सासवड : आमचं महायुतीचं सरकार हे फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम करणारे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार असून, कोणतीही योजना आम्ही बंद करणार नाही, असे आश्वासन त्यांनी सासवड येथील जाहीर सभेत बोलताना दिले.
राज्यात महविकास आघाडीचे सरकार असताना अडीच वर्षात सिंचनाचे फक्त चार प्रकल्प पूर्ण केले. आपल्या काळात शेकडो प्रकल्प पूर्ण करून शेती ओलिताखाली आणली. शेतकरी सन्मान योजना, एक रुपयात पिकविमा योजना, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना सुरु केले. आणि हे कपटी सावत्र भाऊ कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना हाकलून दिले. आम्हाला भीक देता का म्हणाले. पैसे दिल्यावर लवकर काढून घ्या नाही तर योजना बंद पडली म्हणून सांगतील, असे सांगून नोव्हेंबर पर्यंत पैसे दिले असून, निवडणूक होताच डिसेंबरचे पैसे पण देणार, ही लेना बँक नाही तर देना बँक आहे. तुमच्या काळात फक्त माझे काय आणि मला काय यात गेले. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
तुमच्या अडीच वर्षाच्या काळात कंपन्या, उद्योग, मंदिरे सर्व बंद होती, आम्ही सरकार मधून बाहेर पडलो आणि पुन्हा सर्व सुरु केले. तुम्ही फक्त फेसबुक लाइव्ह होता. पण आम्ही फेस टु फेस शेतकऱ्यांच्या दारात जावून योजना दिल्या. आम्ही सुरु केलेले प्रकल्प बंद करण्यापेक्षा तुम्ही काय करणार ते सांगा ना ? अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला.
महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भोर विधानसभा शिवसेनेचे उमेदवार रमेश कोंडे, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव, वासुदेव काळे, ममता शिवतारे, दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, निलेश जगताप, पंकज धिवार, राहुल शेवाळे, शालिनी पवार, ज्योती झेंडे, अतुल म्हस्के, दत्तात्रय काळे, डॉ. राजेश दळवी, ऍड. नितीन कुंजीर, मंदार गिरमे आदी उपस्थित होते.
विजय शिवतारे यांनी तालुक्यात मोठा निधी आणला आहे. त्यांना संपूर्ण राज्य माहिती आहे. त्यांना राज्यात अनेक प्रकल्प राबविले आहेत. उरुळी देवाची, फुरसुंगी मधील लोकांचा टॅक्स, सासवड, जेजुरी मधील पाण्याची योजना, खंडोबा साठी ३४९ कोटीला मान्यता दिली, मावडीची जमीन शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे कोणताही प्रकल्प जनतेच्या डोक्यावर लादनार नाही. असे सांगून एकीकडे शिवतारे कामे आणीत असताना पुरंदरचे विद्यमान काय फक्त सासवड पुरतेच आहेत काय ? एवढी सर्व कांमे झाली असताना इथले आमदार झोपले होते का ? अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय जगताप यांनाही फटकारले आहे. तर महायुतीचे फक्त विजय शिवतारे असून, इतर कोणी फसवत असेल तर सावध राहा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे यांना सूचक इशारा दिला आहे.