ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री

by Team Satara Today | published on : 25 December 2024


सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्याची शान- आन- बान वाढलेली आहे. त्यात माण अग्रक्रमी आल्यामुळे या चौकाऱ्यांमध्ये आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवडीने शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनीही सातारा शहरात दमदार एन्ट्री केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. 

गेले दहा वर्ष राजकीय संघर्ष झाला. सख्खा भाऊ पक्का वैरी झाले होते. या संघर्षामुळे अनेकदा न्यायालय व पोलीस ठाणे, पत्रकार परिषदा अशा अनेक ठिकाणी संघर्षाची ठिणगी पेटवण्यात आली होती. आता मात्र गोरे बंधूंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा चेहरा पुढे आणलेला आहे.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या समूहामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गोरे बंधूंनी केलेल्या करिष्मा मुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. विशेष बाब म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांच्या पायगुणामुळे पहिल्यांदाच माण खटाव मतदारसंघात कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामविकास व पंचायत राज निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण झालेले आहे. गोरे बंधूंच्या या भूमिकेचे संपूर्ण महाराष्ट्रात स्वागत होत आहे.

सातारा शहरांमध्ये छत्रपती श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जोडीला आता मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराजे देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार डॉ.अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन कांबळे पाटील यांची समर्थ साथ लाभलेले आहे.

सातारा शहरात युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या बॅनरबाजीमुळे आगामी सातारा नगरपालिकेमध्ये गुणवंत, सामाजिक कार्याची जाण असलेले व मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराचा विकास करणाऱ्या निवडक व मोजक्याच नगरसेवकांचे हाती नगरपालिकेची सत्ता देण्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला आहे. सातारा शहरात युवानेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे काम सध्या अविनाश जाधव, निखिल मोरे आणि पदाधिकारी करत आहेत. 

प्रत्येक गोष्टींमध्ये राजकारण न पाहता ज्यांचं समाजामध्ये चांगले काम आहे. ज्यांच्याबद्दल माध्यमातूनही चांगली प्रतिमा आहे. अशा व्यक्तींनाच नगरसेवक पदी संधी द्यावी. त्याचबरोबर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व स्वखर्चाने गोरगरिबांची सेवा करणारे सातारा जिल्हा परिषद सदस्य व सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सदस्य व स्थानिक नगरपालिका पंचायत नगरसेवक असावेत, असाही यानिमित्त सूर पसरवला जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातारा नगर पालिका हद्दीतील विकासकामांचा आता चांगल्या पद्धतीने अनुशेष भरून काढण्यासाठी शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगाने हालचाली सुरू झाल्याची माहिती अनेक मान्यवरांनी दिलेली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू
पुढील बातमी
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

संबंधित बातम्या