सातारा : सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यामुळे राजकीय उलथापालथ सुरु आहे. भाजपकडे बहुमताचा अकडा नसला तरी अध्यक्ष हा भाजपचाच असू शकतो या मंत्र्यांच्या भुमिकेमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षानेही सावध पवित्रा घेत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस -शिवसेना सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
काल काही अटी शर्तीवर भाजपला बरोबर घेत झेडपीची सत्ता स्थापन करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. आज त्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पालकमंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांनी भेट घेतली आहे. दरम्यान, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत रात्री उशिरा भेट घेतल्यामुळे झेडपीच्या सत्तास्थापनेच्या अनुषंगाने मुंबईत जोरदार जोरदारपणे चर्चा सुरु झाल्या आहेत.
सातारा जिल्हा परिषदेचा निवडणूक निकाल ९ फेब्रुवारी रोजी लागला. यानंतर भाजपला २७ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला २0, शिवसेना १५, काँग्रेस १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, अपक्ष १ अस बलाबल झाल. पण यामध्ये कोणत्याच पक्षाला सत्तेच ३३ हे संख्याबळ गाठता आलं नाही.
निवडणूक निकालाच्या दहा दिवसानंतर अजूनही सत्तेचा घनशाघोळ कायमच दिसत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी भाजपशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष हे झेडपीची सत्ता स्थापन करु हा सूर आळवू लागले होते. तेच काल राज्य नेतृत्वांच्या सूचनेनुसार भाजपला सत्तेत बरोबर घेवून सत्ता स्थापन करताना अटी शर्ती घालत आपली मान्यता दिली. पण तरीही त्यांच्या मनात साशंकता निर्माण झाल्याने मुंबई येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'नंदनवन' या निवासस्थानी मंगळवारी दुपारी पालकमंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांनी भेट घेत झेडपीच्या सत्ता स्थापनेबाबत खलबते केली. मात्र, आतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
या भेटीनंतर मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचीही भेट घेतली आहे. दरम्यान, रात्री उशीरा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.