सातारा : सातारा जिल्ह्याचे भूषण असलेल्या छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या प्रवेशद्वारावर प्रचंड कचरा साठला आहे. परिसरातील काही बेशिस्त प्रवृत्तींमुळे या भागाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. याबाबत खेड ग्रामपंचायतीची सार्वजनिक स्वच्छता यंत्रणा काय करते हे समजायला अजिबात मार्ग नाही. ग्रामपंचायतीची स्वच्छता यंत्रणा असूनही येथील कचरा उचलला जात नाही, अशी येथील नागरिकांची तक्रार आहे.
सातारा शहराच्या पूर्व दिशेला पुणे-बेंगलोर महामार्गाच्या पलीकडे कृष्णा नगर भागात छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय नव्या स्वरूपात दिमाखदार पद्धतीने उभे राहत आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने तब्बल साडेचारशे कोटी रुपये निधी दिला आहे. त्यातील निम्म्या निधीतून इमारत उभी राहिली आहे. हा परिसर वेगळ्या पद्धतीने विकसित होत असताना सार्वजनिक स्वच्छतेचे वाटोळे झाले आहे. शासकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारामध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड कचरा पडला आहे. तो कचरा उचलला जाऊनही पुन्हा सातत्याने कचरा केला जातो, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे असले तरी दुसरीकडे खेड ग्रामपंचायतीकडून येणार्या घंटागाडी व ट्रॅक्टरच्या फेर्यांमध्ये सातत्य नसते, अशी नागरिकांची तक्रार आहे.
या आरोप-प्रत्यारोपाच्या घोळामध्ये प्रत्यक्षात कचरा उचलला जात नसल्यामुळे या परिसराला प्रचंड अवकळा आली आहे. सातार्यावरून कोरेगावला जाताना कृष्णा नगर परिसर म्हणजे कचर्याचे कोंडाळे बनला आहे. सातार्याचे वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे जिल्ह्याच्या शिक्षण परंपरेची अस्मिता आहे. असे असताना तेथे सार्वजनिक स्वच्छतेचा गळा घोटला जावा आणि खेड ग्रामपंचायती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेने त्याकडे दुर्लक्ष करावे, ही बाब न समजण्याच्या पलीकडची आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालय परिसर स्वच्छतेचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. गेल्या सहा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असून कचरा कुजून त्याची दुर्गंधी सुटू लागली आहे. त्यामुळे येथे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यापूर्वीच खेड ग्रामपंचायतीने तो कचरा तात्काळ उचलावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
याबाबत स्वच्छता प्रक्रियेची माहिती घेतली असता खेड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सहा प्रभागासाठी साठी एक ट्रॅक्टर उपलब्ध आहे. दुसरा ट्रॅक्टर नादुरुस्त असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर तीन खाजगी वाहने वापरली जातात. स्वच्छता प्रक्रियेचे अद्याप टेंडर काढलेले गेले नाही. याठिकाणी कचरा पडण्याचे प्रमाण सुमारे तीन ते चार टन इतके आहे. प्रत्यक्षात एक टन कचरा उचलला जातो आणि ट्रॅक्टर सेवा दिल्याबद्दल ट्रॅक्टर चालकाला 15 ते 20 हजार रुपये बिल दिले जाते. जर स्वच्छता यंत्रणा जर कमकुवत असेल तर कचरा उचलला जाणार कसा ? हा खरा गंभीर प्रश्न आहे. याबाबत खेड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.