महाराष्ट्रात येत्या 2-3 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 16 October 2024


मुंबई : ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची स्थिती निर्माण झाली आहे. देशात मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असून या पावसाचा जोर वाढल्याची स्थिती आहे. देशात अनके ठिकाणी परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. महाराष्ट्रात देखील येत्या 2-3 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात काही ठिकाणी ऑक्टोबर हिट तर काही ठिकाणी पावसाचा फटका बसत आहे. हवामान विभागातर्फे 10 ऑक्टोबर रोजी परतीचा पाऊस माघारी जाईल असा अंदाज होता, मात्र परतीचा पाऊस चांगलाच लांबला आहे. त्यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

'या' जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल.

पुढचे चार दिवस पावसाचे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यात पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यानुसार, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तर 18-19 ऑक्टोबर रोजी अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डीजे योगी ने केले धुमधडाक्यात चारू सेमवालशी लग्न
पुढील बातमी
इंडिया-न्यूझीलंड पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द

संबंधित बातम्या