सातारा : जिल्हा परिषद व नगर पालिका अंतर्गत येणारे सफाई कर्मचारी आपले आरोग्य धोक्यात घालून शहर तसेच गावे स्वच्छ करीत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. माणुसकीच्या दृष्टीकोणातून त्यांच्याकडे पहावे व त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात डागोर यांनी सफाई कर्मचार्यांच्या सोयी-सुविधांबद्दल आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगर पालिका व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
सफाई कर्मचार्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने आयुष्यमान भारत कार्ड काढावे, असे निर्देश देऊन डागोर म्हणाले, फलटण नगरपालिकेने सफाई कर्मचार्यांची हेल्थ पॉलीसी काढली आहे. त्याप्रमाणे इतर नागरपालिकांनी कार्यवाही करावी. शहराची व गावांची लोकसंख्या वाढत आहे. एक हजार लोकसंख्येमागे एक सफाई कर्मचारी असला पाहिजे. वाढीव कर्मचार्यांसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांचे निवृत्ती वेतन त्वरीत मिळाले पाहिजे. त्याला कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नयेत, असेही डागोर यांनी सूचित केले.
सफाई कर्मचार्यांना एका वर्षामध्ये 22 सुट्ट्या देय आहेत. शासकीय सुट्याही असतात. पण त्यांना सुट्टीच्या दिवशीही कामावर बोलावले जात असल्यास सुट्टीच्या कामाचा आर्थिक मोबदला द्यावा. सफाई कर्मचार्यांच्या वारसांना हक्काने नोकरी देय आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणानुसार त्यांना रिक्त पदांवर सामावून घ्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेंतर्गत सफाई कर्मचार्यांना घरे उपलब्ध करुन द्यावीत. 1 मे कामगार दिनी उत्कृष्ट सफाई कर्मचार्यांचा सत्कार करावा, असे निर्देशही डागोर यांनी दिले.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात काम करणारे सफाई कर्मचारी शासकीय निवास्थानात राहत आहेत. त्या ठिकाणी नवीन निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. सफाई कर्मचार्यांची दुसर्या ठिकाणी तात्पुरती सोय करावी. सफाई कर्मचार्यांना सफाई शिवाय अन्य कोणतेही काम सांगू नये. सर्व नगर पालिका व नगर पंचायतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करावी, असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.