04:59pm | Nov 17, 2018 |
जसजशा निवडणुका जवळ येवू लागल्या आहेत, तसतशा फलटणमधील गलिच्छ राजकारणाला घुमारे फुटू लागले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील सत्ताधार्यांच्या समोर आव्हानांचा डोंगर उभा केला होता. अगदी थोडक्या फरकाने दिगंबर आगवणेंचा पराभव त्या निवडणुकीत झाला होता. खरेतर फार पूर्वीपासूनच फलटणच्या राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती बाळसे धरु लागल्या होत्या. परंतू गेल्या आठवड्यात दिगंबर आगवणेंच्या वर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळे आता फलटण नरेशांच्या गलिच्छ राजकारणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
समोरासमोर भिडण्याची ताकद नसल्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये फलटण नरेश कंबरेखालचे वार करु लागले आहेत. सातारचे खासदार श्री. छ. उदयनराजे नडताहेत म्हणून त्यांना अलगदपणे लोणंद येथील सोना एलॉयजच्या खंडणी प्रकरणात अडकवले, त्यावर भागले नाही म्हणून की काय आनेवाडी टोलनाक्याच्या अनुषंगाने सुरुची राडा प्रकरण घडवून आणले. माण-खटावमधील आ. जयकुमार गोरेंच्या वाढत्या प्राबल्यामुळे फलटण नरेश कमालीचे अस्वस्थ होते. मानाच्या पदावर बसल्यामुळे बडबडे अधिकारीही आपल्यासमोर वाकतात, आपण सांगेल ती कामे करतात. याचाच दुरुपयोग फलटण नरेशांनी मोठ्या खुबीने केला. लोकशाहीचे दमण राजाअसूनही करता येते, हे फलटण नरेशांनी वारंवर आपल्या कृतीतून दाखवून दिले व आजतागायत देताहेत. आ. जयकुमार गोरेंवरही ‘हनी ट्रॅप’ लावला. या ट्रॅपमध्ये जयकुमार अलगद अडकले. शेवटी अटकपूर्व जामीनासाठी आ. गोरेंना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. शेवटी आमदार असूनही गोरेंना ‘आतमध्ये’ बसावे लागले. दिगंबर आगवणेंच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झालेला आहे. त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे षडयंत्र आहे, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. ज्यांनी आरोप केलेत, अशा लोकांचा सामाजिक बुरखा फाडण्यासाठी दिगंबर आगवणे आज दि. 17 पासून फलटण येथील अधिकारगृहासमोर उपोषणास बसले आहेत. मात्र त्यांनी उपोषणस्थळी लावलेले अनेक फ्लेक्स मात्र येणार्या-जाणार्या फलटणकरांचे लक्ष वेधून घेताहेत. ही भानगड फलटण नरेशांची तर नाही ना? यामुळे फलटण नरेशांची अब्रु मात्र चव्हाट्यावर आलेली आहे.सभापतीपदाच्या खुर्चीवर बसून फलटण नरेशांच्या अनेक गंमतीजंमती सुरु आहेत. मानाच्या पदावर बसल्यानंतर जबाबदारी वाढते. पुढच्या दहा पिढ्यांनी आपले आदराने नाव घ्यावे, अशी समाजोपयोगी कामे करावीत, असा शिरस्ता जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री वाय. बी. चव्हाणांचा होता. परंतू वाय बी चव्हाणांच्या पट्टशिष्याच्या वळचणीला बसून फलटण नरेश काहीच शिकले नाहीत, हे फार मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
माजी आमदार, पत्रकार, शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांनी फलटणचे संस्थान दुसर्यांदा खालसा करुन इतिहास निर्माण केला होता. त्यावेळी खर्याअर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण झाले होते. फलटण विघानसभा मतदारसंघातून डॉ. कृष्णचंद्र भोईटे, चिमणराव कदम यांच्यासारखी सामान्य घरातील मुले आमदार झाली होती. त्यामुळे फलटणसारख्या कायम दुष्काळी भागातही खर्याअर्थाने लोकशाही नांदत होती. परंतू विनाशकाले विपरित बुद्धी या उक्तीप्रमाणे फलटणमधील काही समाजधुरिणांनी उदात्त हेतूने राजाची मुले फलटणच्या राजकारणात आणली. परंतू सरंजामी रक्तातच असल्यामुळे फलटण तालुका लोकशाहीप्रधान देशात असुनसुद्धा आज फलटणमध्ये समांतर अशी राजेशाही राबवली जात आहे. त्यामुळेच फलटण तालुक्यात बहुजन नेतृत्व तयार होत नाही. फलटणमधील विविध संस्था, बँका, पतसंस्था आदी आर्थिक स्त्रोत ताब्यात ठेवून या राजांनी भल्याभल्यांना आपले मांडलिकत्व स्विकारण्यास भाग पाडले आहे.
माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या तालमीत तयार झालेल्या गिरवी, ता. फलटण येथील दिगंबर आगवणे या तरुणाने आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून स्वत:ला भगिरथ समजणार्या फलटण नरेशांसमोर शड्डू ठोकला होता. त्यामुळे फलटण नरेशांची पळता भुई थोडी झाली होती. हे पोरगं आपल्याला राजकारणातून संपवणार, ही भीती फलटण नरेशांना सतावत होती. याला परत पीठ मागायला लावणार, अशी वक्तव्ये फलटण नरेश खाजगीत व जाहिररीत्याही करत होते. माढा लोकसभा मतदारसंघात येणार्या फलटण तालुक्याने लोकसभेला शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या पारड्यात भरभरुन मते टाकली होती. त्यामुळे फलटण तालुक्यात शेतकरी संघटनेचे वारे होते. दिगंबर आगवणेंनीही शेतकरी संघटनेच्या माध्यमातूनच विधानसभा लढवणार, हे निश्चित केले होते. त्यामुळे फलटणचा भावी आमदार दिगंबर आगवणेच, यावर शिक्कामोर्तब झाले होते. 2 - 3 वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे फलटण तालुका होरपळून निघाला होता. माणसालाच प्यायला पाणी नसल्याने तिथे मुक्या जनावरांची काय गत? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू अशा दुष्काळातही आगवणेंनी फलटणकरांना मदतीचा हात दिलेला होता. स्वखर्चाने आगवणेंचे पाण्याचे टँकर फलटणच्या प्रत्येक वाडी-वस्त्यांवर धावत होते. हिच जाण फलटणकरांनीही ठेवली होती. एवढेच काय, फलटण विधानसभा मतदारसंघात येणार्या कोरेगावातील 41 गावांनीही आगवणेंना विक्रमी मतदान केले होते. दिगंबर आगवणे या नावाचा धसका स्वत: फलटण नरेशांसह त्यांच्या दोन दाढीवाल्या बंधूंनीही घेतला होता. एरव्ही निवडणुकीच्या अगोदर बंगल्यावरच लोकांना बोलावून घेणारे, गेल्या निवडणुकीत मात्र पायाला भिंगरी लावून मतदारसंघात पळत होते. परंतू युती आणि आघाड्या तुटल्यामुळे साखरवाडीपासून बरडपर्यंत व दुधेबावीपासून ताथवड्यापर्यंत पोहोचविण्यात आलेल्या पैशांची पोती पुन्हा ‘लक्ष्मी-विलास’वर मागविण्यात आली. त्यामुळे त्या लक्ष्मीतच फलटण नरेश निर्धास्त झाले. तरीही दिगंबर आगवणे, डॉ. नंदकुमार तासगांवकर, पोपटराव काकडे यांना पडलेल्या मतांमुळे फलटणनरेशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन गेले होते. परंतू अंजन जावूनही फलटण नरेशांची दृष्टी साफ झाली नाही. नीतीमध्येच खोट असल्यामुळे विरोधकांना संपविण्यासाठी गलिच्छ राजकारणाचा पायंडा फलटण नरेशांनी तालुक्यात व पर्यायाने जिल्ह्यात पाडला. खा. उदयनराजे, आ. जयकुमार गोरे, डॉ. नंदकुमार तासगांवकर आणि आता दिगंबर आगवणे हे फलटण नरेशांच्या गलिच्छ राजकारणाचे ठरलेले बळी आहेत.
आजपासून फलटण येथील अधिकारगृहासमोर दिगंबर आगवणेंसह कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते झालेल्या अन्यायाबद्दल उपोषणास बसले आहेत. दिगंबर आगवणेंचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबद्दल अधिक लिहिणे संयुक्तिक नाही. वेळ आल्यानंतर लेखणीचे आसुड फलटण नरेशांवर नक्कीच चालणार. शेवटी नावात राम असून चालत नाही, तर त्यासाठी आपले कर्मही रामासारखेच असावे लागते. आयुष्याच्या संध्याकाळी आपण केलेल्या कर्माची लाज वाटू नये, याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी. फलटण नरेशांनाही हे समजतंय पण उमजत नाही. निर्विकार चेहरा करुन विचारवंताच्या भूमिकेत हे राज्यभर फिरत असतात. दोन्ही खिशात मोबाईल ठेवून बुद्धी पाजळण्यापेक्षा एखादे पुस्तक लिहावे. जेणेकरुन त्याला बुकर, पुलित्जर असे पुरस्कार मिळविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अन्यथा आपले आत्मचरित्र प्रसिद्ध झाले तर त्या चरित्रावर फलटणमधील काळे कुत्रेही पाय वर करणार नाही. ‘समझने वाले को इशारा काफी है’ जिल्ह्यातील निवडणुका जसजशा जवळ येताहेत, तसतसा घोडेबाजार सुरु झालेला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होतच राहणार. त्यात नवल नाही. परंतू राजकारणातील स्पर्धा निकोप असावी, असे वायबी चव्हाण नेहमी म्हणायचे. दिगंबर आगवणेंपासून सुरु झालेला फेरा फलटण नरेश अजून कुणाच्या मागे लावणार, की हाच फेरा त्यांच्यावरच बुमरँग होणार, हे आता वादातीत आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |