तारळे : सडावाघापूर पठार म्हणजे पावसाळी पर्यटनाचा परमोच्च बिंदू. पावसाची चाहूल लागली, की पर्यटकांची पावले आपोआप पठाराकडे वळतात. त्यात तरुणाईची संख्या अधिक असते. शाळकरी, महाविद्यालयीन तरुण- तरुणींचे जथ्थेच पठारावर धडकू लागतात. पाऊस, वारा, गारठा याची पर्वा न करता तरुणाई बेधुंद होत असल्याचे चित्र पठारावर पाहायला मिळत आहे.
मे महिन्यातच पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने उलटा धबधबा सुरू झाला आहे. दोन दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून, पठारावर धुके, पाऊस यांचा संगम पाहायला मिळत आहे. उलट्या धबधब्याचा आविष्कार देखील सुरू झाला आहे. पर्यटक देखील निसर्गाचा आनंद घेण्यास दाखल होत असून, जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत यंदा पर्यटकांना हा आनंद घ्यावा लागत आहे.
पावसाळी पर्यटन आणि सडावाघापूर पठार याचे समीकरण तयार झाले आहे. हिरवागार निसर्ग, गवताचे गालिचे, धुक्याची चादर, मन व तण चिंब करणारा पाऊस, धुक्यात हरवलेली वाट, पवनचक्की, घरे, सोबत झोंबणारा थंडगार वारा पर्यटकांना साद घालत आहे. पावसाळ्यातील स्वर्ग म्हणजे हे पठार आहे. येथील निसर्गाची मनसोक्त लूटमार अखंड पावसाळा सुरू असते.
उलटा धबधबा सुरू होण्यास जुलै उजाडतो. मात्र, यंदा मे महिन्यात पडलेला पाऊस अधिक चार दिवसांपासून मॉन्सूनचे झालेले आगमनाने धबधबा सुरू झाला आहे. पठारावर हिरवे गालिचे पसरले आहेत, धुक्याची दुलई पठाराने पांघरली आहे. गत आठवड्यापासून येथे गर्दी व्हायला सुरुवात झाली. दररोज शेकडो पर्यटक गर्दी करत होते. मात्र जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्याने पर्यटकांत नाराजी होती. आता नियम व अटींचे पालन करून पर्यटनाचा आनंद घेता येणार असल्याने काही प्रमाणात पर्यटकांत आनंदाचे वातावरण आहे. निसर्गाचे वरदान लाभलेले, प्रचंड उल्हासित करणारे हे पर्यटन स्थळ सर्वांना खेचून आणत आहे.