गुरूकुल स्कूलमध्ये भरणार आता पालकांची शाळा

देशातील पहिलाच उपक्रम; नाविण्यपुर्ण उपक्रमामुळे पालकांमध्ये उत्सुकता

by Team Satara Today | published on : 09 December 2024


सातारा : गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात.

यामध्ये प्रामुख्याने वीज बचत अभियान, एक मूठ धान्य, चमी स्कूल बॅग, गणवेशाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणे असेल, हे उपक्रम मागील 10 ते 12 वर्षापासून सातत्याने सुरू आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यात सकारात्मक बदल दिसून आले आहेत.

याच अनुषंगाने गुरूकुल स्कूलच्या व्यवस्थापनाने पालकांशी संवाद साधत चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची शाळा सातारच्या प्रसिध्द डॉ. चित्रा दाभोलकर, लेखिका डॉ. आदिती काळमेख व मानसमित्र अतुल शहा याच्या सहभागाने सुरू करण्यात येणार आहे, असे गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पालकांच्या झालेल्या सभेत सांगितले.

यावेळी सचिव आनंद गुरव, कु. ऐश्‍वर्या चोरगे, माध्यामिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्‍वनाथ फरांदे व पालक शिक्षक सदस्य उपस्थित होते.

आजच्या धावपळीच्या जीवनपध्दतीमुळे काही ठिकाणी आई, वडील दोघेही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेत असतात. तसेच विभक्त कुटुंब पध्दतीमुळे घरातील ज्येष्ठांचा अभाव यामुळे बर्‍याचवेळा पाल्य घरात एकटेच असते. तसेच आजच्या इंटरनेट व सोशल मिडीयाच्या युगात मुलांना सहज उपलब्ध होणारा स्मार्टफोन, पालक व मुलांच्यात कमी झालेला संवाद, मुलांना भेडसावणार्‍या सामाजिक समस्या या अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ सुरू असल्याचेे जाणवत आहे. हार्मोन्स मधील बदल यामुळे मुलांचे चिडचिड होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ, खोटे बोलणे, चंगळवादाचा ओढा यामुळे मुलांचे संगोपन करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.

यावेळी गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सांगितले की, या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यावर असे निदर्शनास आले की, सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांसोबत कसा संवाद साधावा, मुलांच्यात होणारे नैसर्गिक, मानसिक व सामाजिक बदल समजून घेण्यासाठी पालकांनाच आज प्रशिक्षित करणे गरजेचे असल्याचे जाणवत आहे.

गुरूकुल स्कूलच्यावतीने सुरू करण्यात येत असलेल्या पालकांच्या शाळेमध्ये खालील प्रकारचे उपक्रम प्रथम स्तरावर राबविण्यात येणार आहेत.

1) किशोर अवस्थेतील विविध क्षेत्रातील वाढ व विकास, समस्या, मुलांचे संगोपन, संगोपनातील त्रुटी जाणून घेण्यासाठी

2) मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक वर्तन याबाबत होणारे बदल

3) मुलांच्यात एकाग्रता नसणे, सतत चिडचिड करणे, मोबाईल सोशल मीडियाचा गैरवापर, अभ्यास न करणे, खोटे बोलणे, व्यसनाधिनता यांसारख्या अनेक समस्यांचा उहापोह व मार्गदर्शन पालकांना करण्यात येणार आहे.

पालकांची शाळाहा उपक्रम कदाचित देशातील पहिलाच उपक्रम असू शकतो, असे मत चोरगे यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे नक्कीच शाळेला व पालकांना अपेक्षित असलेले विद्यार्थी घडविले जातील असा आम्हास विश्‍वास आहे, असेही ते म्हणाले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है
पुढील बातमी
संजय मल्होत्रा RBIचे नवे गव्हर्नर, केंद्र सरकारची मोठी घोषणा

संबंधित बातम्या