मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असताना दुसरीकडे आश्वासनांचा पाऊस पडत आहे. लाडकी बहीण योजनेनुसार महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यापासून ते मोफत वीज आदींचा समावेश आहे. मोफतच्या आश्वासनांवरून अर्थतज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. तर, दुसरीकडे मोफत योजनांमुळे लोकांना फुकट देण्याची सवय लावली असल्याचे म्हटले जात आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार थेट भाष्य केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्त संस्थेला ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यंदाच्या निवडणुकीत लोकांना मोफत देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले की, याची सुरुवात महायुतीने कशी केली असा उलट सवाल केला. त्यांनी पुढे म्हटले की, काँग्रेसने 2003 मध्ये मोफत वीज केली. काँग्रेसने कर्जमाफी दिली, या सगळ्या गोष्टी झाल्याचे अजित पवारांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याशिवाय, शेतीशी संबंधित इतर मुद्यांचा फटका भाजप-महायुतीला बसला होता. विधानसभा निवडणुकीत सोयाबीन, कापसाच्या दराचा मुद्या ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे वातावरण आहे. याबाबत बोलताना अजित पवारांनी सांगितले की, सोयाबीन, कापसाला भाव कमी असताना आम्ही हेक्टरी 5 हजार रुपये असे दोन हेक्टरपर्यंत 10 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांना मदत केली. याही वेळी आमचे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारची मदत घेऊन आम्ही शेतकऱ्यांना मदत करू असेही अजित पवारांनी या मुलाखतीत म्हटले.