मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तर आज त्याचे निकाल समोर येत आहे. या निकालात महायुतीने 221 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतली असून एकट्या भाजपला 131 ठिकाणी आघाडी मिळाली आहे.
अशातच महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ‘महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना मी धन्यवाद देतो. राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी अशा प्रकारचा विजय मिळाला आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो’, पुढे एकनाथ शिंदे असेही म्हणाले, लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, समाजातील प्रत्येक घटकाने भरभरून मतदान केलं. गेली दोन-अडीच वर्षे महायुतीने जे काम केलं, त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आहे. जनतेचे पुन्हा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले.
तर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं.