12:52am | Jun 07, 2021 |
सातारा : जे आजपर्यंत चित्रपटांमध्ये पाहिले गेले, अशी वेळ सध्या जगावर येवून ठेपलेली आहे. नैसर्गिक मृत्यूपेक्षा गेल्या वर्षभरात अनैसर्गिक मृत्यू कैकपटीने वाढले. पर्यायाने त्या मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची, या संबंधी संबंधित यंत्रणाही हतबल झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास 4 हजार मृत्यू कोविडमुळे झालेले आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आतापर्यंत शेकडो टन जळावू लाकडे वापरात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 7 एप्रिल 2020 रोजी ‘सातारा टुडे’ने ‘सातारा शहरानजिक निर्जनस्थळी विद्युतदाहिनी उभारण्याची मागणी’, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताचे अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले होते, तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी पुढे येवून निर्णय घेण्याची मागणी केली होती. परंतू ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे जिल्हाधिकार्यांनी हा प्रश्नही बासणात गुंडाळून ठेवला. पर्यायाने गेल्या वर्षभरात हजारो वृक्षांची कत्तल झाली. मात्र, यासंदर्भात एकाही पर्यावरणवाद्याने ‘ब्र’ उच्चारला नाही. दुर्दैवाने कालच दि. 5 जून रोजी संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. अनेकांनी हातभर लेख लिहून आपली बुद्धी पाजळली. परंतू सातारा जिल्हाधिकार्यांना याचा जाब मात्र विचारला नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावली पाहिजेत, ती जगवून ती वाढवली पाहिजेत. परंतू हे हल्ली होताना दिसत नाही. अलिशान बंगल्याच्या परसबागेत दोन-चार शोभेची झाडे लावून पर्यावरणाचा समतोल आपण राखू शकत नाही, हे या अतीशहाण्यांना कोण सांगणार? प्रत्येक जाती-धर्माच्या अंत्यसंस्काराचे रितीरिवाज भिन्न आहेत. काही धर्मात दफन, तर काही धर्मात दहन केले जाते. दहन करतेवेळी मोठ्या प्रमाणात जळावू लाकूड तसेच शेणी सारख्या तत्सम वस्तूंचा वापर केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यात यावा, यासाठी मुंबईमध्ये विद्युत तसेच इंधनावर चालणारी विद्युत शवदाहिनी उभारण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद या प्रगतशील शहरांमध्ये हळूहळू विद्युत दाहिन्या उभारण्यात आल्या. त्यामुळे या मोठ्या शहरांमधील अंत्यसंस्काराचा ताण कमी झाला. पर्यायाने पर्यावरणाचेही नुकसान कमी होत गेले. सातारा जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच देशाच्या पटलावर एक अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या मातीत अनेक चळवळींनी जन्म घेतला. परंतू राजकीय अनास्थेपोटी या जिल्ह्याच्या विकासाला उतरती कळा लागली. ‘दोन हाणा, पण पुढारी म्हणा’ या जिल्ह्यातील राजकारण्यांच्या नीतीमुळे सातारा जिल्ह्याचा विकास खुंटला. जिल्ह्यात येणार्या कले़क्टरला सूचना करण्याऐवजी आपल्या बगलबच्च्यांचे हित जोपासण्यासाठी त्यांचीच हुजरेगिरी केली गेली. पुढार्यांच्या या द्राविडी प्राणायामामुळे मात्र येणार्या अधिकार्यांनी आपली मांड जिल्ह्यावर पक्की केली. विकास गेला चुलीत, असे म्हणत अनेक कलेक्टरांनी पोत्याने पैसे घरी नेले. असो, हा मुद्दा इथे इष्ट नाही. गेल्या वर्षी ज्यावेळी ‘सातारा टुडे’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले, त्यावेळी जिल्ह्यात कोविडचा एक बळी गेला होता, तर राज्यात 52 आणि देशात 136 कोरोनाबळी गेले होते. भविष्यातील पर्यावरण र्हासाची शक्यता ओळखून ‘सातारा टुडे’ने सातार्यातही विद्युत दाहिनी असावी, अशी मागणी केली होती. याबद्दल चर्चाही झाल्या. अनेकांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सूचितही केले. परंतू जिल्हाधिकार्यांनी यासंदर्भात कोणताही निर्णय एक वर्ष उलटूनही घेतला नाही. उलट, प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी राजेंद्र चोरगेंच्या मानगुटीवर अजगर सोडण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात जवळपास 4 हजार लोकांचे कोविडमुळे मृत्यू झालेत. म्हणजेच नैसर्गिक मृत्यूपेक्षा हे प्रमाण सातारसारख्या जिल्ह्याला न पेलावणारे आहे. असे असतानाही सातारकरांनी याही समस्येला मोठ्या धिरोदात्तपणे तोंड देत जिल्हाधिकारी सांगतील, त्याप्रमाणे आपली कर्तव्ये चोख बजावलेली आहेत. वर्षभरापासून बेंबीच्या देठापासून कोकलूनही जिल्हाधिकार्यांनी विद्युत दाहिनीचा प्रश्न का रेंगाळत ठेवला, हे जरी अनाकलनीय असले तरी जम्बो कोविड सेंटरसारख्या संस्थानाला कोट्यवधींची मुक्तहस्ते उधळण करणार्या जिल्हाधिकार्यांना विद्युत दाहिनीसाठी साधी दमडीही देता येत नाही, यासारखी मोठी शोकांतिका नाही. काल म्हणजेच 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन होता. या दिनानिमित्त अनेक राजकीय धुरिणांसह शासकीय नोकरशहा, पर्यावरणवादी यांनी ‘पर्यावरण वाचवा’, अशा आशयाच्या हजारो पोस्ट टाकून सोशल मीडियाच्या भींती रंगवल्या. मात्र, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होती, त्याठिकाणी जावून वृक्षतोड थांबविण्याची धमक दाखवली नाही. राज्यातील वनविभाग वृक्षतोडीतून मिळालेल्या पैशातून मदमस्त झालेला आहे. त्यांना पर्यावरणाची काहीही देणे-घेणे नाही. अपघाताने गाडीखाली आलेले रानडुक्करही वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शिकारच ठरवून संबंधितांकडून लाखोंची लाच उकळल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पर्यावरण रक्षणाची अपेक्षा करणे हे भिकार्याला भीक मागण्यासारखे आहे. कोणत्याही वाईट गोष्टींची भविष्यवाणी करणे वाईटच. परंतू गेल्यावर्षी ‘सातारा टुडे’ने कोविडच्या प्रादुर्भावामुळे जे मृत्यू होत आहेत, त्यांच्या अंत्यसंस्कारासंबंधी जिल्हाधिकार्यांनी पुढे येवून विद्युत दाहिनी उभी करुन पर्यावरण वाचविण्याचे आवाहन केले होते. कोविड काळात ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला समजले आहे. मृत्यूशय्येवर असताना कृत्रिम प्राणवायू निश्चितच प्राण वाचवित असेल, परंतू दैनंदिन जिवनात वृक्षांपासून मिळणारा प्राणवायू जर आपण जपू शकलो नाही, तर येणारा काळ हा निश्चितपणे क्लेषदायक असणार आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकोबा रायांनाही झाडांचे महत्त्व समजले होते. त्यामुळेच त्यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे...’ असे म्हणत त्याची महती पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतू साडेचारशे वर्षानंतरही आम्ही करंटेच निघालो. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल प्लॅटफॉर्मचा आधार घेत आम्ही जागतिक पर्यावरणाची महती सांगत सुटलो. पण... गेल्या वर्षभरात हजारो झाडांची कत्तल होवूनसुद्धा तुम्ही सातार्यात अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी का उभारली नाही, असा प्रश्न पर्यावरणवादी समजल्या जाणार्या एकाही माईच्या लालाने जिल्हाधिकार्यांना विचारला नाही.
अंत्यसंस्कारासाठी भविष्यात पर्यायी व्यवस्था उभारा : चोरगे
सध्याच्या घडीला अनैसर्गिक मृत्यूंमुळे अंत्यसंस्कार करणार्या यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे. कोरोना अगोदर सातार्यासारख्या शहरामध्ये अंत्यसंस्कार पार पाडणे फार जिकीरीचे काम नव्हते. परंतू कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कारासाठी लागणारी साधने तोकडी पडत आहेत. उदा. जळावू लाकूड. एक झाड मोठे होण्यासाठी 20-30 वर्षाचा कालावधी लागतो. याच झाडापासून दिवसाला 30 लिटरपेक्षा जास्त ऑक्सिजन पर्यावरणामध्ये उत्सर्जित केला जातो. एका अंत्यसंस्कारासाठी एक मोठे झाड कामी येते. त्यामुळे भविष्याचा विचार केल्यास झाडेच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे शासनाने यासंदर्भात कडक धोरणे राबविण्याची गरज आहे. गॅस किंवा विद्युत दाहिन्या हा पर्यायी मार्ग ठरु शकतो. परंतू तुटलेल्या उसापासून किंवा कडब्यापासून बगॅस ची निर्मिती करुन त्याद्वारे अंत्यसंस्कार केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास खर्या अर्थाने मदत होणार आहे, अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना दिली.
मोक्ष प्राप्तीसाठी काय करावे लागेल?
पुणे-मुंबई सारख्या मेट्रो सिटीत अनेक सेलेब्रिटी विद्युत दाहिनीसाठी पुढाकार घेवू लागल्या. अगदी स्वनिधीतून त्यांनी विद्युत दाहिन्या उभारल्या. त्यामुळे अनेकांना मोक्ष मिळाला. सातारा जिल्ह्यात मात्र त्यापेक्षा वेगळी परिस्थिती पहायला मिळते. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह अंत्यसंस्काराअभावी पाच ते सहा दिवस शवगृहात ठेवावे लागत आहेत. यापेक्षा दुर्दैवी वेळ ती काय असेल? मुळात जम्बो कोविड सेंटर हे काही डान्स बार नाही. याठिकाणी करोडो रुपयांचा खर्च करुन बाऊन्सरांची नियुक्ती करण्यापेक्षा तोच निधी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी विद्युत दाहिन्यांसाठी खर्च केला असता तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आणि मोक्ष प्राप्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या मृतदेहांना खर्या अर्थाने मोक्ष मिळण्यास मदत झाली असती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |