सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा गुंता सुटलेला नाही .महायुतीचे तिन्ही घटक पक्ष एकमेकांच्या रणनीतीला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत .भारतीय जनता पार्टी कडून अद्याप कोणताही चर्चेचा प्रस्ताव आला नाही तो आल्याशिवाय त्यांच्याशी कोणती चर्चा होणार नाही चर्चा झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट हा एकत्र आहोत, असे थेट स्पष्टीकरण राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जनता दरबार आणि पालकमंत्री आपल्या दारी या दोन योजनांच्या कामा संदर्भात माहिती देण्याकरता शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली
ते म्हणाले शिवसेना पक्षाने सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवले आहे. दहा वर्षापूर्वी पाटणचे तीन जिल्हा परिषद सदस्य होते. आता पाटण कोरेगाव महाबळेश्वर फलटण आणि जावळी या पाच तालुक्यातून 15 सदस्य निवडून आले आहेत. त्यांच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाची नोंदणी प्रक्रिया येत्या सोमवार पर्यंत कदाचित पूर्ण केली जाईल,. अशी माहिती मला त्यांच्या सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्ता स्थापने संदर्भात पत्रकारांनी छेडले असता शंभूराज देसाई म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते जे बोलतात ते करत नाहीत. मिठी मारण्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले मात्र ते फारसे गांभीर्याने नव्हते. शिवसेनेच्या सत्कार मेळाव्यामध्ये आम्ही 15 जिल्हा परिषद सदस्यांच्या भावना ऐकून घेतले असून त्याचा सविस्तर अहवाल येत्या सोमवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे देणार आहोत .पक्षाची साताऱ्याची संपर्क मंत्री शरद कणसे आमच्या समावेत असणार आहेत.
तुम्ही आणि भाजप एकत्र येणार आहात का ? या प्रश्नावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे. सर्व राजकीय परिस्थिती मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे. तसेच सोमवारी आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सत्ता स्थापनेचा जो काही निर्णय होईल ते आमचे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन चर्चा करतील. सातारा जिल्ह्यात सुद्धा भाजप कडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आला नाही मात्र अजित पवार गट राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही एकत्र आहोत. सत्ता स्थापनेचा कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही त्यासाठी तिन्ही घटक पक्षांच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्हाला एकत्र चर्चा करावी लागेल तसेच समीकरण तयार झाल्यास आम्ही समोरासमोर बसून चर्चा करू.
माझे व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी दिवसातून दोन वेळा फोन वरून बोलणे होत आहे. त्यांच्या गट नोंदणीची सुद्धा प्रक्रिया येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कदाचित पूर्ण करून घेतली जाईल. भाजपशी बोलताना सुद्धा आम्ही दोघे एकत्रच चर्चा करणार आहोत असे देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.