रबोधनकार ठाकरेंचे सातारा जिल्ह्यातील सातारारोड येथे काही वर्षे वास्तव्य होते. तो काळ पारतंत्र्यातील होता. परंतु पारतंत्र्यात असूनही जिल्ह्यातील किर्लोस्कर, कूपर आणि कल्याणी या कुटूंबियांनी सातारारोड सारख्या ग्रामीण भागात औद्योगिकीकरणाच्या उत्क्रांतीला सुरुवात केली होती. त्यामुळे साहजिकच राज्यातील साहित्यिक, समाजवादी विचारांच्या लोकांचे विसावण्यासाठी सातारारोड हे हक्काचे ठिकाण झाले होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची, चळवळीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम त्या काळामध्ये केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे, ज्योत्याजीराव फाळके, ग. दि. माडगुळकर, साने गुरुजी यांनी सुरु ठेवले होते. प्रबोधनकारांनी आपल्या विपुल अशा साहित्य निर्मितीबरोबरच अस्पृश्यता निवारण, बालविवाह, हुंडा प्रथा अशा विविध चळवळी चालवल्या. नंतरच्या काळात ते पुन्हा मुंबईत गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये त्यांचे पूत्र बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या कार्यकर्तृत्वाची चमक दाखवायला सुरुवात केली होती.
मुळातच साहित्याचे बाळकडू मिळाल्यामुळे बाळासाहेब पत्रकार, व्यंगचित्रकारिता अशा विविध आघाड्यांवर अव्वल होते. पुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटलांच्या पुढाकाराने बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन केली. पुढे हा चढता लेख शिवसेनेने कमी होवू दिला नाही. मुंबई महानगरपालिका ताब्यात घेवून शिवसेनेने त्या काळामध्ये कॉंग्रेससारख्या पक्षाला धूळ चारण्याचे काम केले. 1995 साली शिवसेना - भाजपने राज्यात सत्ता स्थापन करुन विधानभवनावर भगवा फडकविण्याचे काम केले. परंतु आपले मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या माध्यमातून विरोधकांवर आसूड ओढण्याचे काम सुरुच ठेवले. 1999 नंतर म्हणजेच तब्बल 14 वर्षानंतर शिवसेना-भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. परंतु त्यावेळी मोठा असणारा भाऊ भाजपच्या मोदी लाटेत छोटा झाला. परिणामी भाजपने मंत्रिमंडळातील टुकार खाती देवून शिवसेनेची बोळवण केली होती. त्याचवेळी खरेतर शिवसेनेच्या डरकाळी फोडणार्या वाघाचे दात घशात घालण्याचे काम केले होते. गेल्या पाच वर्षात शिवसेनेने लंगडत-लंगडत का होईना, भाजपबरोबर घरोबा केला. परंतु धुसफूस, खंजीर, ढाल, तलवार, वाघनखे, बिचवा, विश्वासघात या शब्दांनी मात्र महाराष्ट्रातील युतीला घायाळ करण्याचे काम केले. अंतर्गत धुसफूस होतीच, परंतु सत्ता काबीज करण्याच्या नादात 2019 च्या निवडणुकीत युती-आघाड्या तुटल्या नाहीत. त्यामुळे भाजप-105, शिवसेना-56 असे मिळून बहुमतासाठी 145 चा आकडा मिळूनही शिवसेना अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर हटून बसली. मोदी-शहांनी मध्यस्थी करुनही फारसे काही हाशील झाले नाही. शेवटी पवारांनी नातेसंबंधाच्या माध्यमातून डाव साधला. आणि राज्यात 28 नोव्हेंबर 2019 ला कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु हे सरकार स्थापून तीन महिन्याच्या आतच कोरोनासारख्या भयानक विषाणूने देशात व राज्यात शिरकाव केला. त्यामुळे देशासह राज्यातीलही संपूर्ण लोकजीवन घरात बंदिस्त झाले. अभूतपूर्व अशा टाळेबंदीमुळे संपूर्ण जगाचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्यातरी कोरोना या विषाणूला रोखण्यासाठी कोणत्याही औषधाची निर्मिती झाली नसल्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी घरात बसून संसर्ग टाळणे या एकमेव उपायाची मात्रा कोरोनाला लागू होत आहे.
कोरोनामुळे राज्य सरकारची दमछाक झाली आहे. त्यात केंद्र शासन निधीच्या माध्यमातून राज्य शासनाची कोंडी करीत आहे. 24 मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, या 21 दिवसांमध्येही कोरोनाला रोखण्यात केंद्रासह देशातील राज्य सरकारेही कमी पडली. नाईलाजाने 14 एप्रिल रोजी पंतप्रधानांना लॉकडाऊनचा कार्यकाळ 03 मे पर्यंत करावा लागला. मात्र या लॉकडाऊनमध्येही गेल्या काही दिवसांत गमतीजंमती घडल्या. लॉकडाऊनमध्ये गेले 26 दिवस देशातील सामान्य नागरिक घरात बसून कोरोनाचा सामना करीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीचा अपवाद सोडल्यास कोणीही रस्त्यावर फिरण्याचे धाडस दाखवत नाही. कारण पोलिसाचा दंडुका पार्श्वभागावर बसण्याची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेली आहे. परंतु असे असतानाही सरकार आणि नोकरशहा पाठीशी असतील तर या देशातील धनदांडगे काहीही करु शकतात. ते मुंबई येथील उद्योगपती कुटूंबीय वाधवान यांच्यामुळे समोर आले. 10 एप्रिलच्या रात्री वादग्रस्त व आर्थिक घोटाळ्यात संबंध असलेले कपिल व धीरज वाधवान आपल्या कुटूंबियांसमवेत 23 जणांच्या नोकर-चाकरांच्या कबिल्यासहित महाबळेश्वरात धडकले. लोणावळा-महाबळेश्वर हे 180 किमी. चे अंतर राज्याच्या गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या एका पत्रावर कापले. पाच अलिशान गाड्या पुणे ग्रामीण, पुणे शहरच्या हद्दी ओलांडून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरात धडकल्या. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट वाधवाननी शक्य करुन दाखवली. या देशामध्ये नोकरशहा व राजकीय पुढार्यांचा वरदहस्त असेल तर काहीही शक्य आहे, हे महाबळेश्वर प्रकरणावरुन लोकांना समजून आले. परंतु वाधवान या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही, असे म्हणत राज्य सरकारने या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी वाधवान प्रकरणात अनेक मंत्र्यांचे हात बरबटलेले आहेत. अमिताभ गुप्ता यांना फक्त राज्य सरकारने बळीचा बकरा बनविलेला आहे. यासंदर्भात थोडे खोलात जाण्यासाठी आपल्याला काही काळ मागे जावे लागणार आहे.
1947 साली भारत-पाकिस्तानची फाळणी झाली. भारतातून अनेक कुटूंबे पाकिस्तानात स्थलांतरित झाली, तर पाकिस्तानातील हिंदू सिंधी व पंजाबी कुटूंबे भारतात आली. पंजाब, दिल्ली, हरियाणात अनेक पंजाबी कुटूंबियांचे नातलग असल्यामुळे पाकिस्तानात राहणारे अनेक पंजाबी या राज्यांमध्ये स्थिरावले. मात्र, कराची व सिंध प्रांतातून भारतात आलेला सिंधी समाज मात्र त्या काळात मुंबईतील उल्हासनगर, कल्याण, चेंबूर तसेच विक्रोळी येथील सरकारने उभारलेल्या तात्पुरत्या कॅम्पात राहू लागले. यामध्ये एका व्यक्तीचा समावेश होता. तो म्हणजे दिवाण कुलदिपसिंह वाधवान. म्हणजेच सध्या चर्चेत असणार्या कपिल व धीरज वाधवानचे आजोबा. दिवाण कुलदिपसिंह वाधवान यांना राजेश आणि राकेश ही दोन मुले. 1984 साली राजेश वाधवान यांनी डीएचएफएल (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.) नावाच्या कंपनीची स्थापना केली, तर राकेश वाधवान यांनी 1996 साली एचडीआयएल (हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.) या कंपनीची स्थापना केली. एक फायनान्स, तर दुसरी बांधकाम व्यवसायातील कंपनी. या दोन्ही कंपन्यांनी कमी कालावधीमध्ये व्यवसायाच्या दृष्टीने उत्तुंग झेप घेतली. अनेकांनी या दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधींचे शेअर्स खरेदी केले. काही वर्षातच या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हजारो कोटींमध्ये होवू लागला. परंतु न्यूटनच्या सिद्धांतानुसार जेवढ्या वेगाने वर जाणार, त्याच्या दुप्पट वेगाने खाली येणार... त्याच पद्धतीने डीएचएफएल आणि एचडीआयएलही बँकांमध्ये केलेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहारामुळे गोत्यात आल्या. त्यामुळे जनमाणसाच्या पैशावर मजा मारणार्या वाधवान कुटूंबियांच्या पाठिमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला. परंतु महाबळेश्वर प्रकरणानंतर वाधवान प्रकरण देशभरात चांगलेच गाजले. परंतु एक हाताने टाळी कधीच वाजत नाही. वाधवानचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना या पक्षांतील सुप्रिमोंबरोबर अनेक वर्षांपासूनचे मधूर संबंध आहेत. धीरज व कपिल यांचा खास दोस्त व बिझनेस पार्टनर उद्योजक अविनाश भोसले यांचे शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध आहेत. 1995 ते 99 या युती शासनाच्या कार्यकाळामध्ये कृष्णा खोरे महामंडळाची हजारो कोटींची कामे शिवसेनेने अविनाश भोसले यांना दिली होती. या कामांमुळे एक साधा कॉन्ट्रॅक्टर असणारे भोसले कमी कालावधीतच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये पोहोचले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे कायमच महाबळेश्वरला आल्यानंतर भोसलेंच्या फोर ओक्स या बंगल्यात थांबतात. दरवर्षी उन्हाळ्यात ठाकरे कुटूंबियांचा हाच शिरस्ता आहे. त्यामुळे ठाकरे, भोसले आणि वाधवान या लिंकबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही.
फार वर्षापूर्वी कुर्ल्यामध्ये प्रिमियर पद्मिनी या कंपनीचा कार निर्मितीचा कारखाना होता. कालांतराने भारतीयांसाठी अतिशय प्रतिष्ठेची असणारी प्रिमियर पद्मिनी 118 या कारचे उत्पादन बंद झाले. पर्यायाने कुर्ल्यातील प्रिमियर पद्मिनीच्या जागेचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, युती सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरपंत जोशींच्या मार्गदर्शनाखाली या जागेचा कार्यक्रम एचडीआयएलच्या राकेश वाधवानने लावला. आज या कंपनीच्या जागेवर एचडीआयएलचे मोठमोठाल्ले टॉवर्स उभे आहेत. या टॉवर्सला बाजुला असणार्या झोपडपट्ट्यांची नजर लागू नये, यासाठी झोपडपट्टी पुनर्विकासचा कार्यक्रम राबविण्यात आला. कुर्ल्यातील एचडीआयएलच्या प्रकल्पामध्ये कोण-कोण भागीदार आहे आणि कोणा-कोणाला किती मिळाले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोणाचे, कुठे हितसंबंध आहेत, ते वेळ आल्यावर समोर येणारच आहे. परंतु परवाच म्हणजेच गेल्या काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई येथील पाम बिच या रस्त्यालगत असणारा मोठा व्यवसायिक भूखंड झोन बदलून तो रहिवासी केला गेला. अविनाश भोसलेंच्या मालकीचा असलेला हा भूखंड कपिल व धीरज वाधवानने फक्त साडेबाराशे कोटीत घेतला, असे समजते आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथील वाधवान कुटूंबाला वाचवण्यासाठी कोणी-कोणी नाकाने कांदे सोलले, हे एव्हाना समजले असेलच. परंतु आज नेहमीप्रमाणे ‘सामना’चा रोखठोक वाचला. पण या रोखठोक मध्ये पूर्वीसारखी जान नव्हती. आदल्या रात्रीच्या हँगऑव्हरमुळे संपादक ज्या पद्धतीने लेखाची जबाबदारी नुकताच पत्रकारितेची पदवी संपादन करुन रुजू झालेल्या नवशिक्याला देतो, अगदी त्याच पद्धतीने बलवंतांना नियम नाहीत, हे काही रुचले नाही. त्यामुळे या ‘रोख-ठोक’मध्ये रोखही नव्हते आणि ठोकपण नव्हते. ज्या पद्धतीने सामनाचे लेख वाचून रक्त सळसळायचे, आपणही याच पद्धतीने लिहिले पाहिजे असे वाटायचे. पण सत्ता लोकांना शहाणपण शिकवते. बाकी राहुल कुलकर्णी विषय ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर आणि सुनील ढेंपेंच्या पारड्यात टाकला आहे. त्यामुळे त्याचे तुल्यमापन येणार्या काही दिवसांतच होणार आहे. मात्र, वाधवानच्या निमित्ताने ऐन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर थंड असणारे महाबळेश्वर तापले. 14 दिवसांचा क्वारंटाईन पिरियड संपून वाधवान परिवार पाचगणीच्या गुहेतून बाहेर येईल. त्याचवेळी ‘कोण रोख आणि कोण ठोक’, हे समजणार आहे. तुर्तास ‘आज ठोक, उद्या रोख!’
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |