सातारा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला असून, यामध्ये सातारा जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात स्मार्ट स्कूल, स्मार्ट आरोग्य केंद्र हे चांगले उपक्रम होत असून, ते पुढेही सुरूच राहतील. याचे अनुकरण राज्यातील इतर जिल्हेही करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार
परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीद्वारे १०० दिवसांचा
कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना केली आहे. यामुळे कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत
पाेहोचणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीही आठवड्यातून किमान दोन दिवस
क्षेत्रभेट द्यावी. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांना ही भेट देणे आवश्यक आहे. कारण, शिक्षण आणि आरोग्य हे दोनच महत्त्वाचे प्रश्न आहेेत. याबाबत
प्रांताधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आलेली आहे.सातारा जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र मोठे आहे. यातील
काही नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत याचाही फायदा करून घेण्यात येणार आहे. तसेच
धुमाळवाडी हे फळांचे गाव, भिलार
पुस्तकांचे अशी काही गावे स्वत:ची ओळख निर्माण करत आहेत. या गावांची
राष्ट्रीयस्तरावरही ओळख व्हावी, यासाठीही
प्रयत्न करण्यात येतील, असेही
जिल्हाधिकारी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सातारा जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही...पत्रकार परिषदेत समाज माध्यमावर सातारा जिल्ह्याचे विभाजन होण्याचा संदेश प्रसारित होत असल्याचा प्रश्न जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना करण्यात आला. यावर त्यांनी विभाजनाचा प्रस्ताव आमच्याकडून गेलेला नाही. तसेच तशी माहितीही कोणी मागवली नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
पंतप्रधान आवासमध्ये जिल्ह्यात १४ हजार घरकुले...
जिल्ह्यातील घरकुल योजनेबाबतही जिल्हाधिकारी पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. दुसरा टप्पा मंजूर असून, सातारा जिल्ह्याला १३ ते १४ हजार घरकुले मिळतील. त्यामुळे अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.