सातारा : सातारा जिल्हयातील शिधापत्रक धारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली, व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधाया व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांच्याकडे 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
यामध्ये, सातारा तालुका गावे ७, शहरी ठिकाणे – ०१, वाई तालुका – गावे-१५, कराड तालुका गावे- ५, महाबळेश्वर तालुका-४३, कोरेगाव तालुका -१३, खटाव तालुका-११, फलटण तालुका ५, पाटण तालुका-२२, माण तालुका-४, खंडाळा तालुका-७, जावली तालुका ८ अशा एकूण १३४ गावे ठिकाणांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्य क्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता ज्यांना अर्ज करणेचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.