नवी दिल्ली : भारत २०३५ पर्यंत स्वत:चे अंतराळस्थानक उभारणार असून २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरविण्याची योजना आहे, असे केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले. अंतराळ संशोधनाविषयीच्या भारताच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली.
जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अंतराळ संशोधनासाठी भारताने काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. अमेरिका व अन्य एक-दोन देशांची स्वत:ची अंतराळ स्थानके आहेत. त्या देशांच्या पंक्तीत भारत काही वर्षांनी बसणार आहे. २०४० सालापर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरविण्याचा आमचा विचार आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२६ या वर्षाच्या प्रारंभी गगनयान मोहिमेच्या अंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात झेपावणार असल्याचे तसेच समुद्रात सुमारे सहा हजार मीटर खोल असलेल्या भागात पाणबुडे पाठविण्याची भारताची योजना असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारताचे जैवतंत्रज्ञान ई३ हे धोरण महत्त्वाचे आहे. भविष्यातील औद्योगिक क्रांती तसेच आयटी क्षेत्रातील संक्रमण या गोष्टींसाठी जैवतंत्रज्ञान आवश्यक आहे.
जैवतंत्रज्ञानविषयक ई३ नावाचे जैवअर्थव्यवस्थेशी संबंधित धोरण अमलात आणणारा भारत हा जगातील पहिला देश आहे, असाही दावा त्यांनी केला. भारताला विकसित बनविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, भारतीय हद्दीतील सागरीक्षेत्राच्या पोटात अनेक खनिज संपत्ती असण्याची शक्यता आहे. तिच्या शोधासाठी ‘डीप सी मिशन’ महत्त्वाचे आहे.
nत्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ व २०२३ मध्ये स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणांतही केला होता. केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाने उपग्रह प्रक्षेपणात महत्त्वपूर्ण कामगिरी व प्रगती केली आहे.
nभारताने श्रीहरिकोटा येथून ३४३ विदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, त्यापैकी ३९७ म्हणजे जवळपास ९० टक्के विदेशी उपग्रह गेल्या दहा वर्षांत या अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले.