राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय माता दिवस’ म्हणून साजरा व्हावा; मुस्लिम मावळ्यांची जिल्हा प्रशासनाकडे ऐतिहासिक मागणी

by Team Satara Today | published on : 07 January 2026


सातारा :छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला दिशा देणाऱ्या, राष्ट्रघडणीच्या मातृत्वाचे तेजस्वी प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ यांचा  जन्मदिवस १२ जानेवारीहा ‘राष्ट्रीय माता दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी प्रेरणादायी व राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी ऐतिहासिक मागणी मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा संघटनेच्या वतीने राजधानी सातारा येथून करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच खासदार यांना सविनय निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर संपूर्ण राष्ट्राला दिशा देणाऱ्या आदर्श मातृशक्तीचे प्रतीक होत्या. त्यांच्या संस्कारांतून स्वराज्याचे स्वप्न पाहणारे, न्यायप्रिय, धर्मनिरपेक्ष आणि माणुसकीवर आधारित राज्यकारभार करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडले.

राजमाता जिजाऊ यांनी आपल्या पुत्राला स्त्री-सन्मान, अन्यायाविरुद्ध निर्भय लढा, प्रजाहितदक्ष शासन आणि सर्व धर्मांचा आदर करण्याचे संस्कार दिले. शिवाजी महाराजांनी स्त्रियांविषयी दाखवलेली संवेदनशीलता, सर्व धर्मीय संत, सैनिक व प्रजाजनांना दिलेला सन्मान—यामागे जिजाऊ मातेचेच संस्कार असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

आजच्या काळात जेव्हा समाजाला मातृत्वाचा सन्मान, स्त्री-सुरक्षा, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेची नितांत गरज आहे, तेव्हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय माता दिवस’ म्हणून साजरा होणे काळाची गरज असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. यामुळे सर्व धर्मांतील माता-भगिनींना प्रेरणा मिळेल, नव्या पिढीमध्ये सुसंस्कार रुजतील आणि शिवविचारांवर आधारित मजबूत राष्ट्रनिर्मितीस बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस अधिकृतपणे ‘राष्ट्रीय माता दिवस’ म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी नम्र व राष्ट्रीय भावना जपणारी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई यांनी ही मागणी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मांडून यावर चर्चा करून निर्णय घेण्याचे तसेच पंतप्रधानांकडेही ही मागणी पोहोचवण्याचे आश्वासन दिले. आचारसंहितेची अडचण नसल्यास सातारा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्मदिवस माता दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी यांनी ही मागणी शासन पातळीवर मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष, मसापचे कार्याध्यक्ष आणि सातारा जिल्ह्यात साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावलेले विनोदजी कुलकर्णी यांनी ही मागणी रास्त असून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा संघटनेचे संस्थापक सादिकभाई शेख यांच्यासह अझहर मणेर, अरबाज शेख, आरिफ खान, शाहरुख शेख, राजू मुस्तफा, हाजी नदाफ, बशीर मुलाणी, मुसरत शेख, जमीर शेख, अझहर शेख, निहाल मुलाणी, साद काझी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ही मागणी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून, मातृत्व, मानवता आणि राष्ट्रीय एकतेचा गौरव करणारी ऐतिहासिक पायरी ठरेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनचे कामकाज शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच ; ऑनलाइन प्रणालीवर निविदा प्रकिया
पुढील बातमी
सातारा शहर पोलिसांचा बॉम्बे रेस्टॉरंट येथे जुगार अड्ड्यावर छापा

संबंधित बातम्या