तब्बल 50 टन कचरा... केवळ तीन आरोग्य निरीक्षक

तीन रक्त पदांचा अनुशेष भरणार कधी? सार्वजनिक आरोग्याची ऐशी तैशी

by Team Satara Today | published on : 04 June 2025


सातारा : सातारा शहराच्या दोन लाख लोकसंख्येसाठी दररोजचा 50 टन कचरा संकलित होत असताना त्याच्या नियमानासाठी केवळ तीन आरोग्य निरीक्षक उपलब्ध आहेत. पालिकेच्या आकृतीबंधाचा हा असमतोलपणा सार्वजनिक स्वच्छतेच्या मुळावर आला आहे. कॅबिनेट जिल्ह्यातील नगर पालिकेला आरोग्यनिरीक्षक मिळू नये, ही दुर्दैवाची बाब आहे. उर्वरीत पदे तत्काळ भरली जावीत, अशी सातारकरांची मागणी आहे. 

सातारा शहराची हद्दवाढ होऊन आता सहा वर्षे उलटत आली आहेत. शहराची लोकसंख्या दोन लाखापर्यंत विस्तारली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीनंतर 25 प्रभागातून पन्नास नगरसेवक निवडले जाणार आहेत. सातारा शहरातील 19 मुकादमांना नियंत्रित करण्यासाठी केवळ तीन आरोग्य निरीक्षक उपलब्ध आहेत. त्यातील अनुभवी आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, प्रशांत गंजीवाले व सागर बडेकर यांची नुकतीच वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली आहे. त्यांच्या बदल्यात सातारा पालिकेला अरुण जाधव हे एकमेव आरोग्य निरीक्षक मिळाले. ते सुद्धा 20 जून पर्यंत काही कारणास्तव रजेवर गेले आहेत. आता सातारा शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी राकेश गलियाल व गणेश काकडे यांच्यावर येऊन पडली आहे. मात्र ही तिन्ही नावे शहराचा कार्यभार सांभाळण्याच्या दृष्टीने अत्यंत नवी असून त्यांना रोजच्या 50 टन कचरा संकलनाचा कार्यभार सांभाळायचा आहे. 19 मुकादम आणि 280 स्वच्छता कर्मचारी यांचे नियमन, त्यांची हजेरी, बायोमेट्रिक नोंद, त्यांचे वेतन नियमन अशा बर्‍याच कार्यक्रमांमध्ये आरोग्य निरीक्षक कर्तव्यदक्ष असणे गरजेचे आहे. या नवीन कारभार्‍यांना पालिकेच्या स्वच्छतेचा कारभार कसा जमणार, हे पाहणे मात्र महत्त्वाचे आहे. 


आकृतीबंध आहे तर मग पदे रिक्त का ?

सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला राज्याच्या मंत्रिमंडळात एक वेगळे वजन आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्याचे चार भूमिपुत्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा भूषवत आहेत. खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा हे होम ग्राउंड आहे. मग असे असताना सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचा आकृतीबंध भरला का जात नाही, हा प्रश्न आहे. राज्यामध्ये आरोग्य निरीक्षक पदाची उपलब्धता आस्थापनेच्या 19 टक्केच असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ही पदे भरण्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


ओढ्यांची स्वच्छता कागदोपत्री की प्रत्यक्षात ?

सातारा शहरांमध्ये छोटे-मोठे मिळून तब्बल 27 ओढे आहेत. या ओढ्यांच्या स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाला 10 जून ची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान आरोग्य विभागाचे सरावाचे शिलेदार बदलून गेल्याने नव्या चेहर्‍यावर कामाचा मोठा भार पडला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला सक्षम कारभाराची गरज आहे. यासाठी प्रशासक अभिजीत बापट आरोग्य विभागाचा कारभार कोणाच्या गळ्यात सोपवणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. सध्या तरी उपमुख्याधिकारी अरविंद दामले हा आरोग्य विभागाचा कारभार बघत आहेत. शहरातील 27 ओढ्यांपैकी केवळ 19 ओढेच स्वच्छ झाले असून अजून ओढ्यातील गवत काढणे, तेथील कचरा हटवणे आणि त्यातील मार्गिका गाळापासून मुक्त करणे इत्यादी कामे प्रलंबित आहेत. रामाचा गोट, चिमणपुरा आणि व्यंकटपुरा या तीन पेठेच्या सीमेवरील ओढा पूर्णपणे गाळाने भरला असून त्याची एक मार्गिका बंद आहे. येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देऊनही या ओढ्याची अद्याप स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे सातारा शहरातील ओढ्यांची स्वच्छता ही कागदोपत्री रंगवली जात आहे काय, असा प्रश्न विचारला जात आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एकाविरोधात तक्रार
पुढील बातमी
प्रसिध्द निवेदिका स्नेहल दामले यांना कानडे स्मृती पुरस्कार जाहीर

संबंधित बातम्या