सातारा जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील : खा. उदयनराजे

by Team Satara Today | published on : 30 October 2024


सातारा : महायुती सरकारने राज्यामध्ये आणि सातार्‍यात प्रत्येक मतदारसंघातत मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत. शेतकरी, कामगार, महिला, वयोवृद्धांसाठी आणि युवकांसाठी  अनेक योजना महायुतीने केल्या आहेत. त्याला सर्व समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

आमदार मकरंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वाई येथील भाजी मंडई मध्ये मोठी सभा झाली. त्या सभेत खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, नितीन भरगुडे पाटील, राजुशेठ राजपुरे, प्रतापराव पवार, उदय कबुले, बाळासाहेब सोळसकर, वसंतराव मानकुंमरे भाजपा आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मी सातार्‍यातील शिवेंद्रसिंहराजे, शंभूराज देसाई, मनोज घोरपडे, अतुल भोसले आणि आत्ता मकरंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित आहे. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळत आहे. महायुतीच्या विकास योजना तळागाळात पोहोचल्या आहेत. निवडणूक लागली की अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र वाई मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार मकरंद पाटील हे सतत जनतेसाठी कार्यरत असतात. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचे मतदारसंघात मोठे काम आहे. गावोगावी, वाडी वस्तीवर आणि शहरात घराघरात त्यांचा संपर्क आहे. त्याची प्रचिती आज येथे आली आहे. जिल्ह्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मकरंद पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्याच दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या पाठीशी मोठे जनमत आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, मी कायम मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. महायुतीच्या काळात मतदारसंघात चार हजार कोटी रुपयांची विकास कामे  केली आहेत. महाबळेश्वरच्या पर्यटनाचे, प्रतापगडाच्या पुनर्विकासाचे, क्षेत्र महाबळेश्वरच्या विकासाचे. पुणे बंगलोर महामार्गापासून सुरूर ते वाई पाचगणी महाबळेश्वर प्रतापगड या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी सिमेंट कॉंक्रेट चा रस्त्याचे काम सुरू होत आहे. कोरोना प्रादुर्भावातही मी अन्नधान्यापासून उपचारापर्यंत मोठी मदत केली आहे. मतदारसंघात वाई आणि खंडाळा येथे जलसिंचनाचे पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. मतदारसंघात प्रत्येक गावागावात वाडी वस्तीवर आणि कुटुंबाशी माझा निकटचा संबंध आहे. त्यामुळे या मतदारसंघात लोक माझ्या पाठीशी उभे राहतील. मी पाच वर्षे अविरतपणे मतदारसंघाची सेवा केली आहे. त्यामुळे पुढच्या वीस दिवसात सर्व लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मोठ्या संख्येने मला मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधक फक्त सरकारवर टीका करत आहेत ज्यांचे काम नाही त्यांना टीका करणे सोपे असते, असेही ते म्हणाले. यावेळी दिलीप पिसाळ, संजय गायकवाड, प्रतापराव पवार, नितीन भरगुडे पाटील, वसंतराव मानकुमरे, बाळासाहेब सोळसकर आदींची भाषणे झाली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दिग्गजांच्या शक्ती प्रदर्शनाचा दुसरा अंक
पुढील बातमी
पोलीस असल्याचे सांगून वृद्धेची फसवणूक

संबंधित बातम्या