09:36pm | Feb 16, 2019 |
सातारा : संपूर्ण भारतात लोकसभेच्या उमेदवारीसाठी जेवढा काथ्याकूट झाला नसेल तेवढा काथ्याकूट सध्या सातारच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या अनुषंगाने सुरु आहे. जो-तो आपापल्या पद्धतीने मतप्रदर्शन करताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी सुप्रिमो यांनी काही झाले तरी उदयनराजेच, असा ठाम निर्णय घेतलेला असूनसुद्धा फलटण नरेश अधुनमधून लवंगी फटाक्यापासून सुतळी बॉम्बला बत्ती देण्यात धन्यता मानत असल्यामुळे सध्या राष्ट्रवादीअंतर्गत वातावरण दूषित झाले आहे. जो-तो वेलकम टू ‘हॉटेल सिक्कीम’ म्हणून मारुल हवेलीकडे बोट दाखवत आहे.
2014 साली देशात आणि राज्यात ऐतिहासिक सत्तांतर झाले. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र येवूनसुद्धा राष्ट्रवादीने सातारा हा आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवले. राष्ट्रवादीचे सर्वच आमदार एकदिलाने पक्षाचे काम करीत असतानासुद्धा राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले उदयनराजे शेवटपर्यंत राष्ट्रवादीचे कधीच झाले नाहीत. मै खडा तो सरकारसे बडा, या नीतीमुळे उदयनराजेंचा राष्ट्रवादीतील आमदारांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. उदयनराजेंच्या आक्रमकतेपुढे सर्वच आमदार मूग गिळून गप्प बसल्याचे सातारकरांनी पाहिलेले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी झालेल्या उदयनराजेंच्या वाढदिवस सोहळ्यावर शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांनी बहिष्कार टाकून उदयनराजेंना पहिला झटका दिला. सातारा लोकसभेसाठी उदयनराजे सोडून कोणीही चालेल, हा सूर विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजेंसह राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी आळवला. सातारच्या छत्रपतींच्या गादीचे मनोमिलन तुटल्यानंतर आमदार शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजेंचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर आनेवाडी टोलनाक्याच्या अनुषंगाने घडलेले सुरुची रणकंदन सातारकर अद्याप विसरलेले नाहीत. या सर्व गोष्टी उदयनराजेंना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून विरोधासाठी पुरेशा ठरलेल्या आहेत. सातारा लोकसभेसाठी कोण शशिकांत शिंदेना, कोण आमदार शिवेंद्रराजेंना, तर कोणी चक्क वसंतराव मानकुमरेंना सातारच्या आखाड्यात उतरवू पाहत आहे. परंतू तो अंदाज अपना अपना है। शेवटी विश्लेषणाचा अधिकार सर्वांना आहे.
काल दि. 15 रोजी आ. शिवेंद्रराजेंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांची बारामतीत भेट घेवून कोणीही चालेल, पण उदयनराजे नकोत असे म्हणत त्यांची वेळ आली की रडारडी करतात आणि आमची वेळ आली की पाडापाडी करतात, असे गार्हाणे पवारांपुढे मांडून आगामी लोकसभेला शिवेंद्रराजेंनी सांगितले तरी आम्ही उदयनराजेंचे काम करणार नाही. मात्र पवारांनीही घुमजाव करीत आ. शिवेंद्रराजेंसह सातार्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असा शब्द शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे जे आ. शिवेंद्रराजेंचे कट्टर कार्यकर्ते असूनसुद्धा शिवेंद्रराजेंचेही ऐकणार नाही, अशी वल्गना करतात? मग ते कार्यकर्ते फलटण नरेशांचे ऐकणार काय? त्यामुळे आ. शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना कोणाची बत्ती आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज उरली नाही.
चला तर वळूयात मूळ मुद्द्याकडे...
राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांचे महाविद्यालयीन जिवनातील दोस्त, यार म्हणजे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील. महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर हे दोघेही दोस्त, यार वेगवेगळ्या विश्वात रमले. शरद पवार राजकारणात, तर श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेत. दोघेही परस्परभिन्न क्षेत्रात रमले तरी त्यांनी आपापसातील स्नेह तसूभरही कमी होवू दिला नाही. शरद पवार मुख्यमंत्रीपदावर असताना श्रीनिवास पाटलांनी त्यांनी नेहमीच क्रीम पोस्टिंगवर बसवले. 1999 साली युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी राष्ट्रीयतेच्या मुद्द्यावरुन वाद झाल्यानंतर पवारांनी राष्ट्रीय कॉंग्रेसशी फारकत घेत पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांना हाताशी धरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी या नव्या पक्षाची वेगळी चूल मांडली. दरम्यान गांधी घराण्याच्या जवळच्या समजल्या जाणार्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात कराड लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटलांना उभे करण्यात आले व निवडूनही आणले. 1999 ते 2009 पर्यंतच्या दोन 'टर्म' श्रीनिवास पाटलांनी खासदार म्हणून गाजवल्या. मात्र 2009 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत श्रीनिवास पाटलांचा हक्काचा कराड लोकसभा मतदारसंघ विसर्जित करण्यात आला.
सातारमधून लोकसभेवर गेलेले दिवंगत माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनाही उदयनराजेंच्या झंझावातासमोर 2009 सालच्या निवडणुकीत नमते घ्यावे लागले. भाजपा, कॉंग्रेस व्हाया राष्ट्रवादी असा प्रवास उदयनराजेंना 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावा लागला. त्यामुळे साहजिकच श्रीनिवास पाटील यांना काही काळ राजकीय अज्ञातवासात जावे लागले. परंतू गप्प बसणार ते शरद पवार कसले? 20 जुलै 2013 रोजी शरद पवारांनी आपल्या खास दोस्ताची सिक्कीमच्या राज्यपालपदी वर्णी लावून शरद पवार काहीही करु शकतात, हे दाखवून दिले. उत्तरपूर्व भारतातील सिक्कीम हे अतिशय छोटे राज्य. त्याला 'चिकन-नेक' ही संबोधले जाते. हिमालयाच्या दर्याखोर्यांच्या श्रृंखलेत विसावलेले हे नितांत सुंदर राज्य. भारतात पहिला सुर्योदय जिथे होतो, असा तो प्रदेश. साहजिकच श्रीनिवास पाटलांसारख्या रसिक माणसाला पाच वर्ष याठिकाणी राज्यपाल म्हणून सिक्कीमवासीयांची सेवा करण्याची संधी मिळाली. श्रीनिवास पाटलांची सिक्कीच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर साहजिकच सातारकरांसह राज्यातील श्रीनिवास पाटील प्रेमींची वर्दळ सिक्कीमकडे वाढली.
गंगटोकमधील ब्रिटीशकालीन राज्यपालांच्या निवासात प्रत्येक सातारकर हक्काने विसावू लागला. श्रीनिवास पाटलांनीही ‘अतिथी देवा भव:’ म्हणत प्रत्येक सातारकराचा शासकीय इतमामात पाहुणचार केला. त्यामुळे साहजिकच सिक्कीमवरुन निघताना प्रत्येकजण गंगटोकमधील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेवून बागडोग्रा, सिलीगुडीपर्यंत येईपर्यंत श्रीनिवास पाटलांचे आदरातिथ्य आणि दिलेल्या प्रेमाचा दिवाना झाला नसेल तर नवलच! या प्रेमाने भारावलेले अनेकजण आता सातारा लोकसभेसाठी ‘राष्ट्रवादीतून श्रीनिवास पाटीलच’, असा सूर आळवू लागले आहेत. काल पवारांना बारामतीत भेटण्यासाठी गेलेल्या अनेकजणांनी श्रीनिवास पाटलांचा सिक्कीममधील पाहुणचार झोडलेला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी एवढेच काय तर पत्रकारांनीही अनेकवेळा सिक्कीमच्या स्वार्या केल्या आहेत. त्यामुळे उदयनराजे नको म्हणणार्या राष्ट्रवादीजनांचे आता श्रीनिवास पाटलांबाबत एकमत होवू लागले आहे. शरद पवारही राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळी नको म्हणून ‘फिर एक वार, मेरा यार’ असे म्हणू लागले आहेत. फलटणकरही आपले पुनर्वसन करा, म्हणून शरद पवारांच्या पाठिमागे लागले आहेत. माढ्यातून अनेकांनी दाढ्या आणि मिशा पिंजारल्या. परंतू माढ्यातून मीच म्हणत शरद पवारांनी शड्डू ठोकल्यानंतर फलटणकरांनी शेपट्या घातल्या. शेवटी मेंदूतील किडा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे काल फलटण नरेशांनी आ. शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांच्या सुतळी बॉम्बला बत्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही बत्ती सुतळी बॉम्ब फोडते, की लवंगी हे येणार्या काळातच ठरणार असले तरी श्रीनिवास पाटलांनी केलेल्या आदरातिथ्याचा मान राखत अनेकांनी ‘वेलकम टू हॉटेल सिक्कीम’ म्हणत दुधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रयत्न केला आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |