सातारा : सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण ओळखले जाणार्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस तब्बल 346 मिलिमीटर बरसला आहे. मान्सून आगमनाच्या आधीच पावसाने एकूण आकडेवारीची एक तृतीयांश सरासरी गाठल्याने पुढील तीन महिन्यात पाऊस किती बरसणार, का अतिवृष्टीचा जलवा पाहायला मिळणार? यामुळे बळीराजा धास्तावला आहे. शेतकर्यांना शेतीच्या कामाची पावसामुळे उसंत मिळेनाशी झाली आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी 858.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
26 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हवामान खात्याचा अहवालानुसार महाबळेश्वर तालुक्यात तब्बल 346.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवकाळीच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील बेंडा नदी, लिंगमळा धबधबा व इतर नाले ओसंडून वाहत आहेत. पर्यटकांच्या आकर्षण असलेले धबधबे पुन्हा एकदा सजीव झाल्याने थंडीच्या सरी, धोके याचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वर मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. सातारा जिल्ह्यात सरासरी 858.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये दहा ते अकरा पावसाळी दिवसाची नोंद झाली आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात झालेल्या पावसामुळे कोयना जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणूक झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी विसर्ग काही ठिकाणी बंद करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात देखील पावसाची शक्यता आहे. पुढील 72 तास हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. माण व खटाव या दोन्ही तालुक्यांमध्ये तब्बल 276 मिलिमीटर, तर फलटण सारख्या तालुक्यामध्ये 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा 273.4, पाटण 254.9, कराड 218.7, कोरेगाव 217.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाई मध्ये सुद्धा 230 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने मे महिन्याच्या अखेरीसच एकूण सरासरीच्या 1/3 पाऊस झालेला आहे.
अद्याप सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही. तरीसुद्धा येणारा पाऊस तुर्त अवकाळीच म्हणावा लागणार आहे. बळीराजाला शेतीच्या कामाची उसंत पावसामुळे मिळेनाशी झाली आहे. माण तालुक्यातील 145 हेक्टर जागांवर फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही महसूल विभागाच्या पंचनामे यांच्या कारवायांनी गती घेतलेली नाही. सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्याही फारशा तक्रारी दिसून आल्या नाहीत. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे माण-खटाव च्या पूर्व भागांमध्ये सार्वजनिक रस्त्यांची दैना उडाली असून दळणवळणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सातारा तालुक्यातील ठोसेघर तसेच येथील डोंगरदर्यातले धबधबे पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने पावसाळी पर्यटनाला आत्तापासूनच जोर चढला आहे.