सातारा : नुकत्याच पार पडलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार तथा भारिप चे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने निर्णायक अशी मते घेतल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ झाला. वंचित ने मुस्लिम आणि दलित हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदार केंद्रस्थानी ठेवल्याने आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची ठरली आहे. त्यामुळे वंचित च्या गोटात राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांनी आपले खास ‘लक्ष्मणास्त्र’ डागल्यामुळे खळबळ उडाली आहे.
वंचित बहुजन आघाडी ही आता दलित आणि मुस्लिमांची राहिलेली नाही, त्यामध्ये आरएसएसच्या हस्तकांनी घुसखोरी केलेली आहे. वंचित चे राजकारण हे आरएसएस आणि भाजपसाठी पूरक आहे, असा आरोप करत वंचित च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले 'उपरा'कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी गोपीनाथ पडळकर व वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पद्श्री माने यांच्या या बंडाच्या झेंड्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित ला बरोबर घेवून निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केले होते. याबाबत बैठकाही पार पडल्या. मात्र या बैठकीत सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या कॉंग्रेसला फक्त 40 जागा देऊ करुन कॉंग्रेसची उरलीसुरली अब्रुही चव्हाट्यावर आणली आहे. वंचित च्या बुमरँगमुळे मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तंबूत खळबळ माजली. दलित, मुस्लीम मतदार केंद्रस्थानी ठेवून वंचित ने काही महिन्यांपासून राजकारण सुरु केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या साथीने वंचित ने 41 लाख 32 हजार 602 मते मिळवली आहेत, तर 48 लोकसभा मतदारसंघात 25 हजारांपासून ते 3 लाखांपर्यंतची मते घेतलेली आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमच्या व वंचितच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी सेनेच्या चंद्रकांत खैरेंना आस्मान दाखवत अनपेक्षित विजय मिळवला होता, तर बीड, बुलढाणा, गडचिरोली-चिमुर, हातकणंगले, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर, यवतमाळ याठिकाणी वंचित ने घेतलेल्या मतांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. लोकसभेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीत होवू नये, तसेच त्याचा थेट फायदा सेना-भाजपला होवू नये यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कंबर कसलेली आहे. मात्र, झोपलेल्याला उठवता येते, परंतू झोपेचे सोंग करणार्या वंचित ला उठवता येत नाही, अशी अवघड परिस्थिती कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झालेली आहे. काहीही करुन वंचित ला काबूत ठेवायचे, असा विडा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने उचललेला आहे. त्याची झलक माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या बंडामुळे उघडकीस आलेली आहे. वंचित चे नेते गोपीचंद पडळकर यांच्या पक्षातील वाढत्या हस्तक्षेपामुळे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकांपैकी एक असलेल्या लक्ष्मण माने यांना पडळकरांचं वाढतं प्रस्थ रुचलेलं नाही. त्यामुळेच काल लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेवून 'गोपीचंद पडळकर हे आरएसएसचं पिल्लु आहे. तसेच शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचे ते हस्तक आहेत. वंचित बहुजन आघाडी ही भाजपचीच 'बी' टीम आहे. त्यामुळे मुस्लीम, दलित व भटक्या-विमुक्तांचा हा पक्ष राहिलेला नाही. प्रकाश आंबेडकरांची ध्येय धोरणे बदलली आहेत. त्यांनीच आता वंचितमधून राजीनामा द्यावा'अशी मागणी माने यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. मात्र, मानेंचा बोलवता धनी वेगळाच आहे, अशी प्रतिक्रियाही गोपीचंद पडळकरांनी माध्यमांना दिली होती. त्यामध्ये काहीअंशी तथ्य असल्याचे निदर्शनास येत आहे. राष्ट्रवादी सुप्रिमो, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माने यांचा दोस्ताना जगजाहीर आहे. शरद पवारांनी आपल्या पाच दशकाच्या राजकारणात विविध जातीचे आणि पंथांचे अनेक राजकीय सुभेदार उभे केले. त्यापैकीच एक म्हणजे पद्मश्री लक्ष्मण माने. राज्यातील भटक्या-विमुक्तांचा चेहरा म्हणून पवारांनी माने यांना लॉंच केले. महाविद्यालय जिवनापासूनच पद्मश्री माने सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होते. त्यात त्यांनी लिहिलेल्या 'उपरा' या आत्मचरित्र कम कादंबरीमुळे ते महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध झाले. शरद पवारांनीही अशा सुभेदारांना राजकीय स्पेस दिला. शिक्षण संस्थांसह विधान परिषद सदस्य, महामंडळ अशी पदे दिली. एवढंच काय मानेंना महाराष्ट्रभर भिरकिट करण्यासाठी डिझेलसह चारचाकी गाड्याही दिल्या.
2009 साली फलटण विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यानंतर पद्मश्री मानेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले. फलटणचा आमदार लक्ष्मण मानेच, यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले होते. परंतू माझी राजकीय समीकरणे बिघडतील, असे म्हणत तत्कालीन पालकमंत्री मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकरांनी 'ही ब्याद तालुक्यात नको' असे म्हणत माने यांच्या महत्त्वाकांक्षेला ब्रेक लावला. शेवटी अपेक्षेप्रमाणे मानेंनी अपक्ष लढत दिली. मात्र स्वत:चे मूळगाव, आप्तेष्टांच्या जिवावर फक्त त्यांना 1718 मते पडली. त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यावेळेस त्यांनी इव्हीएम मशीन हॅक झाली, असा आरोप करीत मानेंनी त्यावेळेस पत्रकार परिषदही घेतली होती. परंतू त्यात त्यांना काही यश आले नाही.
शेवटी 'एकला चलो रे' असे म्हणत मानेंनी काही दिवस विजनवासात काढले. परंतू काही महिन्यांतच 9 मे ला शरद पवारांना जकातवाडीत आणून पुन्हा एकदा बिर्याणी आणि चॉप्स स्टिक्सची 'दावत' दिली. पुन्हा एकदा माने -पवारांच्यात 'पॅचअप' झाले. सर्वकाही आलबेल असतानाच अनपेक्षितपणे काही महिलांनी मानेंवर बलात्कार केल्याचा आरोप केला. काही महिने मानेंना तुरुंगात काढावे लागले. परंतू मानेंना या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा राजकारण आणि समाजकारणात सक्रिय झाले. सध्या ते बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटले आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. त्यात माने हे संस्थापकांपैकी एक आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मानेंना निवडणूक प्रक्रियेमध्ये डावलल्यामुळे त्याचा राग त्यांना होता. उलट, आरएसएसशी संबंध असणार्या गोपीचंद पडळकर यांचे वंचितमधील वाढत्या प्रस्थामुळे माने काही दिवसांपासून नाराज होते. त्यातच पडळकरांना 'महासचिव' पद दिल्यामुळे आघाडीत काम करण्यासारखे काही उरले नाही, असे म्हणत मानेंनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र, मानेंना प्रदेशाध्यक्ष पद न दिल्यानेच त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याचा आरोप पडळकरांनी केला. पद्मश्री मानेंना नियोजनबद्धरित्या वंचित च्या गोटात पाठवून वंचित ची हवा काढून घेण्याचा शरद पवारांचा प्लॅन आधीच ठरला होता. लोकसभा निवडणुकीत ही डाळ शिजली नाही. मात्र वंचित ने परवाच्या झालेल्या बैठकीत कॉंग्रेसच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी घडल्या. आता वंचित ला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, हे ठरल्यानंतर राष्ट्रवादी सुप्रिमोंनी आपले खास ‘लक्ष्मणास्त्र’ वंचित वर डागून वंचितमध्ये खळबळ उडवून दिलेली आहे. येत्या काही काळात शरद पवार आपल्या भात्यातून वेगवेगळी अस्त्रे निश्चितच काढतील. मात्र नमणालाच खडा लागल्यामुळे वंचितमधील नेतेही गांगरुन गेले आहेत, अशी चर्चा वंचितच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. बाकी 'आमचं ठरलंय' म्हणत वंचितच्या 'चाळीस' या आकड्याला कॉंग्रेस-राष्ट्रवादीने लक्ष्मणास्त्राने उत्तर दिलेले आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |