कोल्हापूर : भाजपासोबत गेलो नसतो तर पुन्हा तुरुंगात जावे लागले असते, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. तसेच एकदा मी सहा महिने तुरुंगात जाऊन आलो, तिथे जाण्याचा अनुभव घेतला आहे. आता पुन्हा नको. आम्ही तुम्हाला हात जोडत आहोत. आम्ही भाजपासोबत जात आहोत तुम्ही सुद्धा या, असे भुजबळ म्हणाले होते. त्यावर मी त्यांना म्हटले, ज्यांचे हात कुठेतरी बरबटलेले असतात, भ्रष्टाचारात सहभागी झाले असतात त्यांना चिंता आहे. माझ्या सारख्याला चिंता नाही, असे म्हणत शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. गडहिंग्लजमध्ये समरजीत घाटगेंच्या प्रचार सभेच्या दरम्यान ते बोलत होते.
तसेच महाराष्ट्राला फसवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्राला सन्मानाची वागणूक मिळत नाही. यासाठी एकसंघ होऊन महाराष्ट्राच्या पदरात न्याय मिळेल, याची खबरदारी घेण्याची गरज होती. मात्र, याला साथ देण्याऐवजी आमचे काही लोक पळून गेल्याचे पवार म्हणाले आहेत. तसेच तुमच्या आमदारांनी हळूच कानात सांगितले, तुम्ही आमच्याबाबत विचार केला नाही तर आम्हाला आतमध्ये जावे लागेल. त्यानंतर काही दिवसांनी वाचायला मिळाले त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली.
पुढे ते म्हणाले, सोडून गेलेले लोक एक दिवशी भेटायला आले होते. आम्ही सर्वजण काहीतरी वेगळा विचार करतोय. तुम्ही आमच्याबरोबर चला, असे त्यांनी त्यावेळी मला सांगितले. मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितले की, त्याच्यासोबत जाणे मला पटणारं नाही. ज्यांनी तुम्हाला विरोध केला, त्यांच्या दावणीला जाऊन बसायचे का? हे माझ्याकडून शक्य नाही. तुम्हाला काही करायचे असेल तर करा मात्र हे योग्य नाही. या गोष्टीला आम्ही कदापी पाठिंबा देणार नाही, असे पवार त्यावेळी म्हणाले आहेत.