मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. विराटची निवृत्ती ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका आठवड्यातील दुसरा मोठा धक्का आहे.
"कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता त्याला 14 वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पनाच केली नव्हती. या फॉरमॅटने माझी खरी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन असे धडे कसोटी क्रिकेटने शिकवले," असं विराटने इन्स्टाग्रामवर निवृत्ती जाहीर करणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"पांढऱ्या रंगाच्या जर्सीत क्रिकेट खेळण्यात काहीतरी खास खोलवर रुझलेले वैयक्तिक गुण असतात. शांतपणे खेळणे, लांबलचक दिवस, छोटे छोटे पण महत्त्वाचे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात," असं विराट कसोटी क्रिकेटच्या आठवणी सांगताना पोस्टमध्ये म्हणाला आहे.
"मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय, हे सोपे नाही - पण हेच मला आता योग्य वाटत आहे. मी माझ्याकडे जे होते ते सर्व काही दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे," असं म्हणथ विराटने कसोटी क्रिकेटप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
"मी कृतज्ञतेनं अन् भरल्या मनाने निघून जातोय ते या खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि वाटेत मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहत राहीन याची मला खात्री आहे," असा विश्वास विराटने व्यक्त केली आहे. विराटची कसोटीमधून निवृत्ती हा भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कसोटीमध्ये विराटने 123 सामने खेळले असून त्यात त्याने 210 डावांमध्ये फलंदाजी केली आङे. विराटच्या नावावर 9230 धावा असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 नाबाद इतकी आहे. विराटने कसोटीमध्ये 46.9 च्या सरासरीने धावा केल्या. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 55.6 चा होता. विराटच्या नावावर कसोटीमध्ये 30 शतकं असून एकूण 31 वेळा त्याने अर्धशथकं झळकावली आहेत. विराटने कसोटीमध्ये 1 हजार 27 चौकार लगावते आणि 30 षटकार लगावले आहेत.