सातारा शहरात हिंदू बांधवांचा मूक मोर्चा

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध

by Team Satara Today | published on : 10 December 2024


सातारा : बांगलादेशामध्ये हिंदू समाजाच्या नागरिकांवर सातत्याने अन्याय होत आहे. याचा निषेध करण्यासाठी सातारा शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे 200 नागरिक सहभागी झाले होते. हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराबाबत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.

यावेळी हिंदू समाजाचे प्रतिनिधी चिन्मय कुलकर्णी, अमर बेंद्रे, प्रसाद पालकर, विजय काटवटे, गणेश अहिवळे, प्रसाद सोनवणे इत्यादी सदस्य उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गालांडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात नमूद आहे की, बांगलादेशामध्ये दिनांक 4 ते 23 ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यामध्ये हिंदू समाजावर 2000 पेक्षा अधिक जातीय हल्ले झाले. हिंदू समाजाच्या मंदिरांना विशेषतः लक्ष करण्यात आले. बांगलादेशाचे लष्कर या अत्याचारांना सहकार्य करत असल्याचा आरोप या निवेदनात नमूद आहे. अशा प्रकारांमुळे हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल. बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने राहणे भारताचे आणि येथील नागरिकांचे कर्तव्य आहे. बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भारतात हिंदू समाजात प्रचंड रोष आहे. यामुळे हे प्रकार तातडीने थांबवावेत आणि भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. या मोर्चाची संबंधित संयोजकांनी परवानगी घेतली नव्हती. यासंदर्भात सातारा शहर पोलीस व संयोजकांशी चर्चा करण्यात आली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फुले- आंबेडकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डाॅ. शरद गायकवाड
पुढील बातमी
एकास धमकी दिल्या प्रकरणी समीर कच्छी विरोधात तक्रार

संबंधित बातम्या