बिबट्याची चाळ हा शब्द शुद्ध लेखनातील चूक नसून, बट्याट्याच्या चाळेचा अपभ्रंशही नाही. बटाट्याची चाळ पु. लं. च्या लेखणीतून निर्मिलेली अत्युच्य साहित्यकृती गेली अनेक दशके आणि वर्षे आपल्या कानावर अपेक्षित आणि अनपेक्षिपणे आदळणारा शब्द. खरेतर पु. लं.च्या आजरामर कलाकृतीची ही पोचपावतीच आहे. गेली अनेक दशके मराठी मनाला रिझवणार्या या साहित्यकृतीने बटाट्याला माजघरातून दिवाणखान्यात जागा दिली. अशीही बटाट्याची चाळ आजच्या पिढीलाही चाळीशीच्या दशकातील चाळ संस्कृतीची अनुभूती देते. चाळीत राहणार्या लोकांच्या सुख-दु:खाचे क्षण, सणावारा प्रसंगी गोडधोड पदार्थांची देवाण-घेवाण, नाजुक नात्यांची गुंफण अशा एक ना अनेक घटनांनी बटाट्याची चाळ समृद्ध झाली. परंतू सिमेंट, विटा, ब्लॉकच्या जमान्यात माणुसकी जपणारी ही चाळ संस्कृतीही लोप पावलेली आहे. ही चाळ संस्कृती आता माणसांपुरतीच मर्यादित न राहता मुक्या जनावरांच्या बाबतीतही सार्थ ठरलेली आहे.
भारत देशाने हजारो वर्षाची संस्कृती आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेली आहे. देव-देवता असोत, चालीरिती असोत, वा सणवार असोत या सर्वच बाबतीत प्राण्यांची या संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे. गेल्या काही शतकांमध्ये काळ झपाट्याने बदलला, परंतू निसर्गाने मात्र आपला रंग कायम ठेवला आहे. निसर्ग हा कोणत्याही एका गोष्टीच्या अस्तित्वामुळे परिपूर्ण होवू शकत नाही. त्याची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सर्व घटकांची आवश्यकता त्याला असतेच. मानवाने या निसर्गाच्या चक्रामध्येच हस्तक्षेप केल्यामुळे निसर्गचक्र पूर्णपणे र्हासाच्या मार्गावर आहे. सध्या निसर्गचक्रातील महत्त्वाचे घटक असणारे प्राणी शेवटच्या घटका मोजत आहेत. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाने प्रसंगी पशू, पक्षी, वनस्पतींची आहुती स्वत:च्या स्वार्थासाठी दिलेली आहे. हे निसर्गचक्र अव्याहतपणे चालण्यासाठी प्रत्येक घटक श्वाश्वतपणे टिकावा यासाठी आता यापुढे सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. हत्ती, सिंह, वाघ हे धार्मिकदृष्ट्या हिंदू आणि इतर धर्मांच्यादृष्टिने पवित्र मानले जातात. त्यांना दैवत्वाचा दर्जा दिलेला आहे. परंतू निसर्गचक्रामध्ये यांना फार मोठे महत्त्वाचे स्थान आहे. विविध धर्मग्रंथांमध्ये या प्राण्यांचे महत्त्व अधोरेखित केले गेलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून मार्जार कुळातील वाघ, बिबट्या, चित्ता यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. यापैकी बिबट्या हा वाघ सर्वच ठिकाणी आढळणारी प्राणी. ही देखणी जात लेह-लडाखपासून केरळ-तमिळनाडूपर्यंत आढळली जाते. वाघ आणि सिंहानंतर बिबट्याने आपला दरारा भारतीय उपखंडातील जंगलामध्ये कायम ठेवलेला आहे.
यवतमाळ परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून फिरत असलेल्या नरभक्षक वाघिणीला शुक्रवार दि. 3 रोजी रात्री उशिरा राळेगाव तालुक्यातील बोराती गावात गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. टी 1 किंवा अवनी या नावाने ओळखल्या जाणार्या 6 वर्षाच्या या वाघिणीने या परिसरातील सुमारे 14 लोकांना ठार केल्याचा आरोप केला जात होता. अवनीच्या भीतीने बोराटी तालुक्यातील एकही शेतकरी शेतात जात नव्हता. शासनस्तरावर या गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा घेतल्याने नरभक्षक अवनी या वाघिणीला बेशुद्ध करुन ताब्यात घेणे किंवा गोळी घालून ठार मारणे, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आले होते. या नरभक्षक वाघिणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच राज्य शासनाने दिलेल्या आदेशाला अनुसरुन वनविभागाने नरभक्षक वन्य प्राण्यांना टिपण्यासाठी माहीर असलेल्या नवाब शआफत अली खान आणि त्यांचा मुलगा असगर अली खान यांना पाचारण केले होते. वन विभागासह शआफत अली खान, त्यांचा मुलगा आणि 200 जणांचा चमू काही महिने अवनी वाघिणीच्या मागावर होते. अखेर शुक्रवार दि. 3 रोजी अवनीला गोळ्या घालण्यात आल्या. वन विभागामार्फत याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र एकीकडे वाघ वाचवा आणि एकीकडे वाघाला गोळ्या घाला, असे दुटप्पी धोरण शासन राबवित आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे हिंस्त्र वन्य प्राण्यांना जेरबंद करण्याची यंत्रणा नाही. तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने र्हासाच्या मार्गावर असणार्या प्राण्यांची संख्या आपण आपल्या हाताने कमी करतोय, हे अवनीच्या एन्काऊंटरमुळे अधोरेखित झाले आहे. अशीच काही परिस्थिती पश्चिम घाटातल्या मार्जार कुळातील बिबट्यांच्या बाबतीतही निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये बिबट्यांचा दरारा आहे. ही देखणी जात गेली अनेक शतके या भागात आपले अस्तित्व टिकवून आहे. नुकत्याच जागतिक वारसा स्थळयादीमध्ये समाविष्ट झालेल्या पश्चिम घाटामध्ये अधिराज्य गाजवत आहे. परंतू या बिबट्यांच्या अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे बिबट्यांना आपल्या मूळ अधिवासातून स्थलांतरित होण्यास मानवानेच भाग पाडले आहे. त्यामुळेच आज बिबटे बिनदिक्कतपणे खाद्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये सर्रासपणे येत आहेत. त्यामुळे बिबट्यांचा मूळ अधिवास धोक्याच्या पातळीवर जावून पोहोचलेला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट परिसरातील करंजावडे, जाबरुक, रोहिणे, डिचोली, शिरशिंगे, पुनवडी, झाडोली, कुसराळे, गोजेगाव, घाटमाथा, नवजा, हुमरळी, आरळ, वनकुसवडे, महाबळेश्वर, पाटण व जावली तालुक्यातील जंगलांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर या आधी होता. परंतू ब्रिटीशकालापासून 'नाही घावला वाघ तर मारा बिबट्याला', ही रित होती. त्यामुळे बिबट्याच्या मोठ्या प्रमाणावर शिकारी करण्यात आल्या. सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजे-रजवाडे संस्थानिक घराणी आहेत. शौकासाठी आणि घराची शोभा वाढविण्यासाठी बिबट्यांची कातडी व मुंडकी राजवाड्यांच्या भिंतींवर टांगण्यात आल्याने बिबट्या हा नामशेष होण्याच्या मार्गावर आला. परंतू भारत स्वतंत्र झाल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीबाबत कडक नियमावली बनविण्यात आल्यामुळे या प्राण्यांच्या जगण्याची उमेद पुन्हा वाढू लागली. नामशेषाच्या मार्गावर असणारी ही जात आश्चर्यजनकरित्या वाढू लागली. पोषक वातावरणामुळे बिबट्यांची संख्या पश्चिम घाटात दिवसेंदिवस वाढताना दिसायला लागली. परंतू दळणवळणाची साधने जसजशी उपलब्ध होवू लागली तसतसा लोकांचा संचार या वन्यप्राण्यांच्या अधिवासामध्ये वाढू लागला. सहली, पर्यटन, छानछौकीसाठी शिकारी यामुळे या बिबट्यांची प्रजाती नामशेषाच्या मार्गावर येवून ठेपलेली आहे.
2014 च्या वन्यप्राणी गणनेनुसार 2007 ते जानेवारी 2018 पर्यंत सातारा जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये सुमारे 12 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2011 व 2013 साली बिबट्याची शिकार करण्यात आली. 2014, 15, 16 व 18 सालामध्ये बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. तर 2013, 14, 15 साली तीन बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला. ज्या घटनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली, अशी घटना 9 जानेवारी 2011 साली कराड शहरात भर लोकवस्तीमध्ये भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने उच्छाद मांडला होता. यावेळी बिबट्याच्या वाटे गेलेल्या सहाजणांना या बिबट्याने गंभीर जखमी केले होते. शेवटी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शेपट्या घातल्यानंतर पोलिसांना बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी बंदुका हातात घ्याव्या लागल्या. यावेळी कराड शहरात नेमणुकीस असलेले तत्कालीन सपोनि विकास धस यांनी आपल्या 9 एमएम सर्व्हिस पिस्तुलातून पॉईंट ब्लँकवरुन जखमी माणसाला जबड्यात पकडलेल्या स्थितीमध्ये असताना त्याचा जीव वाचविण्यासाठी धस यांनी गोळ्या झाडल्या होत्या. एका गोळीतच या बिबट्याचे काम तमाम झाले होते. या घटनेमध्ये सरशी कोणाची झाली? सामान्य माणसाची, वन विभागाची, पोलिसांची, का त्या अबोल बिबट्याची, याचे उत्तर आजतागायत अनुत्तरित आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासामध्ये एखादा माणुस मारला गेला तर त्या प्राण्याला नरभक्षक ठरविले जाते. सरकारी खर्चाने त्या प्राण्याला मारण्यासाठी नेमबाज शिकारी नेमले जातात. परंतू कराडमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याच्या केलेल्या खुनाबद्दल अजूनतरी संबंधितांना शासन झालेले दिसत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांना वेगळा न्याय, व मानवाला वेगळा न्याय यामध्ये नक्कीच काहीतरी गल्लत होत आहे.
दुसर्याच्या काठीने साप मारण्याची सवय लागलेले वनखाते असूनही नसल्यासारखे आहे. नावाप्रमाणे वने वाढविण्यापेक्षा वनेच ‘खाल्ली’ जात आहेत. त्यामुळे राजाने शिरकाण केले तर न्याय कोणाकडे मागायचा? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2014 च्या प्राणी गणनेनुसार जिल्ह्यात फक्त 35 बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे. एकेकाळी शेकडोंच्या संख्येत असणारे बिबटे आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिलेले आहेत. ‘एक होता बिबट्या’ असे पुढच्या पिढीला सांगण्यापूर्वी या सुंदर प्राण्याचे जतन व्हायला हवे. शासनाने गेल्या काही वर्षांपूर्वी कोयना व्याघ्र प्रकल्प घोषित केलेला आहे. वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे हा या पाठिमागचा शुद्ध हेतू कोयना, चांदोलीच्या जंगलांमध्ये वन्यजीवांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. परंतू बेसुमार शिकारीमुळे याला गालबोट लागत आहे. रिझॉर्ट, हॉटेल, फार्म हाऊस ही संस्कृती झपाट्याने फोफावत चाललेली आहे. कास, बामणोली, यवतेश्वर, तापोळा, पाटण तालुक्यातील कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र या मूळ बिबट्यांच्या अधिवासामध्ये माणसाने शिरकाव केलेला आहे. जंगलात भक्ष्यच मिळत नसल्याने भक्ष्य मिळविण्यासाठी हे बिबटे नागरी वस्तीमध्ये नाईलाजास्तव घुसखोरी करीत आहेत. बिबट्याचे दर्शन झाल्याने भांबावलेले लोक या भक्ष्यासाठी आलेल्या जनावराला खावू की गिळू करीत आहेत. त्यामुळे नागरी वस्तीतील लोकांवर बिबट्यांचे हल्ले वाढलेले दिसत आहेत.
सातारा जिल्ह्याचा विचार केल्यास वर्षाला किमान दोन ते तीनवेळा असे प्रसंग उद्भवतात. बिबट्यासदृश्य दिसणारा ब्लॅक पँथर हा अजिंक्यतार्यावरुन नागरी वस्तीकडे जात असताना खिंडवाडीनजिक राष्ट्रीय महामार्गानजिक एका अज्ञात वाहनाने या नामशेष होत चाललेल्या देखण्या प्राण्याला चिरडले होते. अनेक बिबटे जंगल नामशेष होत चालल्यामुळे प्रजननासाठी ऊस शेतीचा आधार घेत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उसांना आगी लावल्या जातात त्यामुळे हे छोटे बछडे उसाच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहेत. एकेकाळी संपूर्ण जगभरात मुक्तपणे भ्रमण करणारी मार्जर कुळातील ही जात नामशेषाच्या मार्गावर आहे. यासाठी शासनाला कडक धोरणे व नियमावली अवलंबण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. चाळीसच्या दशकातील पु. लं.च्या आदर्श अशा बटाट्याच्या चाळीप्रमाणे बिबट्यांच्या सवर्धनासाठी बिबट्यांच्या चाळी निर्माण केल्यास ही देखणी प्रजात पुन्हा एकदा मोकळा श्वास घेण्यासाठी सिमोल्लंघन करणार नाही. माणसांप्रमाणे या वन्यप्राण्यांना विटा, सिमेंट, ब्लॉकच्या जंगलात येण्याची आवश्यकता भासणार नाही. शाश्वत सुखाच्या शोधासाठी मानवाने निसर्गाचे चक्र भेदले आहे. त्यामुळे येणार्या काळामध्ये मानवानेच हे चक्र चिरंतन टिकण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
- संग्राम निकाळजे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |