सातारा : विलेपार्ले पूर्व कांबळी वाडी येथील 26 वर्ष जुन्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई करून ते जमीनदोस्त केले. ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली ती पद्धत चुकीची असून जैन धर्मियांमध्ये आक्रोश व्यक्त करणारी आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या समाजाच्या शिष्टमंडळाने साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद आहे की, 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी आठ वाजता पोलिसांच्या बंदोबस्तात घाईघाईने कांबळीवाडी येथील जैन समाज मंदिर पाडण्यात आले. या मंदिरातून पूजा साहित्य तसेच परमेश्वर प्रतिमा बाहेर ठेवण्याची सुद्धा संधी देण्यात आली नाही. कोणत्यातरी हॉटेल समूहाच्या प्रभावातून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप या निवेदनात नमूद आहे.
देशातील संपूर्ण जैन समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. या घटनेत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे आणि हे मंदिर पण निर्माण करण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जैन समाजाच्या स्थिरता आणि भावनांचा भारतीय न्याय घटनेनुसार सन्मान करण्यात यावा, अशी मागणी आहे.