सातारा : बनघर, ता. सातारा गाव उरमोडी जलाशयात बाधित असून या गावचे पुनर्वसन म्हासुर्णे, ता. खटाव येथे झाले आहे. येथील ग्रामस्थांना मिळालेले भूंखड अज्ञात व्यक्तीने नांगरले असून भूखंडाचे नुकसान केले आहे. तरी तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
उरमोडी जलाशयाच्या बांधकामास 1998 रोजी सुरुवात झाली तर बांधकाम 2010 रोजी पूर्ण झाले. यात बनघरसह अनेक गावांचे पुनर्वसन माण-खटाव तालुक्यात झाले. यात बनघर गावचे पुनर्वसन म्हासुर्णे या गावी प्रशासनाने केले. ग्रामस्थांना देण्यात आलेल्या भूखंडापैकी काही भूखंड हे अज्ञात व्यक्तीने नांगरले आहेत. यामुळे भूखंडाचे नुकसान झाले आहे. तरी याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर सुमारे 90 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.