सातारा : महालक्ष्मी पतसंस्थेत कर्ज वाटपामध्ये अनियमितता आहे. तसेच 22 ते 25 कोटी रुपयांच्या ठेवींचे हिशोब नाहीत. गेल्या दहा वर्षांमध्ये मर्जीतल्या नातेवाईकांना त्यांच्या क्षमतेच्या वीस पट अधिक कर्ज देण्यात आले आहे. असे विविध आरोप करत पतसंस्थेच्या खातेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चक्री उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सत्र 18 जानेवारीपासून सुरू आहे.
खातेदार आळीपाळीने उपोषणास बसले आहेत. महालक्ष्मी पतसंस्थेचे प्रवर्तक संचालक कर्मचारी यांनी या संस्थेचे काम पाहताना सहकार क्षेत्रातील नियम पाळले नाहीत, मर्जीतल्या ठेवीदारांना व संस्था चालकांच्या नातेवाईकांना वीस पटीने कर्ज देण्यात आले आहेत, त्याची वसुली अद्याप झालेली नाही. तसेच गेल्या दहा वर्षापासून संस्थेचे कोणतेही ऑडिट झालेले नाही. महालक्ष्मी पतसंस्थेचे खातेदार हे वयोवृद्ध आहेत. त्यांना अद्यापही कोणतीही रक्कम मिळाली नाही. तीस ते चाळीस खातेदार असून या पतसंस्थेच्या तीन शाखा आहेत व एकूण रक्कम ही जवळपास 22 ते 25 कोटीच्या घरात आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, सातारा पोलीस अधीक्षक व जिल्हा निबंधक सातारा यांच्याकडे वारंवार दाद मागूनही कोणतीही कार्यवाही झाले ली नाही. त्यामुळे खातेदारांनी टोकाचा मार्ग स्वीकारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चक्री उपोषण सुरू केले आहे.