रायरेश्वर येथे रविवारी शिवशंभू स्वराज्य मोहिम

शिवशंभू प्रेमी घेणार शिवशपथ

by Team Satara Today | published on : 24 April 2025


सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या व छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणपणाने रक्षिलेल्या स्वराज्याच्या मुल्यांची जनतेमध्ये रुजवणूक, पुनर्स्थापना करण्याची ‘शिवशपथ’ घेण्यासाठी महाराष्ट्रातून शिवशंभू प्रेमी व किर्तनकार यांच्या पुढाकाराने रविवार दि. 27 एप्रिल रोजी रायरेश्वर (ता.भोर) येथे शिवशंभू स्वराज्य मोहिमेचे आयोजन केले आहे, अशी माहिती शिवशंभू स्वराज्य मोहिमेच्या संयोजकांनी दिली आहे. शिवशंभू स्वराज्य मोहिमेचे आयोजक असलेल्यांपैकी सातारा येथील विजय मांडके व प्रा गौतम काटकर यांनी सांगितले की, छ. शिवरायांनी अवघ्या 16 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन स्थापन केलेले रयतेचे स्वराज्य हे सर्व जातीधर्मातील स्त्रीपुरुषांना सोबत घेऊन स्थापन केले होते. मुख्यतः दिल्लीश्वर बादशहा, राजे, सरंजामदार आणि वतनदारांच्या जाचातून सर्व जनतेच्या मुक्तीसाठी हे स्वराज्य होते. वारकरी संतांच्या विचार क्रांतीवर त्याचा पिंड पोसलेला होता. म्हणून तर त्यांनी वारकरी पताका स्वराज्याचे निशाण म्हणून स्वीकारले. या विचारांच्या आधारे त्यांनी मनुस्मृतीचा पायाच नाकारुन वारकरी संतांच्या विचाराच्या आधारे चालणारी नवी राज्य व्यवस्था उभी केली, शेतकर्‍याला जमीन, बी-बियाणे, नांगर , खायला अन्न आणि बिनव्याजी कर्ज दिले. दुष्काळात शेतसारा माफ केला. शेतकर्‍यांप्रमाणेच महिलांची काळजी घेतली व त्यांना सन्मान दिला, जातीभेद, धर्मभेद नाकारला, जनावरे, वनस्पती, प्राणी, व्यापार, यांना महत्त्व दिले. छत्रपती म्हणून तशी आज्ञापत्रेच काढली होती. छ. शिवरायांच्या नंतर छ. संभाजी महाराज यांनी तीच आज्ञापत्रे आणि तोच राजकीय व्यवहार रयतेसोबत कायम ठेवला.  आपल्या दोन्ही छत्रपतींनी राबणार्‍या बहुजन समाजाचे विषमतावादी धर्म नियमाने नाकारलेले हक्क मिळवून दिले, त्या आधारावर राजर्षी शाहू महाराज यांनी नवे कायदे केले. त्यातून आम्हा सर्वांना शिक्षण, आरक्षण, जमिनीची मालकी, सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला. छ. शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे स्वराज हाच भारतीय संविधानाचा पाया झाला. गेल्या शतकापासून छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या विचारांची व इतिहासाची बदनामी, मोडतोड करुन जात आणि धर्माच्या आधारे जनतेमध्ये फूट पाडण्याचे कपटी उद्योग काही मंडळी सातत्याने करत आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता सांगणार्‍या वारकरी संतांच्या विचाराच्या विरोधी विचार जाणिवपूर्वक पोसले जात आहेत, बारा बलुतेदार, अठरापगड जातीधर्माच्या रयतेला एकत्र करून छत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याची समता, बंधुता, स्त्रिया, श्रमिक, राबणार्‍या हातांचा, शेतकर्‍यांचा सन्मान, न्याय ही मुल्ये पायदळी तुडविली जात आहेत. जनतेचे दारिद्र्य, अन्याय, अत्याचार वाढतच आहेत. यासाठी छ. शिवरायांनी रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली होती का? अशावेळी आपण सर्व शिव शंभूप्रेमींनी गप्प बसणे योग्य ठरणार नाही, म्हणून महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमी व किर्तनकार यांनी एकत्र येऊन स्वराज्याच्या मुल्यांची जनतेमध्ये नव्याने रुजवणूक, पुनर्स्थापना करण्याची ’शिवशपथ’ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिर येथे शिवशंभू स्वराज्य मोहिमेचे आयोजन केले आहे. ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरात (ता. भोर) छ. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतलेली तारीख म्हणजेच 27 एप्रिल रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकत्र येऊन शिवविचारांचा जागर करण्यासाठी व जनतेमध्ये, नव्या पिढीमध्ये शिवशंभूच्या जाज्वल्य, सत्य इतिहासाची आणि विचारांची नव्याने पेरणी करून ’शिवशपथ’ घेण्यासाठी महाराष्ट्रातील समस्त शिवशंभू प्रेमी, महाराष्ट्रातील प्रेमी, देशभक्त जनता, समविचारी जनसंघटना, चळवळी यांचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विजय मांडके, प्रा.गौतम काटकर, महेश गुरव, राहुल गंगावणे, शुभम ढाले, संकेत माने, रश्मी लोटेकर आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्रीनगर मध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी
पुढील बातमी
संघटनात्मक विस्तारामध्ये भाजप देणार नव्या चेहर्‍यांना संधी

संबंधित बातम्या