सातारा : गुरुवारी सकाळी जकातवाडी ता.सातारा येथे झालेल्या राड्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटातील संशयितांना अटक करण्यात आली. न्यायालयात त्यांना हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अक्षय दौंडे, अजित दौंडे, चंद्रकांत दौंडे, प्रितम दौंडे, अभिजीत दौंडे, प्रवीण दौंडे, निलेश भोसले, सुरज पडवळ, सागर देवरे, चेतन पवार यांच्यासह महिलांवर व अनोळखी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुनील भानुदास गोळे (वय 35, रा. जकातवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार प्रितम दौंडे यांनी 21 जणांवर दिली आहे. त्यानुसार सुनील गोळे, रविंद्र गोळे, विजय काळे, राहूल गोळे, आदित्य काळे, अजय गोळे यांच्यासह महिला व अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे. या हाणामारी दरम्यान, सुनील यांची दिड तोळे वजनाची 90 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन काढून घेतल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
गुरुवारी दगड, लाकडी दांडके, कोयत्याने हल्ला झाल्यानंतर सातारा तालुका, सातारा शहर व शाहूपुरी पोलीस असा सुमारे 100 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलीस आल्यानंतरही हल्लेखोर एकमेकांच्या अंगावर जात होते. पोलीस बळ एकत्र आल्यानंतर मात्र त्यांची धरपकड करण्यात आली. रात्री उशीरा अटकसत्र केल्यानंतर शुक्रवारी संशयितांना सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधिशांनी संशयितांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. मोरडे करीत आहेत.