09:15pm | Aug 16, 2021 |
फलटण : जिल्ह्यातील 1196 ग्रामपंचायतींपैकी 50 टक्के ग्रामपंचायतींवर महिलाराज आहे. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने राजकीय पातळीवर राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा 50 टक्के वाटा असावा, यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असला तरी राज्यामध्ये अनेकठिकाणी याचा दुरुपयोग होताना दिसून येत आहे. चळवळींचा जिल्हा म्हणून देशभरात ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातच महिला सक्षमीकरणाच्या मोहिमेलाच खोडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील मिरेवाडी (कुसूर) ग्रामपंचायतीच्या सरपंच सरिता दीपक नरुटे यांनी 6 जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवरच ‘मी महिला व गृहिणी असल्याने इतर वेळेत ग्रामपंचायतीची असणारी कामे माझे पती दीपक बबन नरुटे हे पाहतील. यासाठी मी संमती देते’ असे लिहून महिला सबलीकरणाच्या प्रयत्नांना कोलदांडा घालण्याचे काम केले आहे. या लेटरहेडवर महिला सरपंचांसह इतर सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत. हे लेटरहेड मात्र फलटण तालुक्यात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पत्नी सरपंच असली तरी तिचा पती तिच्या कामात लुडबुड करीत असतो. पत्नी नामधारी सरपंच असल्याने ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या खुर्चीत पतीराज ऐटीत बसून फर्मान सोडीत असतो. महिला पतीराजांच्या ग्रामपंचायतीमधील लुडबुडीमुळे महिला सशक्तीकरणाच्या मोहिमेला खीळ बसत असल्याचे लक्षात आल्याने गेल्या आठवड्यात राज्य शासनाने यासंदर्भात आदेश पारित केले असून महिला सरपंचांच्या पतीराजांची ग्रामपंचायतीच्या कारभारात ढवळाढवळ चालणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या नव्या आदेशामुळे महिला सरपंच, उपसरपंच तसेच इतर पदाधिकार्यांना स्वत:ची काम स्वत:च करावी लागणार आहेत, असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. परंतू आदेश होवूनसुद्धा याला हरताळ फासण्याचे काम सुरुच आहे. महिलांना कौटुंबिक कामे असतात, इतर जबाबदार्याही त्यांनाच पार पाडाव्या लागतात. त्यातच ग्रामपंचायत सरपंच या नात्याने गावाचा गाडाही हाकावा लागतो. राज्यात अनेक ठिकाणी महिला सरपंच आपल्या गावाचा कारभार सक्षमपणे चालवित असतात. परंतू फलटण तालुक्यातील मिरेवाडी या गावामध्ये पतीराजांकडून दुधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्वत: सरपंच नसलो तरी काय फरक पडतो? पत्नी तर आहे! पत्नी तर फक्त रबर स्टॅम्प आहे. या भावनेतून महिला सरपंचांचे पती दीपक नरुटे यांनी हा कांड घडवून आणलेला आहे. यासंदर्भात फलटण तहसीलदारांपासून सातारा जिल्हाधिकार्यांपर्यंत अनेक तक्रारी झाल्या. परंतू या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. शेवटी मिरेवाडी येथील विठ्ठल गोविंद खरात यांनी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला. मात्र प्रशासनाने पोलिसांकरवी विठ्ठल खरात यांची 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येलाच उचलबांगडी करुन त्यांचे आंदोलन चिरडून टाकले आहे. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणार्या सातारा जिल्ह्यात मात्र एवढे मोठे कांड होवून अनेक पक्ष-संघटना मूग गिळून गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात प्रशासकीय अधिकार्यांनीही कानावर हात ठेवून एकमेकांच्या कोर्टात चेंडू टोलविण्याचे काम केले आहे.
ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या महिला सरपंचाच्या त्या फतव्यामुळे भविष्यामध्ये निवडणूक प्रक्रिया राबवाव्यात की नाही? यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल होवून आठवडा उलटला तरी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मिरेवाडी ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यासंदर्भात लक्ष घालून महिला सरपंचांसह तिचे पती व इतर सहा ग्रामपंचायत सदस्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बीडीओ मॅडम म्हणतात, अहवाल पाठवला आहे!
मिरेवाडी येथील महिला सरपंचाच्या त्या लेटरबॉम्बमुळे फलटण तालुक्यात धमाके चालू असतानाच त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी त्याच गावातील विठ्ठल गोविंद खरात यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनी कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. खरातांच्या अल्टिमेटमुळे फलटण पंचायत समितीमधील बीडीओ मॅडमनी यासंदर्भातील कसलातरी अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला असल्याचे समजते, यासंदर्भात त्यांच्याशी सातारा टुडे ने संपर्क साधला असता त्यांनी अहवाल पाठवला आहे, वरिष्ठांकडून मार्गदर्शन आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे थातुरमातूर उत्तर देवून या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |