सातारा : विजयादशमीच्या मुहुर्तावर दि. २ आॅक्टोबर रोजी पारंपरिक वाद्य वादनासाठी जिल्हा प्रशासनाने दहा वाजेपर्यंत दिलेली मुदत बारा वाजेपर्यंत वाढवावी, अशी मागणी सदरबझार येथील काही नवरात्रौत्सव मंडळांनी जिल्हा प्रशासनाकडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदरबाझार येथील भारतमाता मंडळ, युवक क्रीडा सांस्कृतिक मंडळ, भवानीमाता मंडळ, नवचैतन्य दुर्गा उत्सव मंडळ, जय भवानी सांस्कृतिक मंडळ, यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून नवरात्र उत्सवात यावर्षी शस्त्रपूजन व दसरा वेगवेगळ्या तारखेला आल्यामुळे 1 तारखेला शस्त्रपूजन व २ तारखेला विजयादशमी मिरवणूक या तांत्रिक कारणामुळे १ तारखेला रात्री १२ पर्यंत परवानगी दिली आहे. या दिवशी कोणत्याही मंडळांची विसर्जन मिरवणूक निघणार नाही. आणि महत्वाच्या दिवस विजयादशमी असूनही प्रशासनाने २ तारखेला मिरवणूक व पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी १० वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. ती दुरूस्ती करून पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली जावी. आम्ही सर्व मंडळे पोलिस प्रशासनास सहकार्य करून मिरवणुकीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणार आहोत. आम्ही २०१६ पासून डॉल्बीमुक्त मिरवणूक काढत आहोत. तरी दि. २ रोजी पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी रात्री १२ पर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी निवदनात केली आहे.
यावेळी भारतमाता मंडळाचे मार्गदर्शक विकास धुमाळ, अध्यक्ष अजित भुतकर, युवक क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रोहित शितोळे, मार्गदर्शक योगेश तारळकर, सतीश कांबळे, सादिक बेपारी, राहुल लाड, विशाल इंगवले, राहुल काकडे, विष्णू पवार, विशाल सकट, विजय पवार, निखिल लाड व सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.