कोल्हापूर : “हिंदुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ‘दाभोलकर हत्या’ प्रकरणात विक्रम भावे यांना बळीचा बकरा बनवले गेले आणि त्यांच्या आयुष्याशी उगाचच खेळ मांडला गेला. या खटल्यामध्ये खोटे कथानक उभे करून निर्दोषांना आरोपी ठरवले गेले आहे,” असा ठाम आरोप ‘आकार डि. जी. ९’चे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला.
कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब येथे ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या विक्रम भावे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी श्री. सूर्यवंशी म्हणाले, “जोपर्यंत आपला शेवटचा श्वास चालू आहे, तोपर्यंत ‘गर्वसे कहो हम हिंदू है’, असे म्हणणे सोडू नका. हिंदूंनी अभिमानाने आपल्या धर्माची ओळख जपली पाहिजे.”
या कार्यक्रमात व्यासपीठावर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, लेखक विक्रम भावे आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट उपस्थित होते.
“नॅरेटिव्ह सेट करून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं!” – विक्रम भावे
“या पुस्तकात मी केवळ माझे वैयक्तिक अनुभव नाही, तर एका हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीवर आलेली संकटे सांगितली आहेत. माझी अटक, खोटे आरोप आणि अखेर निर्दोष मुक्तता – ही कहाणी अनेक सुपातील हिंदूंना सावध करणारी आहे,” असे भावनिक उद्गार लेखक श्री. विक्रम भावे यांनी काढले. “हिंदुविरोधी षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपणच पुढे आलो पाहिजे. कुणावरही विसंबून चालणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
हिंदु धर्मासाठी लढणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर
अन्वेषण करणार्या यंत्रणांकडून हिंदु विधीज्ञ परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीसह इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अतिरेकी संघटना म्हणण्याची समाजात प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. आझाद मैदानावरील दंगलीची नुकसानभरपाई, तसेच अनेक शेतकरी, प्लॉटधारक यांच्या लुबाडून घेतलेल्या भूमी हिंदु विधीज्ञ परिषदेने त्यांना परत मिळवून दिल्या आहेत. जो जो हिंदु धर्म आणि कार्य यांसाठी लढतो त्यासाठी आम्ही सतत लढत रहाणार आहोत.
“खोटे आरोप करणाऱ्या अधिकार्यांना शिक्षा कधी?” – सुनील घनवट
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, “दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली, मात्र ज्यांनी त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले, त्या अधिकार्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. ते आजही लाखो रुपयांचे पेन्शन घेऊन सुखात आहेत, ही न्याय व्यवस्थेची शोकांतिका आहे.”
“हिंदुत्वासाठी कारावास पत्करणाऱ्यांचा आदर करा” – रावसाहेब देसाई
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई म्हणाले, “ज्यांनी हिंदुत्वासाठी अन्याय सहन केला, त्यांच्या संघर्षाची दखल घेणे आपले कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करत राहा.”
या प्रकाशन सोहळ्याला कोल्हापूर आणि परिसरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.