आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजना 70 वर्षांवरील सर्वांना सरसकट लागू करण्यात आली

by Team Satara Today | published on : 12 September 2024


नवी दिल्ली : केंद्र सरकारची आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजना  70 वर्षांवरील सर्वांना सरसकट लागू करण्यात आली आहे. यासाठी उत्पन्नाची कुठलीही अट नसणार आहे. यामुळे साडे चार कोटी कुटुंब आणि 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधीच याचा लाभ मिळतोय, त्यांना 5 लाखांचं अतिरिक्त कव्हर मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या जाहीरनाम्यात याचं आश्वासन देण्यात आलं होतं, ते मोदींच्या टीमनं पूर्ण केलं. 

आयुष्मान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देण्याची योजना आहे. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर, सर्वात आधी आयुष्मान कार्ड (Ayushman Card) बनतं आणि त्यानंतर त्याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात. सरकार तुम्हाला दरवर्षी इतकं संरक्षण देतं आणि संपूर्ण खर्च उचलतं. बुधवारी या सरकारी योजनेत मोठा बदल करण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 वर्षांवरील सर्व वृद्धांना 'आयुष्मान योजने'मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारी आकडे पाहिले तर आयुष्मान भारत योजनेंतर्गत तयार केले जमारे आयुष्मान कार्डच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 30 जून 2024 पर्यंत याचा आकडा 34.7 कोटींहून अधिक झाला होता. या कालावधीत 1 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या 7.37 कोटी आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थी देशभरातील 29,000 हून अधिक सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्यानंतर घोषणा करताना आयुष्मान भारत योजनेमध्ये मोठे बदल (Ayushman Bharat Yojna Rule Change) करण्यात आले. त्यांनी सांगितलं की, आता 70 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. या निर्णयाचा हेतून 4.5 कोटी कुटुंबांतील 6 कोटी वयोवृद्ध नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य विम्याचा लाभ मिळावा हा होता. सरकारनं सांगितलं की, या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक नवं आणि वेगळं कार्ड जारी केलं जाईल. ज्येष्ठ नागरिक सध्या केंद्र सरकारच्या कोणत्याही आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असल्यास, त्यांच्याकडे आयुष्मान भारतमध्ये स्विच करण्याचा पर्याय असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्स पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

सरकारकडून ज्यावेळी कोणतीही योजना लॉन्च केली जाते, त्यावेळी त्यासोबतच योजनेसाठी पात्रतेचे सर्व निकषही जाहीर करते. तुम्हाला माहिती आहे का? एका कुटुंबातील किती जण आयुष्मान भारत आरोग्य विमा कार्ड काढू शकतात? गरजूंना सुविधा देण्यासाठी या शासकीय योजनेत (Govt Scheme) अशी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. याचा अर्थ, एका कुटुंबातील जितके लोक आयुष्मान कार्ड बनवू शकतात, परंतु हे सर्व कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र असले पाहिजेत.

कोणाला घेता येईल योजनेचा लाभ? 
Ayushman Bharat Yojna चा लाभ घेण्यासाठी सरकारनं सांगितलेल्या पात्रतेच्या निकषांबाबत बोलायचं तर, ग्रामीण भागात राहाणारे, आदिवासी, अनुसूचित जाती किंवा जमातीतील निराधार किंवा अपंग लोक किंवा जे असंघटित क्षेत्रात काम करतात किंवा रोजंदारी मजूर म्हणून आपला उदरनिर्वाह करतात ते या योजनेअंतर्गत पात्र आहेत. तुम्ही पात्रतेची माहिती ऑनलाईन मिळवू शकता.

अधिकृत वेबसाईट pmjay.gov.in वर जा. 
होमपेजवर 'Am I Eligible' ऑप्शन वर क्लिक करा. 
तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका आणि सब्मिट बटनावर क्लिक करा. 
त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तो तिथे टाका. 
आता स्क्रिनवर तुमचं राज्य निवडा, त्यानंतर मोबाईल नंबर, राशन कार्ड नंबर टाका 
त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल्स येतील, तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की नाही... 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामकाज सुरु करावे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संबंधित बातम्या