सातारा : गणेशोत्सव आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी डॉल्बी यंत्रणा पोलीस यंत्रणेच्या रडावर आहे. मात्र ही डॉल्बी यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मर्यादित डेसिबल मध्येच वाजली पाहिजे. त्या आवाजाचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये. गणपती उत्सव हा श्रद्धेचा उत्सव आहे. उगाच डॉल्बी लावण्याच्या अहमहमिकेमध्ये विनाकारण दुर्घटनेला आमंत्रण दिले जाऊ नये, अशी रोखठोक प्रतिक्रिया सातारा जिल्हा डॉल्बी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली आहे.
श्री गणरायाच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील बुधवार पेठेच्या एका गणेशोत्सव मंडळाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर तसेच डॉल्बीचे जास्त बेस लावण्याचा संदर्भाने सातारा पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कठोर कारवाई केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर एकूणच डॉल्बी या ध्वनीवर्धक यंत्रणेच्या विरोधात समाजमनाचा सुर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर डॉल्बी संघटनेचे नक्की काय म्हणणे आहे, त्या संदर्भाने संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज शेंडे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक भावना प्रकट केल्या.
मनोज शेंडे पुढे म्हणाले, गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव आहे. गणपती उत्सवानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वर्षभर गणपती वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी ठेवतात. मात्र मंडळाचे कार्यकर्ते कमी आणि गणपती उत्सवांमध्ये नाचणारे हौसे गौसे जास्त असतात. वर्षभर ज्या ठिकाणी गणपती ठेवला आहे, तिथे जाऊन कधीतरी भक्ती भावाने ती गणराय वंदना होते का? मग राजवाड्यावर डॉल्बी वाजवायची आणि गणराया आगमनाची मिरवणूक काढायची त्याचा त्रास सर्वसामान्य सातारकरांना होतो. गणेशोत्सवामध्ये साध्या साध्या कृतीतून आणि प्रबोधनात्मक विचारातून आपली श्रद्धा प्रकट करायची असते.
ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये साडेचारशे पेक्षा अधिक डॉल्बी यंत्रणेचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने डॉल्बी किती डेसिबल मध्ये वाजवायची याचे दिलेले कायदे कोणीही मोडता कामा नये. डॉल्बीचा आवाज हा निवासी क्षेत्रामध्ये 55 डेसिबल च्या आतच असला पाहिजे. गणरायाच्या आगमन आणि विसर्जन सोहळ्यामध्ये सातारकरांनी सहभागी झाले पाहिजे, त्यासाठी डॉल्बी व्यावसायिकांची डॉल्बी गणेशोत्सव मंडळांनी ताब्यात घेतल्यानंतर मर्यादित आवाजात वाजवायची हे भान त्यांनी ठेवावे. दोन बेस आणि दोन टॉपला जर परवानगी मिळाली असेल तर, त्याच पद्धतीने डॉल्बी वाजवली जावी. कोल्हापूर जिल्ह्यात दोन बेसचा नियम जर पाळला जात असेल तर सातारा जिल्ह्यात या नियमाचे पालन का होत नाही? केवळ एकमेकांच्या स्पर्धेतून डॉल्बी लावण्याची अहमहमिका ही कोणत्याही मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते, त्यामुळे गणेशोत्सव हा सामाजिक भान देणारा उत्सव आहे. त्याचेच भान ठेवून सर्वोच्च न्यायालयाने ज्या मार्गदर्शक सूचना ध्वनी यंत्रणे संदर्भात दिले आहेत. त्याचे गणेश मंडळांनी आवर्जून पालन करावे, असे आवाहन मनोज शेंडे यांनी केले.