पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भाळवणी-शेळवे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अज्ञात व्यक्तीकडून पाईपलाईन फोडणे, ऊस जाळणे, बग्यास जाळणे, बोअरची मोटर तोडून बोअरमध्ये सोडणे, जनावरांच्या चाऱ्याचा गंजी पेटवून देणे असे प्रकार वारंवार केले जात आहेत. अशा विविध कारणांमुळे सदर शेतकरी हवालदिल झाले असून, रीतसर पोलीस तक्रार करूनही पोलीस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोपट एकतपुरे यांनी केळीच्या पिकांसाठी उसाचे बग्यास आणले होते. सदर बागेस रात्री पेटवून दिले. नंदकुमार कापसे यांच्या शेतातील मकवानाची गंज रात्री पेटवून दिली. जगन्नाथ शिंदे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला. प्रसंगावधानामुळे पेटलेला ऊस विझवण्यास यश आले. प्रशांत माळवदे यांच्या बोरमधील मोटार, पाईप, केबल, दोरी कट करून मोटार बोरमध्ये सोडली आहे. त्याचप्रमाणे देविदास लिंगे यांच्या शेतातील चेंबर, सेंचुरी फोडून इतरत्र नेऊन टाकण्यात आली.