सातारा : महायुती सरकारने लोकहिताचे निर्णय वेळोवेळी घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. विरोधकांना बोलायला जागा नसल्यामुळे केवळ अफवा म्हणून वेगवेगळ्या योजनांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून राज्याची चौफेर प्रगती सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर लाडकी बहीण योजनेची ओवाळणी वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे लोकहिताचे निर्णय घेणार्या महायुतीला आपण मनापासून साथ द्यावी आणि लोकसभेत दाखवलेली एकजूट विधानसभा निवडणुकीतही दाखवावी, असे आवाहन सातार्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शेंद्रे येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी सेवादलाचे राजेंद्र लावंघरे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे चंद्रकांत जाधव, बाजार समितीचे चेअरमन विक्रम पापा पवार, सुनील काटकर, भारतीय जनता पार्टीचे अविनाश कदम, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, भाजप महिला आघाडीच्या सुनिशा शहा, रंजना रावत, सिद्धीताई पवार, आशाताई पंडित, सातारा जिल्हा बँकेच्या कांचन साळुंखे, नगर विकास आघाडीचे अमोल मोहिते, ऍडव्होकेट दत्ता बनकर, माजी नगरसेवक धनंजय जांभळे, समृद्धी जाधव, परळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले तसेच धर्मराज घोरपडे तसेच महायुतीमधील अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. विरोधक आज योजनेचे पैसे नाहीत म्हणून अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवता कामा नये. महाविकास आघाडीने पसरवलेल्या अफवांचे आपण खंडन केले पाहिजे. प्रत्यक्षात पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे महिला महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्या आहेत. याचा धसका विरोधकांनी घेतला आहे. निवडणूक झाल्यानंतर बहिणींची ओवाळणी वाढवली जाणार आहे. कृषी पंपाचे साडेसात एचपी पर्यंतचे वीज बिल शून्य करण्यात आले आहे. त्यामुळे देणारे कोण आहे आणि विरोध करणारे कोण आहे याचा जनतेने विचार करावा. आपण सुज्ञ आहात. महायुतीच्या माध्यमातून उरमोडी धरणाचे कॅनाल झाले. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या विकासाबाबत मोठ-मोठे निर्णय होत आहेत. खर्या अर्थाने ऊस उत्पादकाला न्याय अमित शहा यांनी दिला आहे. विरोधकांच्या राजकारणात हा निर्णय मुद्दाम लांबवण्यात आला. पण अमित शहा यांनी केंद्रीय सहकार मंत्री या नात्याने ऊस उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेतला. लोकसभेत किमान पायाभूत आधार किमतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.
पुढे बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, एकीकडे विकासाला विरोध करणारी महाविकास आघाडी आहे, तर दुसरीकडे काम करणारे महायुतीचे सरकार आहे. याचा विचार जनतेने केला पाहिजे. मराठा व ओबीसी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडायची वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे एकेकाळी महाराष्ट्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता. मग त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही, असा सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा पेच वाढवायचा नसेल तर महायुतीला मनापासून साथ दिली पाहिजे. कायद्याच्या निकषावर टिकणारे मराठा आरक्षण हवे असेल तर त्याचा पर्याय म्हणजे फक्त महायुती आहे, असे शिवेंद्रसिंहराजे ठामपणे म्हणाले. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत संपूर्ण सातारा विधानसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागे उभे राहिला, तशीच ताकद आपल्याला आता विधानसभा निवडणुकीत दाखवायची आहे आणि अफवा पसरवणार्या प्रवृत्तींना आपण रोखठोक उत्तर द्यावयाचे आहे अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त करत मतदान 80 टक्के भाजपला कसे होईल याचा विचार करावा, असे ते म्हणाले.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, आम्ही राजघराण्याच्या कुळात जन्माला आलो आहोत हे आमचे भाग्य आहे. आम्ही दोघेही कधीही स्वार्थी विचार करत नाही. स्वार्थी विचार एकच करतो की जनतेची सेवा आमच्या हातून घडली पाहिजे. मोठमोठ्या पदांवर पोहोचण्याची सर्वांनाच अपेक्षा असते. मात्र जनतेच्या हिताचे निर्णय होणे अपेक्षित आहे. महायुतीच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख झाली आहे. त्यामुळे मतदारांनी याचा सांगोपांग विचार करून विधानसभेला योग्य तो उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. विरोधकांना जी टीका करायची आहे त्याचे उत्तर कामातूनच दिले जात आहे. ज्या वेळेला टीकेचे मुद्दे उरत नाहीत तेव्हा त्या टीका आपोआपच निष्प्रभ होतात. एकेकाळी महाराष्ट्रात कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र गेल्या दहा वर्षात असे काय घडले लोकांनी भारतीय जनता पार्टीला मनापासून स्वीकारले आहे. छत्रपती शिवरायांनी नेहमी जातीपातीचा कधीच विचार केला नाही. तसेच आम्ही कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. जिल्ह्यात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया. सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आपल्याला विक्रमी मताधिक्याने विजयी करावयाचे आहे. त्यासाठी आपण कामाला लागू या, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांचाही भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
पुष्पा पिक्चर सुद्धा फिक्का पडंल...
खा. उदयनराजे आपल्या स्टाईलसह त्यांच्या मिश्किलीबाबत प्रसिद्ध आहेत. भाषणादरम्यान त्यांनी शिवेंद्रराजेंकडे पाहत मिश्किली केली. ते म्हणाले, मी सर्व कार्यक्रमात शिवेंद्रराजेंकडे पाहत होतो. डोक्यावरचं थोडं कमी झालंय, पण दाढीबाबत पुष्पा पिक्चर सुद्धा फिक्का पडंल, अशी मिश्किली केली. त्यांच्या या वाक्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर त्यांनी त्यांच्या हटके स्टाईलने कॉलर उडवली. त्यांच्या या ऍक्शनने उपस्थित तरुणाईने शिट्ट्या, टाळ्यांचा एकच गलका केला.