सातारा : माण तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पती स्वप्नील बापू चव्हाण यानेही विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पतीवर उपचार सुरू आहेत. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
माण तालुक्यातील धामणीमध्ये आज सकाळी एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह जीवन संपवल्याची घटना घडली आहे. महिलेचे नाव ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण असून वय 25 आहे. तर मुलीचं नाव शिवानी वय 3 महिने व स्वरांजली वय 6 वर्षे या आपल्या मुलींसह गावालगतच्या तलावात मध्यरात्री जीवन संपवलंय. घटनेची माहिती समजताच पती स्वप्नील बापू चव्हाण वय 28 यानेही विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पतीवर उपचार सुरू आहेत. स्वप्नील याला तात्काळ म्हसवड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती समजताच म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीनही मृतदेह तलावातून बाहेर काढले. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार अधिक तपास करत आहेत.