मार्ली-भालेघर रस्ता खचला

ग्रामस्थांकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 23 June 2025


हुमगाव : जावळी तालुक्यातील मार्ली ते भालेघरदरम्यानचा रस्ता यावर्षीही पुन्हा खचल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार हा रस्ता का खचतोय? याचा अभ्यास करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

पाचवड- पाचगणी मार्गावरील दक्षिणेच्या बाजूला उंच डोंगरावर भालेघर, मार्ली, दिवदेव ही गावे वसलेली आहेत. या गावांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पंतप्रधान सडक योजनेतून त्याकाळात या रस्त्याची निर्मिती झाली होती. पाचवड- पाचगणी मार्गावरील भालेघर फाटा ते पुढे दिवदेव असा अंदाजे सात ते आठ किलोमीटरचा हा घाटरस्ता आहे.

हाच रस्ता पुढे जाऊन मेढा ते भिलारला जोडला गेला आहे. डोंगरावरील ही गावे तुलनेने कमी लोकसंख्येची असली तरी या गावांना जायला दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने या रस्त्यावरच चार ते पाच गावांची भिस्त आहे. सध्या भालेघरपासून मार्लीकडे जाणाऱ्या या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षीही हाच रस्ता बऱ्‍याच ठिकाणी खचला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होऊन साइडपट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत. त्यामुळेच या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

सध्या परिसरात शेतीची कामे जोरात सुरू असतानाच शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वारंवार याच परिसरात रस्ता खचत असल्याने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
टेंभुर्णीत वाघाची कातडी आणि हस्तिदंतसह व्यापारी अटकेत
पुढील बातमी
तारेमध्ये वीज सोडल्याने एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या