सातारा : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना व त्यांच्या हत्येच्या सूत्रधारांना तात्काळ फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा संघटनेच्यावतीने ग्रामपंचायत कामकाज बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयात येथे काही काळ रस्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या प्रकरणातून खंडणीखोरांनी पोलिसांच्या मदतीने निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी 3 तास उशिरा फिर्याद घेण्यात आली. राजकीय दबावाला बळी न पडता या घटनेचा तपास होणे गरजेचे आहे. पोलिसांनाही सहआरोपी करण्यात यावे. संतोष देशमुख हत्येच्या सीआयडी मार्फत तपास व्हावा. सदर गुन्ह्यातील राजकीय मास्टर माईंड असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा. खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींप्रमाणे सरपंचानाही संरक्षण कायदा लागू करावा. या हत्येतील आरोपींचे रेकॉर्ड तपासण्यात यावेत. संतोष देशमुख यांच्या पत्नीस शासकीय नोकरी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायींचे कामकाज बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, समाधान पोपळे, संजय शेलार, अरुण कापसे, शत्रुघ्न धनावडे, आनंदराव जाधव, अनिल वाघमळे, बाळासाहेब जाधव, हणमंत देवरे, राहुल डांगे, चंद्रकांत सणस आदी उपस्थित होते.