माळशिरस : कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कार आणि भरधाव वेगात समोरुन येणार्या टेम्पोचा भीषण अपघात कारुंडे येथील पुलावर झाला. या अपघातात पाचजण ठार, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे - पंढरपूर मार्गावरील लासूर्णे येथून 20 किमी अंतरावर असणार्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर आज रविवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात राजेश अनिल शहा (वय 55), दूर्गेस शंकर घोरपडे (वय 28), कोमल विशाल काळे (वय 32), शिवराज विशाल काळे (वय 10) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश लोंढे (वय 25), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय 30), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे तिघे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता. अपघातातील जखमी आकाश लोंढे यांचाही मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून इतर दोन जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
घटनेचे वृत्त असे की, लासूर्णे (ता.इंदापूर) येथील राजेश शहा हे त्यांच्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी नातेपुते येथून ते रॉंग साईडने पुढे निघाले होते. त्यांची गाडी सकाळी 8 च्या दरम्यान, लासूर्णे पासून 20 किमी अंतरावर असणार्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर आली. यावेळी समोरून येणार्या भरधाव टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले होते. मात्र या जखमींपैकी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.